कोल्हापूर टाइम्स टीम
लोकसभा निवडणुकीतीच्या प्रचारावेळी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार पारदर्शक कामकाजाच्या गप्पा मारतात. प्रचंड आश्वासने देतात. मात्र हेच उमेदवार निवडून आल्यानंतर सामान्यांपासून लांब जातात. आश्वासने विसरतात. भ्रष्टाचार करून गब्बर होतात. अशा उमेदवारांना, त्यांच्या पक्षांना मतदारांनी नाकारावे. भ्रष्टाचार कमी करण्याचे ठोस आश्वासन देणारा, सर्वांगिण विकासाचा अजेंडा मांडणारा, स्वत:पेक्षा देशहिताचा विचार करणाऱ्या उमेदवारास निवडून देण्याची गरज आहे, असा सूर 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा कट्या'वर व्यक्त झाला. ताराबाई पार्कमधील नाना-नानी पार्कमध्ये हा कार्यक्रम झाला.
डॉ. दिलीप शहा म्हणाले, 'चांगला लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे. मतदानादिवशी पर्यटनासाठी जाऊ नये. निवडणुकीत जो पक्ष, उमेदवार निस्वार्थीपणे, लोकांचे हित पाहतो असे वाटते त्यास निवडून दिले पाहिजे. भ्रष्टाचार, स्वत:चे घर भरण्याची प्रवृत्ती असलेल्या उमेदवारास मतदान करू नये. अद्याप आपल्या अवतीभवती अनेक मुलभूत प्रश्न दुर्लक्षित आहेत. ज्येष्ठ नागरिकांना शहरांतही सुविधा मिळत नाहीत. सरकारी कार्यालयांत त्यांना रांगेत थांबावे लागते. यंत्रणेकडून त्यांना वेठीस धरले जाते. हे थांबायला हवे. गरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा, शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळायला हवा.'
नामदेव बाणेदार म्हणाले, 'शहर आणि जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या मुलभूत सुविधा नाहीत. त्या तयार करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सेवा-सुविधा मिळत नाहीत. सरकारी कार्यालयात त्यांची हेळसांड होते. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालास भाव मिळत नाहीत. बेरोजगारी वाढली आहे. यावर ठोस उपाय मांडणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी राहिले पाहिजे. प्रत्येक बेरोजगार, ज्येष्ठ नागरिकास सरकारने किमान मानधन दिले पाहिजे. सर्वांगिण विकासाची भूमिका मांडणाऱ्या पक्षाचाच विचार व्हावा.'
पी. एस. घोलराखे म्हणाले, 'सरकारच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव तरतूद असायला हवी. अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात आहेत. यामुळे वृद्धांच्या पालन-पोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार वृद्धाश्रम सुरू झाले पाहिजेत. त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी. बस प्रवासात ज्येष्ठांना सवलतीच्या दरात तिकिट दिले जाते. मात्र, अनेकदा वाहकांच्या आडमुठपणामुळे अनेकांना याचा लाभ मिळत नाही. यावर त्वरीत उपाय हवेत.'
सुहास सोनाळकर म्हणाले, तंत्रज्ञानातील संशोधनाला विशेष मदतीचे धोरण हवे. सैनदल व इतर विभागांतील तंत्रज्ञान परदेशातून घेतले जाते. या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार केला जातो. मात्र सर्वच विभागांत पारदर्शक कामाला प्राधान्य हवे. इन्कम टॅक्स, रेल्वे, बीएसएनएल, जीएसटी हे विभाग सरकारला विकासकामांसाठी पैसे मिळवून देणारे विभाग आहेत. पण या विभागाकडे सरकार दुर्लक्ष करते. हे विभाग सशक्त करण्याचे धोरण हवे. विशेष निधी द्यायला हवा.'
स्नेहल नाडकर्णी म्हणाल्या, 'कोणत्याही क्षेत्रात स्त्री, पुरुष भेदभाव असू नये. दोघांनाही समान संधी मिळायला हवी. बहुतांशी सरकारी कार्यालयांत सामान्यांना सौजन्याची वागणूक मिळत नाही. कामासाठी कार्यालयात गेल्यावर बसण्यासाठी आसन व्यवस्था नसते. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना मतदान करू नये.'
डॉ. एम. बी. मगदूम म्हणाले, 'जय जवान, जय किसान या घोषणेप्रमाणे विकासाची दिशा असली पाहिजे. शेतकरी जगला तरच सर्व घटकांतील लोकांना भाकरी मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालास दीडपट हमीभाव मिळावा. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. शेतीच्या उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची अंमलबजावणी करावी. सत्तेविरोधात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी कळवळा दाखवणे आणि सत्तेवर आल्यानंतर सोयीस्करपणे दुर्लक्ष करणाऱ्या पक्षांना या निवडणुकीत बाजूला सारले पाहिजे.'
चर्चेत किरण ढकरे, मानसी कुलकर्णी, डी. जी. कुलकर्णी, नरेंद्र पाध्ये, बी. डी. गुजर, नरेंद्र पाटील, रमेश गुरव, पी. आर. नाईक, श्रीपाद म्हसवेकर, सुनंदा जोशी, मंगला थोरात, उषा लंगडे, वर्षा शेटे, रजनी जाधव, सुनिता माने, विजयमाला काळे आदींनी सहभाग घेतला.
शहरात सार्वजनिक ठिकाणी, बागांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. जी स्वच्छतागृहे आहेत, ती प्रचंड अस्वच्छ आहेत. हे चित्र बदलायला हवे. लोकसंख्येच्या अनुषंगाने पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह बांधावीत. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य हवे. नागरिकांसाठी सर्वच ठिकाणी दर्जेदार सेवा, सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.
- पूनम शहा
वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदारयादीत नाव नोंदवावे. जागरुक राहून मतदान करावे. विकासाचा मुद्दा घेऊन रिंगणात असलेल्या उमेदवारास प्राधान्य द्यायला हवे. शिक्षक, पदवीधारकांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांतूनही एक आमदार, खासदार निवडण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.
- पी. डी. कांबळे
या आहेत अपेक्षा
- विकासकामांसह प्रशासनात पारदर्शकता आणा
- सरकारी व्यवस्थेमधील भ्रष्टाचार कमी व्हावा
- ज्येष्ठ नागरिकांतूनही आमदार, खासदार निवडावा
- महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत
- शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा
- तंत्रज्ञानाला बुस्ट देणारे धोरण हवे