कोल्हापूर टाइम्स टीम शहराला काळम्मावाडी थेट पाइपलाइनद्वारे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्याची योजना कार्यन्वित होत असताना शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था व पाणी साठवणूक करण्यासाठी उंच साठवण टाक्यांची बांधणी सुरू झाली आहे. अटल शहरी नूतनीकरण व परिवर्तन मिशन अंतर्गत (अमृत योजना) पाण्याची वितरण व्यवस्था बदलण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू झाले आहे. त्यासाठी ११४ कोटी, ८१ लाखांचा निधी मिळाला आहे. योजनेतून ३९६.३३ किलोमीटरची नवी व जुनी वितरण व्यवस्था बदलण्यात येणार आहे. कोल्हापूरची २०४९ ची लोकसंख्या गृहीत धरून शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी थेट पाइपलाइन योजनेचे काम अडथळ्यांची शर्यत पार करत सुरू आहे. थेट पाइपलाइन योजना डिसेंबर २०१९पर्यंत कार्यन्वित करण्याचा निर्धार केला जात असला, तरी योजना पूर्ण होण्यापूर्वी शहरातील जीर्ण झालेल्या आणि नवीन पाणीपुरवठा वितरण व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. उंच साठवण टाक्यांची उभारणी आणि दुरुस्ती गरजेची आहे. त्यानुसार महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने प्रकल्प अहवाल तयार केला. अहवालाला मंजुरी मिळाली. त्यानुसार ११४ कोटी ८१ लाखांच्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. थेट पाइपलाइन योजनेला पूरक अशी ३४९ किमीची नवी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. यामध्ये ११० ते ७५० मी. मी व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येईल. शहराच्या जुन्या भागात पाइपलाइन टाकल्यापासून एकदाही बदललेली नाही. परिणामी सद्य:स्थितीत होणाऱ्या एकूण पाणी उपसापैकी ५० एमएलडी पाणी गळतीद्वारे गटारीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे ४७.२६ किमी जुनी वितरण व्यवस्था बदलण्यात येणार आहे. वितरण व्यवस्थेबरोबर तीन ठिकाणी नव्याने पंप हाऊसची उभारणी करण्यात येणार आहे. तर आठ ते २० लाख लिटर क्षमतेच्या १२ ठिकाणी उंच टाक्या बांधण्यात येणार आहेत. शहरातील जुन्या व नवीन पाइपलाइनच्या कामाबरोबरच उंच टाक्या बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे पाइपलाइन टाकण्याच्या काम सुरू आहे. मात्र अनेकठिकाणी रस्त्याची दोनवेळा खोदाई होऊ नये, यासाठी ड्रेनेज व पाइपलाइनचे काम एकाचवेळी सुरू करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. हरित पट्ट्यामुळे ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ अमृत योजनेंतर्गत शहरात ड्रेनेज व पाणीपुरवठा लाइनचे काम सुरू असताना हरित पट्टे विकसित करण्यात आले. त्यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटीचा निधी मिळाला. या निधीतून मंगेशकरनगर, कदमवाडी, संभाजीनगर व बलराम कॉलनी प्रभागात हरित पट्टे विकसीत करण्यात आले आहे. प्रदूषण रोखण्याबरोबर या योजनेमुळे ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ झाला असल्याचा दावा केला जात आहे. प्रस्तावित उंच टाक्या कदमवाडी, सम्राटनगर, ताराबाई पार्क, राजेंद्रनगर, बोंद्रेनगर, पुईखडी, शिवाजी पार्क, बावडा रॉ वॉटर, बावडा, राजारामपुरी सायबर, राजारामपुरी लकी बझार, आपटेनगर नवीन वितरण व्यवस्था ३१८ किमी (११० ते २५०० मी.मी. व्यास) ३०.७६ किमी (३०० ते ७५० मी. मी व्यास) जुनी वितरण बदलणारी व्यवस्था ४४. ४३ किमी (११० ते २५० मी. मी. व्यास) २.८३ किमी (३०० ते ४५० मी. मी व्यास)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट