म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पदव्युत्तर शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक, संशोधन प्रकल्पाला चालना आणि त्या माध्यमातून प्राध्यापक व विद्यापीठाच्या लौकिकात भर हा प्रमुख उद्देश ठेवून शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनांची स्थापना झाली. विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापकांसाठी काम करताना संघटनेने वेगळा ठसा उमटविल्याची वस्तुस्थिती आहे. आता संघटनेत प्राध्यापक आणि विद्यापीठाच्या हिताचे काम कमी आणि प्राध्यापकांतील गटबाजी जादा असा प्रकार सुरू आहे.
यामध्ये कहर म्हणजे, संघटनेतील वर्चस्वादावरुन उफाळलेला संघर्ष पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. मात्र हा सारा प्रकार संघटनेतील जुन्या मंडळींना रुचला नाही. शिवाय विद्यापीठ प्रशासन आगामी कालावधीत 'नॅक'ला सामोरे जात आहे. प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असताना कॅम्पसमधील प्रमुख संघटनेतील गटबाजी, अधिकार मंडळावर कार्यरत प्राध्यापकांतील कुरघोडीमुळे विद्यापीठाच्या लौकिकाला बाधा पोहचत असताना प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची, कामकाजात एकमेकाला सांभाळून घेण्याची आणि 'कुणालाही दुखवायला नको' या मानसिकतेतून कामकाज करण्याची पद्धत कारणीभूत आहे.
नवनवीन अभ्यासक्रमामुळे विद्यापीठातील विभागाची संख्या ३६ पर्यंत पोहचली आहे. विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी संशोधनवृत्ती, विद्यापीठाचे सहकार्य आणि युजीसीच्या अर्थसहाय्यातून वेगवेगळे संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या संशोधन प्रकल्पाची वाहवा झाली. एकीकडे ही जमेची बाजू असताना दुसरीकडे विद्यापीठातील अनेक विभागातील प्राध्यापकामधील राजकारण हा प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. काही विभागात प्राध्यापकांची संख्या दोन,तीनच आहे. पण त्यांच्यातही टोकाचे मतभेद आहेत. त्याचा फटका संशोधक विद्यार्थी व नियमित विद्यार्थ्यांना बसत आहे. बहुतांश विभागात हीच स्थिती आहे. प्रशासनाने, 'तंटामुक्त विभाग'दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी स्पर्धा जाहीर केली तर त्यासाठी किती विभाग पात्र ठरतील हा संशोधनाचा विषय ठरेल ? अशा तीव्र भावना उमटत आहेत.
खरे तर, 'सुप्टा' ची ओळख विद्यापीठातील प्राध्यापकांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना अशी आहे. संघटनेचे १५० हून सभासद आहेत. त्यामध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि वरिष्ठ प्राध्यापक समाविष्ठ आहेत. दर दोन वर्षांनी कार्यकारिणीची निवडणूक होते. एप्रिल २०१७ पासून संघटनेची कार्यकारिणी अस्तित्वात नाही. त्याला प्राध्यापकांतील अंतर्गत वादामुळे कार्यकारिणी निवडही झाली नाही. संघटनेचे सभासद विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर आहेत. मात्र त्यांनी 'राजकारण्यांना'शोभेल अशा वर्तणुकीचे दर्शन घडविल्याच्या प्रतिक्रिया कॅम्पसमध्ये उमटात आहेत.
कॅम्पसमध्ये वाद, स्टेशनमध्ये चुकीची कबुली
विद्यापीठ निवडणुकीतील उणीदुणी, विभागांतर्गत राजकारण आणि संघटनेतील कुरघोडीवरुन कॅम्पसमधील प्राध्यापकांत अधूनमधून'तू तू मै मै'प्रकार घडत असतात. 'सुप्टा' संघटनेच्या कागदपत्रांवरुन १३ फेब्रुवारी रोजी प्रा. एन. बी. गायकवाड व प्रा. सागर डेळेकर, प्रा. जी. बी. कोळेकर, प्रा. भारती पाटील यांच्यामध्ये वाद झाला. गायकवाड यांनी त्या तिघांनी संघटनेचे लेजर, सभा पावती बुके, संघटनेची कीर्द वही, संघटनेचे पासबुक व अन्य कागदपत्रे नेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी लक्ष घातल्यावर संबंधितांनी कागदपत्रे जमा करून घडल्या प्रकाराबद्दल चुकीची कबुली दिली. मात्र कॅम्पसमधील वाद पोलिस स्टेशनपर्यंत पोहचल्याने विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली.