कोल्हापूर टाइम्स टीम
कृषी पंपाच्या अन्यायी वीज दरवाढीच्या विरोधात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी राष्ट्रीय महामार्गावर उतरले. सरकार वीज दरवाढ रद्द करण्याचा निर्णय घेईपर्यंत रस्त्यावरुन हलायचे नाही, असे आवाहन करत सरकारलाही अल्टिमेटम दिला. या आंदोलनात सर्वपक्षीय आमदार व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शेतकरी कामगार पक्षासह सरकारचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी कृषी पंपाच्या वीज दरवाढीवरुन सरकारला घरचा आहेर दिला. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलानजीक तब्बल अडीच तास झालेल्या सभेत सर्व पक्षीय आमदार, पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन आयोजित केले होते. आंदोलनापूर्वी आयोजित सभेत शेती पंपाच्या वीज बिलातील पोकळ थकबाकीवरून सव
च नेत्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. पंचगंगा पुलाच्या उत्तरेस रस्त्याबाजूला ट्रॉलीमध्ये व्यासपीठ उभारले होते.
\Bमस्तवालपणा कराल तर ४६० करंट देऊ
\Bखासदार राजू शेट्टी म्हणाले 'राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी.पाटील यांना वयाच्या ९२ व्या वर्षी आंदोलन करावे लागते याची सरकारला लाज वाटली पाहिजे. त्यांना फसवाल तर राज्यकर्त्यांना किंमत चुकवावी लागेल. मुळात त्यांच्यासारख्या ऋषीतुल्य माणसाला फसवण्याइतकी मस्ती सरकारला कुठून आली? त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारने मस्तवालपणा चालू ठेवला तर ४६० चा करंट देऊ. शेतकऱ्यांवर नक्षलवादी व्हायची वेळ आणू नका. शेतकरी एकदा खवळला तर सरकारच्या बापालाही ऐकणार नाही.'
\B
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चाड नाही
\Bखासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'सरकारने अडचणीत आलेल्या स्टील उद्योगाला पाच हजार कोटी, सिमेंट उद्योगाला २५०० कोटी, बँकांना दहा हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले. मात्र सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करते. गेल्या साडे चार वर्षांच्या कालावधीत २४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यात ९३०० शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सरकारला गांभीर्य नाही.' आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'केंद्र आणि राज्यातील सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला नाही. सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी महामार्ग रोखून धरुया. एन. डी. पाटील यांच्या आंदोलनाची धार माहीत आहे. सरकारने त्यांची फसवणूक करू नये.'
\B
सरकारने शिवाजी महाराज, आंबेडकरांना फसवले
\Bकाँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, 'भाजप सरकारने साडेचार वर्षांत केवळ आश्वासने दिली. सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज व इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक साकारण्याची घोषणेचे पालन केले नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज व आंबेडकरांना फसवले ते शेतकऱ्यांना काय न्याय देणार? हे सरकार फसवं आहे. खोटी आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचा व शेतकऱ्यांना आश्वासनाचे गाजर दाखविण्याचा उद्योग केला. यामुळे आता आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे.'वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार राजीव आवळे, संपतराव पवार-पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील, हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी, क्रांती कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धैर्यशील माने, वाळव्याचे रवींद्र बोरडे, मानाजी भोसले यांची भाषणे झाली. आमदार उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, भगवान काटे, बाबासाहेब देवकर आदी उपस्थित होते. विक्रांत पाटील यांनी आंदोलनाची भूमिका विषद केली. रणजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
शिवसेनेचा घरचा आहेर
शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व आमदार सुजित मिणचेकर यांनी वीज दरवाढीवरुन सरकारवर सडकून टीका केली. वीज दरवाढीच्या प्रश्नी शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घ्यायला हवी. सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायची ही पक्षाची भूमिका असल्याचे सांगत सरकारला घरचा आहेर दिला. माजी आमदार संजय घाटगे यांनी शेतकरी शेती करतो ही चूक केली आहे का? डॉ. एन. डी. पाटील व खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत,' असेही ते म्हणाले.
..................................
प्रमुख मागण्या
सर्व कृषी पंपधारकांची मीटर रिडींग न घेता जादा दिलेल्या बिलांच्या दुरुस्त्या कराव्यात
दुरुस्त केलेल्या वीज बिलांना कृषी संजीवनी जाहीर करावी
सर्व कृषी पंपधारकांना नवीन वीज दर सवलतीने ठरावावेत
सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या नावावरील पोकळ व दंडीत सरकारी पाणीपट्टीची आकारणी रद्द करावी
कृषी पंप शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा
वीज दरवाढ रद्द करण्यासाठी ३४०० कोटी रुपयांचे अनुदान मिळावे
गुऱ्हाळघरांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा.
......................
पंचगंगा पूल परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने प्रचंड बंदोबस्त लावला होता. यामुळे पंचगंगा नदी पूल परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दोन वेळा भेट दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे यांच्यासह सात उप अधीक्षक, ४० पोलिस निरीक्षक यांच्यासह ४५० पोलिस कर्मचारी, एसआरपीच्या तीन कंपन्या मिळून ७५० कर्मचारी बंदोबस्तासाठी होते.