Maruti.Patil
@timesgroup.com
tweet: @MarutipatilMT
कोल्हापूर : चांगले रस्ते, सांडपाणी निर्गत, कचरा उठाव व आणि मुबलक व स्वच्छ पाणी या सुविधा शहरवासियांना मिळणे अपेक्षितच आहे. सध्या या सुविधा काही अंशी पुरवल्या जात असल्या तरी, नियोजनाअभावी शहरात नेहमीच बट्ट्याबोळ उडतो. काळम्मावाडी थेट पाइपलाइन, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, रंकाळा व पंचगंगा प्रदूषणमुक्ती, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा असे प्रश्नांची मालिका खंडीत करण्याचे आव्हान नूतन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमोर आहे.
रिक्त पदांमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या अतिरिक्त ताणातून मार्ग काढताना प्रशासनाला शिस्तही लावावी लागेल. काही मोजके विभाग विगळता महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित राहिले आहेत. नवे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करताना न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या प्रकरणांचाही निपटारा करावा लागले. वैयक्तिक 'लाभा'साठी सभागृहात टाहो फोडून हेवेदावे काढण्यात धन्यता मानणाऱ्या सभागृहाला शहरविकासाच्या योजना मांडण्यास प्रोत्साहित करावे लागेल. वेळ कमी आणि आव्हाने जास्त असली, तरी प्रशासकीय कामाचा गाढा अनुभव पाठीशी असलेले आयुक्त याचा कसा सामना करतात हे आगामी काळात दिसेल.
थेट पाइपलाइन
शहराला काळम्मावाडी थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी योजना हाती घेतली. पण योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. अनेक अडथळ्यांचा सामना अद्यापही संपलेला नसताना योजनेचा खर्च ४८८ कोटींपर्यंत पोहोचला आहे. केंद्र व राज्य सरकारचे यासाठी निधी मिळत असला, तरी वाढीवर खर्चाचे १५० कोटी प्रशासनाला उभा करावे लागतील. महापालिकेने यापूर्वीच्या दोन योजनांसाठी कर्ज उचललेले असून त्याचे हप्तेही सुरू झाले आहेत. थेट पाइपलाइनसाठी पुन्हा निधी उभा करावा, लागणार असताना अद्याप वनविभाग क्षेत्रात पाइपलाइन टाकण्यासाठी परवानगी आणावी लागेल. योजनेच्या कामात सर्वात मुख्य अडथळा जॅकवेल उभारणी ठरला आहे. किमान मिळणाऱ्या कालावधीत जॅकवेलचे काम धरणातील पाणीपातळीपर्यंत आणण्यासाठी नियोजन करावे लागेल. त्यासाठी ठेकेदार, सल्लागार कंपनीसह जबाबदार अधिकाऱ्यांशी नियमित संवाद साधावा लागणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन
शहरात दररोज सुमारे १८० टन कचऱ्याचे संकलन होते. घंटागाडीद्वारे कचरा उठाव करून कंटेनरमध्ये टाकला जातो. पण अपवाद वगळता कचऱ्याचे कंटेनर नेहमीच ओव्हरफ्लो होतात. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होता. एकीकडे कचऱ्याच्या उठावामध्ये अक्षम्य दर्लक्ष होत असताना जमा झालेला कचरा टाकण्यासाठी एकच जागा असल्याने कसबा बावडा येथील कचरा प्रकल्पावर कचऱ्याचा ढीग साचत आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती, कचऱ्याचे कॅपिंग असे अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. साचलेला करचा निर्गत करण्याबरोबरच पर्यायी जागेचाही शोध घ्यावा लागेल.
पाणीपुरवठा नियोजन
शहराला दररोज १२० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना, १४० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. त्यापैकी ५० एमएलडी पाणी गळतीद्वारे थेट नदीत मिसळते. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा ३० एमएलडी पाणी शहरवासियांना कमी मिळते. स्थायी समिती ते महासभेपर्यंत गळती काढण्यासाठी उपाययोजना सुचवल्या जातात. त्यानुसार काहीठिकाणची गळती दूर झाली असली, तरी लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि नियोजनाअभावी अनेक भागांना अपुरा पाणीपुरवठा होता. मागणीपेक्षा जास्त पाणी उपसा करून एकीकडे शहरवासीयांना पिण्याचे पाणी मिळत नसताना त्याचा खर्चाचा बोजा मात्र पडत आहे. त्याला शहरपाणीपुरवठा विभाग जबाबदार असून या विभागाला शिस्त लावण्याबरोबर लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप कमी करण्याची आवश्यकता आहे.
पंचगंगा, रंकाळा प्रदूषणमुक्ती
पंचगंगा व रंकाळा प्रदूषणामध्ये भर टाकण्यास महापालिका यंत्रणा कारणीभूत आहे. शहरातील १२ नाले वगळून दुधाळी व कसबा बावडा सांडपाणी प्रकल्प हाती घेतला. याद्वारे ९३ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन केले. त्यापैकी दुधाळीतील प्रकल्प सुरू झालेला असला, तरी कसबा बावडा येथील प्रकल्प अद्याप ६० टक्के क्षमतेने सुरू आहे. एकीकडे सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू झाली असताना, प्रक्रिया झालेल्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे पंचगंगा नदी व रंकाळा प्रदूषणमुक्तीचे दुखणे प्रकल्प कार्यन्वित होऊनही कायम आहे. दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करताना प्रक्रिया केलेल्या पाण्याचीही विल्हेवाट लावावी लागेल.
उत्पन्नवाढीवर भर देण्याची आवश्यकता
महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत म्हणून घरफाळा व नगररचना विभागाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या काही वर्षात दोन्ही विभागांना आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. शहरातील अनेक मिळकतींना घरफाळाच लागू झालेला नाही. अशा मिळकती कराच्या कक्षेत येण्यासाठी खासगी कंपनीला सर्व्हे करण्याचा ठेका दिला. पण कंपनीने सर्व्हेत प्रचंड गोंधळ निर्माण केल्याने अद्याप सर्व्हे अपूर्णच राहिला आहे. तर नररचना विभागाचा 'लालफिती'च्या कारभाराला अटकाव करण्यासाठी येथील अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करावी लागेल. वरकमाईसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडण्याची प्रवृत्ती समूळ नष्ट करावी लागेल. त्याचबरोबर एकूण उत्पन्नाच्या अस्थापनावर ६८ टक्के खर्चावरही मर्यादा आणावी लागणार आहे.
अतिक्रमणमुक्त शहर
शहरात रस्ते प्रकल्पातंर्गत अनेक रस्ते, फूटपाथ मोठे झाले. मात्र अंतर्गत रस्त्यांची अवस्था तशीच राहिली. शहरात अनेक मुख्य मार्ग अरुंद असताना रस्त्यासह फूटपाथ फेरीवाले व अन्य घटकांनी व्यापून टाकले आहेत. बहुतांशी ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील बनते. सभागृहात अतिक्रमण हटवण्याची जोरदार मागणी केली जाते. पण पथक जातात मागणी करणारेच फेरीवाल्यांचा मागे राहतात. वरिष्ठ अधिकारीही कारवाईवेळी अनुपस्थित राहत असल्याने पथकावर मर्यादा येतात. शहरातील सर्व रस्त अतिक्रमणमुक्त करताना राष्ट्रीय फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
रस्त्यांची देखभाल, युटिलिटी शिफ्टिंगचा प्रश्न
रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरात ४९ किमी रस्त्यांची बांधणी झाली. प्रकल्प खर्चाची रक्कम टोलवसुलीतून भागवताना दर तीन वर्षांनी प्रकल्पातील रस्त्यांना लेयर देण्यात येणार होता. टोलवसुलीला विरोध आणि नंतर टोल हद्दपार झाल्यानंतर रस्ते देखभालीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रशासन राज्य सरकारकडे २५ कोटीची मागणी करत आहे. पण अद्याप एकही रुपया महापालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे या रस्त्यांची देखभाल करायची कशी? यावर आयुक्तांना मार्ग काढावा लागणार आहे. युटिलिटी शिफ्टिंगसह गटर्स चॅनेलचाही प्रश्न गंभीर आहे. आयआरबी कंपनीने गटर्स व चॅनेल बांधणी केल्यानंतर त्याची स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी रस्त्यावरून वाहते. त्यावर उपाय काढण्याची गरज आहे. नगरोत्थन योजनेतील पहिल्या टप्प्यातीलच कामे अपुरी असताना, आहे त्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करताना दुसऱ्या टप्प्यासाठी प्रयत्न करून शहरातील रस्ते चकाचक करावे लागतील.