म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे 'गगनबावडा तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना क्रेडिटवर बियाणे, रासायनिक खते, ऊस रोपे, कीड व रोग नियंत्रण औषधे, ठिबक सिंचनासाठी अनुदान व पाचट अनुदान पुरविणार आहे. सभासदासांठी राबविण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,' असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन संजय पाटील यांनी केले. गगनबावडा तालुक्यातील असळज येथील डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या १६व्या बॉयलर अग्नी प्रदीपन प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे संस्थापक चेअरमन पाटील यांनी चालू गळीत हंगामात कारखान्याने साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही केले. कारखान्याचे संचालक बजरंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, मानसिंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, रवींद्र पाटील, शामराव हंकारे, बाजीराव शेळके, उदय देसाई, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, बँक स्थायी अधिकारी एस. एम. यादव, खातेप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी स्वागत केले. सेक्रेटरी नंदू पाटील यांनी आभार मानले. फोटो : असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपनप्रसंगी संस्थापक चेअरमन संजय पाटील. सोबत कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांच्यासह संचालक.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट