Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT
कोल्हापूर : जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई उपाययोजनांचा एक कोटी ९१ लाखांचा आराखडा कागदावरच राहिला आहे. महसूल प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता नसल्याने टंचाई घोषित केलेल्या एकाही गावात अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे टंचाईग्रस्त ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने गावे तहानलेलीच आहेत.
गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांकडून गावनिहाय संभावी पाणीटंचाईचा आराखडा तयार केला. जूनअखेरची टंचाई गृहित धरून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आराखडा मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप आराखड्यातील कामांसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त घोषित केलेल्या ६८ गावांतही उपाययोजना नारळ फुटलेला नाही.
उपाययोजनांचे प्रस्ताव महसूल प्रशासनाच्या लालफितीत अडकले आहेत. पंख्याखाली आणि एसीमध्ये बसून अधिकारी अजून कुठेही टंचाई नाही, असे सांगत आहेत. मात्र, ६८ गावांतील टंचाईची दाहकता अधिक आहे. या गावांत खासगी विहिरी अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहीर अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर उपाययोजनांच्या कामांना सुरुवात होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उन्हाचे चटके तीव्र झाल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
००००
१२१७
एकूण गावे
२९७
टंचाईसदृश गावे
६८
टंचाई घोषित गावे
एक कोटी ९१ लाख
आवश्यक निधी
००००
सर्वाधिक गावे राधानगरीतील
जूनअखेर संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या आणि कंसात आवश्यक निधी : आजरा : २२ (१४ लाख ८० हजार), भुदरगड : ३२ (३७ लाख), चंदगड : २५ (१९ लाख ८३ हजार), गडहिंग्लज : ३० (२८ लाख २५ हजार), गगनबावडा : ५ (२ लाख ५० हजार), हातकणंगले : २९ (७ लाख ६६ हजार), करवीर : १२ (६ लाख १० हजार), कागल : २५ (१२ लाख), पन्हाळा : २४ (१२ लाख), राधानगरी : ४४ (२२ लाख), शाहूवाडी : १७ (१२ लाख १० हजार), शिरोळ : ३२ (१६ लाख ६० हजार).
००००
सर्वाधिक पाऊस तरीही
शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यांत तुलनेत सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाचा प्रत्येक थेंब साठविण्यासाठीच्या नियोजनाचा अभाव, पाणीपुरवठा योजनांतील भ्रष्टाचारामुळे या तालुक्यांतील गावांतही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथील टंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरींची खुदाई केली जाते. मात्र, ही उपाययोजनाही तात्पुरतीच ठरते. यावर प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च होत आहेत.
०००००
६८ गावे टंचाईग्रस्त घोषित झाली आहेत. या गावांतील पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल भरण्यासाठी सरकारकडून ५० लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. उर्वरित उपाययोजनांसाठी निधीची मागणी केली आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर टंचाई निवारणासाठीच्या कामांना सुरुवात होईल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तर टंचाईची कामे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
अमन मित्तल, सीईओ, जिल्हा परिषद
००००