'राजवाड्यातील शाळा'म्हणून नावाजलेल्या मेन राजाराम हायस्कूलची पटसंख्येअभावी दयनीय अवस्था बनली आहे. इयत्ता पहिली ते दहावी अशा वर्गात मिळून केवळ ६८ पटसंख्या आहे. पाचवी, सहावी आणि सातवीच्या वर्गात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत विद्यार्थी संख्या आहे. दरवर्षी पटसंख्या घटत असल्यामुळे हायस्कूलच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अपुरा विद्यार्थी पट आणि शिक्षक अतिरिक्त होण्याच्या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासन हडबडले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी याप्रकरणी स्वत: लक्ष घातले आहे. मुलांना आकर्षित करुन घेण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिशची सुविधा, मुलांच्या प्रवास खर्चाची सोय याबाबी कायमस्वरुपी करता येतील का, या संदर्भात त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मेन राजाराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. येथे प्रशस्त मैदान, प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब अशा सुविधा आहेत. मात्र अपुरी शिक्षक संख्या व अन्य कारणांमुळे गेल्या काही वर्षात हायस्कूलच्या पटसंख्येत कमालीची घसरण झाली आहे. सध्या पाचवीच्या वर्गात एक, सहावीमध्ये दोन तर सातवीच्या वर्गात आठ विद्यार्थी आहेत. आठवीमध्ये ११, नववीत २१ तर दहावीमध्ये २५ विद्यार्थी शिकत आहेत. पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी एकत्र येऊन काही प्रमाणात विद्यार्थ्यांना युनिफॉर्म्स, शैक्षणिक व प्रवास खर्चाची जबाबदारी उचलली आहे. दरम्यान, प्रशासकीय पातळीवरुन शाळांसमोरील समस्या दूर करण्यात स्वारस्य न दाखविल्यामुळे हायस्कूलच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
'मेन राजाराम हायस्कूलमधील पटसंख्या वाढावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सीइओ अमन मित्तल यांनी शालेय विकास व पटसंख्या वाढीसाठी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. सेमी इंग्लिशची सुविधा, परिसरात पालक भेटी व कार्यशाळेद्वारे मुलांना आकर्षित करणे असे नियोजन आहे.
-आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
ज्युनिअर कॉलेज फुल्ल
मेन राजाराम हायस्कूलला संलग्न ज्युनिअर कॉलेज आहे. येथे अकरावी व बारावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाची सुविधा आहे. विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीच्या मिळून चार तुकड्या आहेत. कला आणि वाणिज्य अभ्यासक्रमाची प्रत्येकी एक तुकडी आहे. ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी संख्या ७७८ आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅबच्या सुविधा आहेत. २००६ पासून बारावी सायन्सचा निकाल शंभर टक्के आहे.
पटसंख्यावाढीसाठी आवश्यक ....
सर्व विषय शिक्षकांच्या नियमित नियुक्त्या
सेमी इंग्रजी शिक्षणाची सुविधा
हायस्कूलच्या अवतीभवती संरक्षक भिंत
गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व प्रवास खर्चाची सोय
शालेय वेळेत मैदानावरील पार्किंग बंद करणे
सुरक्षारक्षकाची नेमणूक करुन शाळाबाह्य उपद्रव थांबवणे
'मेन राजाराम हायस्कूलची पटसंख्या ७० वरुन ७०० पर्यंत पोहचली पाहिजे यादृष्टीने नियोजन करणार आहे. मार्चअखेर आवश्यक शिक्षकांच्या नियुक्त्या होतील. शाळेसाठी आवश्यक सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाईल. यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचाही विचार आहे.
-अमन मित्तल, सीईओ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट