कोल्हापूर टाइम्स टीम जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून नद्या दुथडी वाहत असताना, केवळ नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारांमुळे सणासुदीच्या दिवसात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. दिवाळीपूर्वी पाण्याचा सुरळीत पुरवठा करा, अन्यथा महापालिका चौकात अधिकाऱ्यांना अभ्यंगस्नान घालू, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना बुधवारी निवेदनाद्वारे दिला. दरम्यान बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनेही प्रसिद्धी पत्रकाद्वांरे पाणीपुरवठा विभागावर ताशेरे ओढले आहेत. निवेदनात म्हटले आहे, 'शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यापासून निम्म्या शहरात एक दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ए, बी व निम्म्या ई वॉर्डात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असताना, जलवाहिनी फुटल्याने ई वॉर्डाचे पूर्णच पाणी बंद झाले. अपुऱ्या पाण्यामुळे विशेषत: महिला वर्गाला ऐन सणात धावाधाव करावी लागत आहे. विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याला सर्वस्वी पाणीपुरवठा विभाग जबाबदार आहे. नियोजन करून नागरिकांना दिवाळीपूर्वी पाणी न दिल्यास अधिकाऱ्यांना महापालिका चौकातच अभ्यंगस्नान घालू,' असा इशारा शिष्टमंडळाने दिला. शिष्टमंडळामध्ये किशोर घाटगे, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, महेश उरसाल, मनोहर सोरप, जयवंत निर्मळ, बबन हरणे, प्रमोद सावंत, अवधूत भारंबे, हर्षल पाटील, सुनील सावंत, अशोक रामचंदानी, दीपाली खाडे यांच्यासह शिवसेना, हिंदू महासभा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदे मातरम यूथ ऑगनायझेशन, हिंदू जनजागृती, महालक्ष्मी भक्त समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे पाणीपुरवठा विभागावर ताशेरे ओडले आहेत. पत्रकात म्हटले आहे, 'कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असून शाहू महाराजांनी केलेल्या जलसंधारणांमुळे शहराला बारमाही पाणी मिळते. पण महापालिकेच्या गलथान कारभारामुळे पाणीपुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. ऐन सणात कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करुन नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. अधिकाऱ्यांनी यामध्ये जर सुधारणा न केल्यास धडा शिकवण्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकावर किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट