महापालिका लोगो
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शहरातील रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा विभागातील नियोजनशून्य कारभारासह नगरसेवकांनी प्रभागातील विविध समस्यांचा पाढा महापौरांच्या आढावा बैठकीत वाचला. जलअभियंता, शहर अभियंता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे बैठकीला जणू महासभेचे स्वरुपच प्राप्त झाले. उपस्थित सर्वच नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर दर पंधरा दिवसाला बैठक घेण्याचे जाहीर करत आज झालेल्या बैठकीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश महापौर सरिता मोरे यांनी प्रशासनाला दिले.
शहरातील विविध प्रश्नांच्या संदर्भात महापौर सरिता मोरे यांच्या कार्यकाळातील पहिलीच बैठक बुधवारी स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. 'वारंवार पाणीपुरवठा विभागाला माहिती देवूनही दुरुस्ती केली जात नसल्याने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. पाण्याचे नियोजन का केले जात नाही?, पाणी बिल नियमित घेत असताना पाणी का सोडत नाही?' असा प्रश्न उपस्थित करत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा यांनी पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल करत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. शोभा कवाळे यांनीही अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केला. जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी या भागात तीन इंची पाईपलाईन टाकण्याची आवश्यकता आहे, प्रभाग उंचावर असल्याने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण त्यांच्या उत्तरावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही.
'पाणीप्रश्नाबाबत १५ दिवसांनी आढावा बैठक घेणार आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत कोणाची गय करणार नसल्याचा इशारा देत बैठकीचा अहवाल आठ दिवसांत द्या, असे आदेश महापौर मोरे यांनी प्रशासनाला दिले.
'विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रभागांची पहाणी केली. मात्र अधिकाऱ्यांकडून कामाचा पाठपुरावा केला जात नाही,' असा आरोप अश्विनी बारामते यांनी केला.
नगरसेविका वनिता देठे आणि रीना कांबळे यांनी फुलेवाडी रिंगरोड रस्त्याचा प्रश्न उपस्थित करत रस्त्याची दहा कोटींची निविदा कोणाला दिली? रस्त्यावरुन अवजड वाहतूक सुरू आहे. अपघाताचे प्रमाण वाढलेले असताना निविदा काढूनही रस्ता का केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी रस्त्याच्या कामासाठी निविदा काढली असून ३१ जानेवारीला निविदा खुली होणार असल्याचे स्पष्टीकरण देत, रस्त्यावर मुरुम पसरला असल्याचे सांगितले. त्यावर देठे यांनी रस्ता कधी होणार हे प्रथम स्पष्ट करण्याची मागणी केली.
नगरसेवक तौफिक मुल्लानी आणि नगरसेविका रुपारणी निकम यांनी शाळा परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी केली. राजसिंह शेळके म्हणाले, 'सदस्यांनी सुचविलेली कामे आठ ते दहा महिने होत नाहीत. तसेच काही फायली गायब झाल्या आहेत.'
बैठकीस परिवहन सभापती राहुल चव्हाण, नगरसेविका माधुरी लाड, अॅड. सुरमंजिरी लाटकर, उमा इंगळे, छाया पोवार नगरसेवक किरण शिराळे, सचिन पाटील, ईश्वर परमार, शेखर कुसाळे यांच्यासह पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.
............
चौकट
ठेकेदारांना नोटीस
उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले,'सदस्यांनी प्रभागातील कामासाठी नियोजन करुन दिलेले बजेट १५ दिवसांत खर्ची होऊन निविदा काढण्यासाठी प्रशासन कोणती यंत्रणा राबविणार आहे, तसेच वर्कऑर्डर झालेली कामे अद्याप का सुरु केलेली नाहीत. आचारसंहिता कधीही लागू शकते, त्यापूर्वी वर्कऑर्डर झालेली व वर्कऑर्डर द्यावयाची कामे तातडीने सुरु करण्याबाबत संबंधित ठेकेदारास नोटीस काढा.' बैठकीला नगररचना, आरोग्य, मुख्य आरोग्य निरिक्षक, विधी या विभागाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून देत उपमहापौर शेटे यांनी त्यांना नोटीस काढावी अशी सूचना अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना केली. पाटणकर यांनी वर्कऑर्डर झालेल्या कामाबाबत ठेकेदारांना नोटीस काढू, असे स्पष्ट केले.