कोल्हापूर टाइम्स टीम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत परंपरेप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. कोल्हापूर विभागाचा निकाल ८७.१२ टक्के इतका लागला आहे. यामध्ये विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १३.७५ टक्के अधिक आहे. तर विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वात जास्त ८८. १५ टक्के निकाल लागला आहे. सांगली जिल्ह्याचा ८६.५५ तर सातारा जिल्ह्याचा ८६.२६ टक्के निकाल लागला.
दरम्यान राज्याच्या निकालात गेली तीन वर्षे द्वितीय स्थानी असलेल्या कोल्हापूर विभागाची यंदा पाचव्या स्थानापर्यंत घसरण झाली. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल हा ९१ टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात ३.८८ टक्के इतकी घट झाली आहे. मंडळातर्फे मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला. परीक्षेच्या कालावधीत ३३ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे निष्पण्ण झाले असून त्यांना एका परीक्षेला (जुलै-ऑगस्ट २०१९) बसण्यासाठी प्रतिबंध केला आहे.
'बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेतल्या होत्या. यामध्ये कोल्हापूर विभागातील ७९८ ज्युनिअर कॉलेजमधील १५७ परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली होती. या परीक्षेला विभागातून १ लाख, २५ हजार, ५९३ इतक्या नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख, २५ हजार, ४३३ मुलांनी परीक्षा दिली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एक लाख ९ हजार, २७९ इतकी असल्याची माहिती मंडळाचे सचिव सुरेश आवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यार्थिनी हुशार
दरम्यान विभागात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.३९ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.१४ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या ७३ हजार ९०५ मुलांपैकी ५८ हजार ६७१ मुले उत्तीर्ण झाली आहेत. यंदा ५५ हजार १८६ मुलींनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ५१ हजार ४०१ मुली यशस्वी झाल्या आहेत. गेल्या वर्षी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलापेक्षा दहा टक्के जादा होते. त्यामध्ये वाढ होऊन मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १३.७५ टक्क्यापर्यंत पोहचले. आकडेवारीवरुन बारावी परीक्षेतील उत्तीर्णतेच्या टक्क्यामध्ये मुलींचा वरचष्मा कायम राहिला. मुलींच्या उत्तीर्णतेच्या अधिक प्रमाणाचे विश्लेषण करताना सचिव आवारी यांनी, 'मुली या आज्ञाधारक व सिन्सीअर असतात. सातत्याने अभ्यासात मग्न असतात. यामुळे यश तुलनेने अधिक आढळते,' असा निष्कर्ष नोंदविला. पत्रकार परिषदेला विभागाचे सहसचिव टी. एल. मोळे, सातारा येथील उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, लेखाधिकारी एस. एल. रेणके, वरिष्ठ अधीक्षक सुधीर हावळ, अरविंद पेंडूरकर, विद्याधर पाटील, बी. आर. स्वामी आदी उपस्थित होते.
नियमित विद्यार्थी निकाल
जिल्हा नोंदणी विद्यार्थी प्रविष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
कोल्हापूर ५१७६६ ५१७१७ ४५५८८ ८८.१५
सांगली ३५५८६ ३५५१८ ३०७४० ८६.५५
सातारा ३८२४१ ३८१९८ ३२९५१ ८६.२६
एकूण १,२५,५९३ १,२५,४३३ १,०९,२७९ ८७.१२
१२ जूनला गुणपत्रिका मिळणार
विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्याचे वाटप बारा जून रोजी होणार आहे. मंडळातर्फे त्यादिवशी ११ वाजता ज्युनिअर कॉलेजना गुणपत्रिका वाटप केल्या जातील. संबंधित कॉलेजनी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करावे, अशी मंडळाने सूचना केली. दरम्यान गुण पडताळणीसाठी बुधवार (ता.२९) ते सात जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत उपलब्ध करून दिली जाईल. तयासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेज अथवा मंडळाच्या वेबसाइटवर अर्ज करावयाचा आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाकिंत प्रतीसाठी प्रतिविषय ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्जदार विद्यार्थ्यास छायाकिंत प्रत घेऊन जाण्यासंदर्भात फोन आणि एसएमएसद्वारे कळविले जाईल.
पुनपर्रीक्षार्थीचा निकाल २१.६८ टक्के
कोल्हापूर विभागातील पुनपर्रीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल २१.६८ टक्के इतका लागला आहे. पुनपर्रीक्षार्थींसाठी ३६६७ इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ३६५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी २३.६४, सांगलीची टक्केवारी २१.८९ तर सातारा जिल्ह्यातील उत्तीर्णतेची टक्केवारी १९.१३ इतकी आहे.