कोल्हापूर टाइम्स टीम लोकसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे. अशा टप्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयातील गलथानपणाचा फटका मतदार आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बसत आहे. तेथे निवडणुकीसंबंधी माहिती सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे. मतदार यादीत नाव आहे की नाही, हे विचारण्यासाठी आलेल्या सामान्य मतदारांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. परिणामी निवडणुकीच्या पारदर्शक, गतिमान कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर निवडणूक कार्यालय अनेक वर्षापासून आहे. लोकसभा निवडणुकीमुळे या कार्यालयातील प्रशासनाची लगीनघाई तीन महिन्यापासून चालू आहे. मतदार यादी अद्यावत करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रक्रिया राबवणे, मतदानाची आणि नवमतदारांची टक्केवारी वाढीसाठी जनजागृती केली जात आहे. आता प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेची धांदल जोरात आहे. कार्यालयात निवडणूक उपजिल्हाधिकारी, दोन तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज होत आहे. उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ याची अलिकडे नियुक्ती झाली आहे. काही कर्मचारी नागरिकांना माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळत असल्याच्या तक्रारी आहेत. याकडे वरिष्ठांना लक्ष देण्यास वेळ नाही. मतदार यादी नेण्यासाठी, नाव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आलेल्यांना ताटकळ थांबावे लागत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार केंद्राचे कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाजवळील शाहू सभागृहात आहे. येथेही प्रचंड विस्कळीतपणा आहे. उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी आल्यानंतर कुठे मिळतात, हे कळत नाही. उमेदवार, कार्यकर्त्यांस ठिकाण शोधावे लागत आहे. अर्जासह विविध निवडणूक प्रक्रियेची माहिती कुठे मिळणार यासंबंधीचा फलक दर्शनी भागात लावण्यात आलेला नाही. नागरिक, पत्रकारांना माहिती देणे म्हणजे तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपकार करत असल्याच्या अविर्भावात काम करतात. निविदेत गोलमाल? निवडणूक कालावधीत सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा बसवण्यासह आवश्यक कामे करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून विविध कामे करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र ही निविदा प्रक्रिया संशयास्पद रितीने राबविली जात असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. अधिकारी नियमानुसार काम करत नसतील तर ठेकेदार निश्चित झाल्यानंतरच माहिती अधिकारात त्याचा भांडाफोड करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कार्यालय अडगळीत जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत भव्य आणि प्रशस्त आहे. मात्र अजूनही जुन्या कार्यालयात अडगळीत आहे. तेथे निवडणूक उपजिल्हाधिकारी कक्ष वातानुकूलित आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना नीट बसण्याची व्यवस्थाही नाही. एखाद्या किराणा दुकानात गेल्यानंतर जसे चित्र असते, तशी व्यवस्था तिथे पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या जादा कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याच्या रस्त्यावरच खुर्ची आणि टेबल टाकून बसावे लागले आहे. कामानिमित्त येणाऱ्यांनाही बैठकीची व्यवस्था नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट