कोल्हापूर टाइम्स टीम
शहरातील उद्याने आणि छोटे-मोठे नाले श्रमदानातून स्वच्छ करण्याचा विडा महापालिका प्रशासनाने उचलला आहे. एक-दोन उद्यानांची स्वच्छता केल्यानंतर गेल्या रविवारपासून जयंती नाल्यापासून सफाई मोहीम सुरू झाली. पहिल्याच मोहिमेमध्ये शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज, रविवारी झालेल्या स्वच्छता मोहिमेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आम्हीही मागे नसल्याचे दाखवून दिले. विशेष: शहर आणि परिसरातील बचत गटांतील महिलांनी हातात खराटा घेऊन शहर स्वच्छतेचा संदेश दिला. 'कचरा निर्माण होऊ देणार नाही' अशी आयुक्तांच्या उपस्थितीत प्रतीज्ञा घेतली. त्यानंतर 'स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर' अशा घोषणा देत करवीर पंचायत समिती कार्यालयापासून सिद्धार्थनगरपर्यंत प्रबोधन रॅलीही काढली.
सर्वच शहरांना कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे कचरा निर्माण होणार नाही, याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. सद्यस्थितीत रोजचा कचरा शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये टाकला जात असल्याने ही समस्या आणखी जटील होत आहे. पावसाळ्यात नाल्यातील कचरा पाण्याचा प्रवाह अडवून ठेवत असल्याने त्याची तीव्रता अधिक वाढते. ही समस्या टाळण्यासाठी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांसह नागरिकांना स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या मोहिमेला श्रमदानाची जोड मिळाली आणि जयंती नाल्याची स्वच्छता झाली. नंतर या मुख्य नाल्यावा जोडणाऱ्या उपनाल्यांची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.
रविवारच्या या मोहिमेत महिला बचत गटांनी चांगला प्रतिसाद दिला. जयंती नाला पंपिंग हाऊस, सिद्धार्थनगर, रेणुका मंदिर, हॉकी स्टेडियम, जयप्रकाश नारायण उद्यान येथील नाल्यांची स्वच्छता केली. महानगरपालिकेचे आरोग्य, बागा, पवडी, घरफाळा, अग्निशम, पाणीपुरवठा, ड्रेनेज, प्रकल्प, वर्कशॉप या विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुमारे एक हजार नागरिक सहभागी झाले होते. चार जेसीबी, आठ डंपरच्या मदतीने नाल्यातील कचरा, गाळ काढण्यात आला. सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मोहिमेतून दुपारपर्यंत १३ डंपर कचरा उचलण्यात आला. 'नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा न टाकता कचरा कोंडाळयात किंवा घंटा गाडी कर्मचाऱ्यांकडे द्यावा. घरामध्ये निर्माण होणार कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे,' असे आवाहनही महापालिका प्रशासनाने स्वच्छता मोहिमेनंतर केले.
महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सिद्धार्थनगरातील स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेत उपक्रमाची पाहणी केली. जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक राजाराम गायकवाड, संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदिपक सरनोबत, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार नारायण भोसले, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले, विधी भागाचे संदीप तायडे, सुनील बिद्रे, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, दिलीप पोवार, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्याधिकारी डॉ. विजय पाटील, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल, आशिष घेवडे, यतीश शहा आदी सहभागी झाले होते.
या संस्थांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग
क्रिडाई, आर्किटेक्ट असोसिएशन ऑफ इंजिनीअरिंग, वारणा-वाठार-प्रेरणा सीएमआरके गट, माळीम महिला विकास बचत गट, असावरी महिला बचत गट, जिद्द वस्तीस्तर संस्था, प्रगती वस्तीस्तर संस्था, स्वरा फाउंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, राजाराम गायकवाड विचार मंच या स्वंयसेवी संस्थानी स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कोट
स्वच्छता मोहीम ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मोहिमेला लोकसहभाग मिळाल्यास त्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होणे आवश्यक आहे.
- उमेशचंद्र मोरे, न्यायाधीश
थर्माकोल व प्लास्टिक वापरामुळे अति प्रदूषण होत आहे. अशा विघटन न होणाऱ्या वस्तू पावसाळ्यात नाल्याचा प्रवाह अडवतात. प्रवाह थांबल्यामुळे पाणी पात्राबाहेर जावून नागरिकांना त्रास होतो. त्यासाठी थर्माकोल, प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त