म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर प्रस्तावित रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनास हातकणंगले, करवीर तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तीव्र विरोध केला. यावेळी उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल प्रमुख उपस्थित होते. नवा महामार्ग हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतून जाणार आहे. त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हातकणंगले, करवीर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बोरपाडळे, वारणा, शिये, वडगाव, चोकाकमार्गे रत्नागिरीहून आलेला रिंगरोड आहे, पुन्हा रष्ट्रीय महामार्गाची गरज काय? असा प्रश्न हातकणंगलेचे माजी सभापती राजेश पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी जमिनी दिल्या. आता पुन्हा आम्हीच का जमिनी द्यायच्या, अशीही त्यांनी विचारणा केली. कोणत्याही परिस्थितीत नव्या महामार्गासाठी जमीन देणार नाही, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यावर ठाम असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक बी. एस. साळोखे, वारणा सहकारी बँकेचे संचालक सुभाष पुरंदर-पाटील, अनिल पुजारी, रंगराव गायकवाड, अॅड. प्रशांत पाटील, धीरज पाटील, अॅड. सुनील पाटील, विजय चौगुले यांनी चर्चेत सहभाग घेतला. ००००
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट