म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'संसदेच्या दोन्ही सभागृहात समाज आणि देशहिताचे काम चालावे ही नागरिकांची अपेक्षा असते. संसद सुरळीतपणे चालली तर लोकहिताचे अनेक महत्वाचे कायदे मंजूर होतात हा अनुभव आहे. त्यामुळेच खासदारांची संसदेतील सक्रियता महत्वाची आहे. सातत्याने अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे लोकशाहीचा पाया आणखी बळकट करणे होय' असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले. चेन्नईत राजभवनमध्ये आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांना सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे, भ्रातहरी महाताब, अनुराग ठाकूर, श्रीरंग बारणे, विरप्पा मोईली आणि राजीव सातव यांनाही संसदरत्न पुरस्कार देण्यात आला. पीआरएस इंडिया, प्रोसेंन्स प्राइम पॉईंड फाऊंडेशन आणि केंद्रीय संसदरत्न समितीतर्फे संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून पुरस्कार दिला जातो. संसदरत्न पुरस्काराचे संस्थापक के. श्रीनिवासन यांनी पुरस्कारीमागील भूमिका विषद केली. पुरस्कार विजेत्या खासदारांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. आणि सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाल्याबद्दल महाडिक यांचे विशेष कौतुक केले. 'पहिली टर्म असतानाही महाडिक यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत, सर्व खासदारांमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल अभिमान वाटतो' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नमुद केले. सत्काराला उत्तर देताना खासदार महाडिक म्हणाले, 'खासदार म्हणून निवडून आल्यापासून विकासात्मक आणि विधायक दृष्टीने काम केले. अनेक वर्षे रखडलेले जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लावले. हा पुरस्कार आपण कोल्हापूरच्या नागरिकांना समर्पित करत आहे.' सोहळ्याला भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट