म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी ज्ञानदानाचे कार्य करताना शिक्षणक्षेत्रात रचनात्मक काम केले. स्वत:च्या नोकरीला तिलांजली देताना शिक्षकांना न्याय मिळवून दिला. ज्ञानदान व रस्त्यावरील संघर्ष करताना कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या भाषणांनी पंडित जवाहरलाल नेहरूही प्रभावित झाले. खर्डेकरांचे शिक्षण क्षेत्रातील रचनात्मक कार्य अद्वितीय होते,' असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर-निंबाळकर फाउंडेशन आणि जागर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बॅरिस्टर खर्डेकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील होते. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी बॅरिस्टर खर्डेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखविले. ते म्हणाले, 'खर्डेकरांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे होते. ते ज्ञानोपासक होते. त्यांनी शिक्षणक्षेत्रात अविश्रांत रचनात्मक कार्य केले. राजाराम, एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन परदेशात बॅरिस्टर परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. पण त्यांनी वकिली न करताना उच्चशिक्षणात प्राध्यापक म्हणून काम केले. राजाराम कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करताना दर्जेदार शिक्षणाबरोबर उत्कृष्ट प्रशासन यंत्रणा उभारली. त्या काळातील विद्यार्थ्यांना 'वुई आर राजारामियन' म्हणून अभिमान वाटावे असे कार्य केले. एकीकडे ज्ञानदानाचे कार्य करत असताना शिक्षकांच्या पगारासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. शिक्षकांना पगारवाढ करताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्यावर खर्डेकर व प्राचार्य एम. आर. देसाई यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून कागल, कोल्हापूर, वेंगुर्ला येथे शाळा व महाविद्यालयांची स्थापना केली.' कार्यक्रमाला माजी उपसचिव डी. पी. मेतके, शानूर मुजावर, सचिन तोडकर, प्रा. बी. जी. मांगले, संग्रामसिंह खर्डेकर, पीटर चौधरी, आदी उपस्थित होते. ०००
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट