ज्येष्ठ कॅमेरामन यांचे त्यागराज पेंढारकर यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्याविषयी जागवलेल्या आठवणी... .. .. .. .. यशवंत भालकर .. .. .. .. मराठी आणि हिंदी चित्रसृष्टी समृद्ध करण्यासाठी गेल्या ७०-८० वर्षांत अनेक घराण्यांचे योगदान फार मोठे आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीची घडी बसवून देण्यापासून मास्टर विनायक या गुणी कलाकार दिग्दर्शकास निर्माता म्हणून उभे करणाऱ्या नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांचे छायालेखक त्यागराज पेंढारकर उर्फ राजादादा हे चिरंजीव. एका नटश्रेष्ठाच्या पोटी जन्म घेतलेल्या त्यागराज यांनी छान उंची असताना अभिनयाचा मार्ग न धरता सुरुवातीला दिग्दर्शन विभाग व नंतर थेट मुंबई गाठून चित्रपती व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत जावून छाया लेखनाचे धडे गिरवणे सुरु केले. आभाळाएवढा बाप पाठीशी. भालजी पेंढारकरांसारखे काकागुरु आणि व्ही शांतारामांची चाणक्ष नजर. सिनेमात फक्त संधी मिळणं महत्त्वाचे असते. जो त्या संधीचे सोनं करतो, जीवाचं रान करतो, ही संधी पुन्हा नाही हे ज्याला कळते तोच खरा कलाकार तंत्रज्ञ. आज साठ वर्षांपूर्वीच म्हणजेच १९५८ साली व्ही. शांताराम यांची जगभर गाजलेला 'दो आँखे बारा हाथ' हा त्यागराजदादांचा पहिला चित्रपट. त्यांच्या आयुष्याचे सोनं करुन गेला. आजही जेलरची दाढी करत असताना कैद्याचे थरथरणारे हात, तो आरशातला क्लोज... मोठे जेलर बाबूराव पेंढारकरांचे, पायाचे, बुटाचे थरकाप उडवणारे शॉट या साऱ्यांत कॅमेरामन त्यागराज यांचे कसब दिसून आले. १९६० च्या 'नवरंग'ने त्यागराज यांना छायालेखक म्हणून खूप प्रसिद्धी आणि यश मिळविले. पुढे अनेक चित्रपट केले. राजकपूर यांचा 'दिवाना,' जेमिनीचा 'समाज को बदल डालो' १९७३ चा शाहीर दादा कोंडके यांचा 'आंधळा मारतो डोळा' १९७४ चा रंगीत 'राजा शिवछत्रपती,' त्यानंतर अनेक गुजराती चित्रपट राजादादाच्या हातून यशस्वी झाले. चंद्रकांत मांडरे यांचा तो राजा तर सूर्यकांत बेबी शकुंतला, माधवी देसाई, प्रभाकर पेंढारकर यांचा राजादादा. छायालेखक त्यागराज पेंढारकर हा खरंच राजा माणूस होता. अत्यंत शिस्तप्रिय, शांत स्वभावाचे. १९८५ सालचा दिलीपराज चित्र, पुणे यांच्या दिग्दर्शक भास्कर जाधव यांच्या 'देवाशपथ खरं सांगेन,' या चित्रपटावेळी मी भास्कररावांचा प्रमुख सहायक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यागराजदादांशी छान गट्टी जमली. पुढे आदरयुक्त मैत्री. त्यागराजदादांचे कोल्हापुरातील वास्तव्य आम्हा चित्रपटसृष्टीतील लोकांच्यादृष्टीने वैभव होते. माझ्या 'मला भेटलेली मोठी माणसं,' या पुस्तक प्रकाशनाला ते तब्येत बरी नसताना आले. प्रकाशन सोहळ्यानंतर बरोबर दोन दिवसांनी त्यागराजदादांचा फोन आला. 'यशवंतराव' वेळ असेल तर फ्रेंड कॉलनीत घरी चहाला या. दादांनी सगळे पुस्तक एकटाक वाचले होते. माझे भरभरुन कौतुक केले. काकीकडून एक भेटवस्तू मागवली. त्यांनी शालिनी सिनेटोन परिसरात काढलेला सूर्योदयाचा फोटो माझ्या हातात ठेवला. माऊंटवरच होता. 'ओळखा फोटो..' एका तारेच्या कुंपणाचा संदर्भ घेत मी पटकन् बोललो. 'शालिनी स्टुडिओ परिसर,' 'शाब्बास हा तुम्हाला बक्षीस.' मी भारावलो. 'दो आँखे बारा हात,' 'नवरंग' सारख्या यशस्वी चित्रपटाच्या छायालेखकानी दिलेला तो फोटो मी कपाळाला लावला. फोटो घरी घेऊन सरळ शिवाजी चौकात गेलो. भोरीच्या दुकानात फ्रेम करण्यास टाकला. सायंकाळी घेऊन आलो. आज तो फोटो माझ्या बेडरुममध्ये आहे. त्यावर मी त्यांची ह्ट्टाने स्वाक्षरी घेतली होती. श्रीकांत डिग्रजकरांचा सकाळी सकाळी फोन आला. मी म्हणालो 'सुप्रभात' डिग्रजकर म्हणाले, 'राजादादा गेला' पेंढारकर परिवारातील चित्रपटाशी नाळ असणारा शेवटचा तारा खळकन निखळून पडल्याचा भास मला झाला. त्यागराज पेंढारकर सिनेमातला राजादादा आम्हाला पोरकं करुन गेला. पण असंख्य कलाकृती मागे ठेवून. त्यांच्या डोळ्यांनी टिपलेली चित्रं आता आपल्या डोळ्यात आसवं आणून पहायची. (लेखक ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत.) .. .. .. .. .. ..
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट