माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हल्लाबोल म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये लोकांचे प्रश्न सोडविण्याची धमक नाही. साडेचार वर्षाच्या कालावधीत मोदी सरकारने निव्वळ घोषणाबाजी, थापेबाजी करत लोकांची दिशाभूल केली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे थेट पाइपलाइन योजना आणि पंचगंगा नदी प्रदूषणाचा कार्यक्रम रखडला. कोल्हापुरात नव्याने एकही उद्योग प्रकल्प सुरू झाला नाही. अशा भ्रष्ट सरकारला सत्तेवरुन हटवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विकासाच्या पातळीवर नंबर एकचे राज्य बनविण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला विजयी करा,'असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापुरातील मुस्कॉन लॉन येथे निर्धार परिवर्तन सभेचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अजित पवार म्हणाले म्हणाले,'वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रुपयांची ठेव, गॅस सिलिंडर व पेट्रोलपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी राफेलप्रश्नी संसदेत उत्तर देत नसल्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. संपूर्ण राज्य दुष्काळने होरपळत आहे. आरक्षणाचे गाजर दाखवून सरकार लोकांना फसवत आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत ५६ टक्के रक्कम जाहीरातबाजीवर खर्च केली आहे. ' प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विविध घोषणांची चित्रफित दाखवित फसलेल्या योजनांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'पालकमंत्री पाटील यांनी २०१७ मध्ये खड्डेमुक्त रस्त्याची घोषणा केली होती. दोन वर्षानंतरही रस्त्याची स्थिती सुधारली नाही.' खासदार धनंजय महाडिक म्हणाले,' सरकारने नागरिकांना खोटी आश्वासने दिली. सरकारवर शेतकरी, व्यापारी, उद्योजक, वकील कुठलाच घटक समाधानी नाही. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांसारखी वागत आहे. आम्ही गेल्या पाच वर्षात शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली.'भविष्यात याच पद्धतीने काम करणार आहे.' शहराध्यक्ष आर. के.पोवार यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी.पाटील, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, महिला आघाडीच्या संगीता खाडे, जहिदा मुजावर, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आदी उपस्थित होते. ..... सत्तेच्या मस्तीच्या अंत्ययात्रेची सुरुवात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'मुख्यमंत्री फसवणीस' असा केला. ते म्हणाले, 'भाजप सरकारच्या सत्तेच्या मस्तीच्या अंत्ययात्रेची सुरुवात परिवर्तन यात्रेद्वारे झाली आहे. राज्य मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी महापुरुषांच्या फोटो छपाईत घोटाळा केला. सरकारी मुद्रणालयात सात रुपयांना फोटो उपलब्ध व्हायचे मात्र तावडेंनी १७०० रुपयांना ही छायाचित्रे खरेदी केली. माझ्या आरोपात तथ्य नसेल तर मी फाशी घ्यायला तयार आहे. पाच मंत्रीपदांसाठी शिवसेना लाचार बनली आहे. राज्यातील नागरिक दुष्काळात होरपळत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्यावारी करत आहेत.' ....... खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. अजित पवार भाषणाला उभे राहिल्यावर पुन्हा एकदा 'एकच खासदार...धनंजय महाडिक'ची घोषणा टिपेला पोहचली. पवार यांनी हस्तक्षेप करत 'कुणीही भाषण सुरू असताना घोषणा द्यावयाच्या नाहीत. हा प्रकार मला आवडत नाही. योग्य उमेदवाराला तिकीट देऊन निवडून आणण्यासाठी मी आलोय. कार्यकर्त्यांनी हलक्या कानाचे राहू नये. तसेच कुणीही गाफील राहू नका. यापूर्वी जे झाले ते गंगेला मिळाले. पक्षाचे नेते जे उमेदवार देतील त्यांना निवडून देऊन ताकद वाढवा,'असे आवाहन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट