लोगो : महापालिका @3 लेखाजोखा
Maruti.Patil@timesgroup.com
tweet: @MarutipatilMT
कोल्हापूर : बहुचर्चित अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामाचा आराखडा सप्टेंबर महिन्यात महापालिकेने राज्य सरकारकडे नगरविकास विभागात सादर केला. दोन महिन्यानंतरही मुख्यमंत्री कार्यालयाकडून आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा योजनेला प्रारंभ करण्याचे जाहीर आश्वास दिले. दोन महिन्यानंतरही त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात. मात्र, मंदिर परिसरात भाविकांना पायाभूत सुविधी मिळत नसल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. भाविकांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मंदिराभोवती चांगले रस्ते, पार्किंग, भक्तनिवास, स्वच्छता गृहे अशा सुविधांचा अभाव आहे. भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक वर्षापासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मागणी होत होती. यासाठी आंदोलनेही झाली. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची घोषणा करून अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद केली. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी तरतूद केली. महापालिकेला आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या. २५५ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील प्रस्तावाला मुख्य सचिवांनी जून २०१७ मध्ये मंजुरी दिली. नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर पुन्हा आराखडा सादर झाला. त्यांनी आराखड्याबाबत काही सूचना केल्या. विकासकामांमध्ये जीएसटीचा समावेश केला गेला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला पहिल्या टप्प्यातील ८७ कोटी ११ हजारांचा सुधारित आराखडा महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी सादर केला. पण, मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप अध्यादेश किंवा मंजुरी मिळालेली नाही.
पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करण्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमात कुदळ मारण्याची डेडलाइन जाहीर केली. पण अद्याप काहीच घडलेले नाही. परिणामी विकास आराखडा पूर्णत्वास जाण्याची जिल्हावासियांची प्रतीक्षा संपलेली नाही. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रथम दर्शन मंडप, स्वच्छतागृहे, मंदिर सोभावतालचे रस्ते आणि पार्किंगची सुविधा देण्यात येणार होती. पण, अद्याप आराखडाच मंजूर नसल्याने भाविकांना उन्हाचे चटके सहन करत अंबाबाईचे दर्शन घ्यावे लागत आहे.
शहरांतर्गत अरुंद रस्ते अन् पार्किंगची सुविधा नसल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बिंदू चौक, सरस्वती चित्रपटगृह व व्हिनस कॉर्नर येथे बहुमजली पार्किंगची सोय आराखड्यात आहे. या सर्व सुविधा कागदावर राहिल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली. त्यामुळे मंदिर परिसर आणि वाहतुकीची समस्या निकालात काढण्यासाठी आराखड्यातील कामांना लवकर सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अंतिम मंजुरीसह अध्यादेश हवा
आघाडी सरकारच्या कालावधीत जिल्हा नियोजन मंडळाने २५० कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला. पण मोठ्या रक्कमेचा प्रकल्प असल्याने याला मूर्त रुप मिळाले नाही. परिणामी विद्यमान सरकारने २५५ कोटींचा आराखडा तयार करताना त्याचे तीन टप्पे केले. आराखड्याचे केशवराव भोसले नाट्यगृहात सादरीकरण झाले. नंतर तांत्रिक समिती व मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिखर समितीने मंजुरी देऊन आराखडा बांधकाम विभागास तपासणी करण्यासाठी देण्याची सूचना महापालिकेला केली. बांधकाम विभागाकडून पहिल्या टप्प्यातील आराखडा सादर झाला असून तो राज्य सरकारलाही सादर झाला आहे. राज्य सरकारने अंतिम मंजुरी देऊन अध्यादेश काढल्यानंतरच निधी उपलब्ध होऊन, प्रत्यक्ष काम सुरू होईल.
सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामाचा आराखडा सप्टेंबरमध्ये पाठवला आहे. सरकारकडून त्यास लवकरच मंजुरी मिळेल. मंजुरीनंतर पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात होईल.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता
आराखड्यातील प्रस्तावीत प्रमुख कामे
३ कोटी ८२ लाख
दर्शन मंडप इमारत
१४ कोटी २५ लाख
बिंदू चौक व सरस्वती चित्रपटगृह पार्किंग
४५ लाख
स्वच्छतागृहे
६ लाख
दिशादर्शक फलक
११ लाख
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
२ कोटी ६५ लाख
विद्युत व टेलिफोन लाइन स्थलांतर
१ कोटी ९५ लाख
व्हिनस कॉर्नर येथे भक्त निवास व पार्किंग
८७ कोटी ११ हजार
एकूण आराखडा