सात-बारा तयार झाल्याशिवाय उठणार नाही
डॉ. भारत पाटणकर यांचा इशारा
म. टा. वृत्तसेवा, कराड
पाटण तालुक्यातील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे संकलन तयार आहे. जमीन तयार आहे, लाभक्षेत्र आहे मग वाटपास वेळ कशाला? जमिनी वाटपाचा आदेश आणि सातबारे तयार झाल्याशिवाय आंदोलन स्थळावरून उठणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी कोयनानगरच्या मेळाव्यात प्रकल्पग्रस्तासमोर बोलताना दिला.
कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर कोयना प्रकल्पग्रस्तांच्या दुसऱ्या टप्प्यातील आणि निर्णायक आंदोलनात बोलताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले, 'मुख्यमंत्र्यानी गेल्या वर्षी कोयना प्रकल्पग्रस्तांची विधान भवनात मिटिंग घेऊन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या १४ मागण्या मान्य केल्या होत्या. या मागण्या तीन महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षीत होते. महसूल विभागाचे काम संथ गतीने काम चालू आहे. पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी तयार झाली आहे. हरकती, आक्षेप घेऊन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातून जमीन उपलब्ध आहे, असेही सांगितले जाते. मग घोड अडतंय कुठं? आमच्यावर दुसऱ्यांदा आंदोलन करण्याची वेळ का यावी. आता कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत उठायचे नाही.'
.........
बारा जणांवर दरोड्याचा गुन्हा
कराड :
पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील धनगरवाडा (काहीर) येथे सुझलॉन या पवनचक्की कंपनीचे २ लाख ८० हजारांचे लोखंडी साहित्य ट्रकमधून चोरीच्या उद्देशाने घेऊन जाताना त्यांना अटकाव केल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पाटण पोलिसांनी दहा ते बारा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. याची फिर्याद विजय सुभाष मोरे (रा. शनिमंडळ, ता. जि. नंदुरबार) यांनी सोमवारी पाटण पोलिसात दिली आहे.
..........
स्वा. उंडाळकर पुरस्कार
विवेक सावंत यांना जाहीर
कराड :
उंडाळे (ता. कराड) येथील थोर स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा स्वा. दादासाहेब उंडाळकर सामाजिक पुरस्कार विवेक सावंत यांना जाहीर झाला आहे.
दर वर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींना दादासाहेब उंडाळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा त्यांच्या ४५व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रौप्य महोत्सवी समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनादरम्यान सोमवारी, १८ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वा. दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कोयना बँकेचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते.
...........
'समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे'
कराड :
'प्रत्येक व्यक्तीकडे देण्यासारखे काही तरी असते. ज्याला जमेल तसे वस्तू, वेळ,पै सा आणि श्रम यांचे योगदान करीत समाजाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. तरच घडणारा समाज भावी पिढीसाठी पुढे योगदान देईल,' असे प्रतिपादन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
पाटील यांच्या ७८व्या वाढदिवसा निमित्त पुणे येथील एस. बालन समूह व परिवर्तन संस्था यांच्या वतीने गांधीटेकडी (ता. पाटण)येथील ठक्करबाप्पा विद्यालयातील विद्यार्थ्यांना ८० सायकली, १०० स्कूल बॅग व कराड, पाटण तालुक्यातील १० शाळांना सगंणक भेट देण्यात आले. या वेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, एस बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अभिजीत घुले-पाटील, राष्ट्रवादी आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील उपस्थितीत होते.
विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, 'वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या सायकली, संगणकांतून समाज घडणार आहे. नव्या पिढीसाठी हे प्रोत्साहन असून, त्यासाठी आपण आपली जबाबदारी उचलली पाहिजे.' पुनीत बालन म्हणाले, 'श्रीनिवास पाटील साहेबांचे प्रशासकीय, राजकीय, सामाजिक कार्य मोठे आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. त्यांचे दातृत्व मोठे असून, त्यांनी आपल्या जीवन प्रवासात वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना आदर्श मानून प्रेरणा घ्यावी. '
ओळी
मुलांना सायकल वाटप करताना श्रीनिवास पाटील व अन्य.
.........