Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT
कोल्हापूर : भाऊसिंगजी रोडवरील करवीर पंचायत समिती इमारतीमधील सर्वच विभागांत प्रचंड अस्वच्छता आहे. अनेक ठिकाणी इमारतीची पडझड झाली असून छतावरील पत्रे लोंबकळत आहेत. 'कार्यालय नव्हे गोडाऊनच' असचे चित्र दिसते. जिल्ह्यात सर्वात मोठी आणि शहरातील पंचायत समिती कार्यालयाची इतकी वाईट अवस्था असताना लोकप्रतिनिधी काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंचायत समितीची स्थापना १९६५ मध्ये झाली. त्यापासून ग्रामपंचायत, कृषी, बांधकाम, आरोग्य, शिक्षण आदी विभागासह गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती कक्ष, सभागृह या इमारतीत आहे. इमारत, परिसराच्या जागेचे मूळ मालक विजयसिंह घाटगे (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) आहेत. घाटगे यांनी भाडेकराराने दिलेल्या इमारतीत कार्यालये आहेत. अजूनही दरमहा १५०० रुपये नाममात्र भाडे प्रशासन त्यांना देते. मात्र मालकांनी जागा ताब्यात घेण्याची मागणी केल्यानंतर निर्माण झालेला वाद २०११ मध्ये न्यायालयात गेला. सरकारला निधी खर्च करून नवीन इमारत बांधता आलेली नाही.
या इमारतीच्या देखभाल, दुरूस्ती, डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी छतावरील अनेक पत्रे गंजलेले आहेत. खिडक्या तुटल्या आहेत. अनेक विभागातील फरशा निघाल्या आहेत. फायली ठेवण्यासाठी जागा नसल्याने अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. नादुरूस्त साहित्य जागा मिळेल त्या ठिकाणी टाकण्यात आले आहे. भिंतीजवळ गवत आहे. डास उत्पत्तीचे अड्डे निर्माण झालेत. कागदांचा कचरा परिसरात रोज जाळला जातो. त्याचा धूर दिवसभर घुटमळत असतो.
महिला स्वच्छतागृह
महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या स्वच्छतागृहातून दुर्गंधी सुटली आहे. दार मोडल्याने त्याचा वापर करणे गैरसोयीचे ठरत आहे. यावरून महिलांच्या आत्मसन्माबद्दल प्रशासन किती जागृत आहे, हे पुढे येते. स्वच्छ भारत मोहिमेतर्गंत लोकांना स्वच्छतेचे डोस पाजणारे प्रशासनच स्वच्छतेबद्दल उदासीन असल्याचे दिसते. पुरूष स्वच्छतागृहाची वाईट अवस्था आहे. खेडोपाड्यांतून कामानिमत्त आलेले शेतकरी इतर अभ्यागत स्वच्छतागृहातील डर्टी पिक्चर पाहून आणि दुर्गंधी सहन न झाल्याने निसर्गाच्या सानिध्यात विधी उरकताना दिसतात.
कोपरे, खिडक्यांचे गज रंगलेले
सर्वच विभागातील खिडक्यांचे गज पान, तंबाखू, मावा, गुटखा खाऊन थुंकल्याने रंगलेत. कोपऱ्यात, टेबल, खुर्चीजवळ फायलींचा ढिगारा आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात धूळीचा थर साचला आहे. निर्गत केलेल्या फाईल, अनावश्यक वस्तू, सळ्या, लोखंड, नादुरूस्त संगणक, फॅन, खुर्च्या कृषी विभागात एका बाजूला ठेवल्या आहेत. कोणत्याही क्षणी ते कोसळतील अशा अवस्थेतून एकावर एक रचून ठेवले आहेत.
पंचायत समिती भाड्याच्या इमारतीत आहे. मूळ मालक आणि प्रशासनातील वाद न्यायालयात आहे. यामुळे कायमस्वरूपी चांगली इमारत बांधता येत नाही. हा वाद तडजोडीने सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जागेचा वाद मिटवून चांगली, सुसज्ज इमारत बांधण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घ्यावा. दरम्यान, इमारत दुरूस्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे २० लाख निधीची मागणी केली आहे.
राजेंद्र सूर्यवंशी, सभापती, करवीर पंचायत समिती
समितीच्या मूळ इमारतीचा ढाचाच गोडाऊनसारखा आहे. त्यामुळे अंतर्गंत, बाह्य सजावट, देखभाल, दुरूस्ती करण्यावर मर्यादा येतात. कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. मालक आणि प्रशासनातील वाद न्यायालयात आहे. परिणामी कायमस्वरूपी इमारत बांधकाम करता येत नाही. नियमित स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध आहे. इमारत दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासंबंधी सभागृहात एकमताने निर्णय होत नसल्याने प्रशासनाची अडचण होत आहे.
सचिन घाडगे, गटविकास अधिकारी