फोटो आहे.
नांगरे - पाटील यांचे आवाहन, विशेष बैठकीचे आयोजन
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदच्या दिवशी कोल्हापूर, शहरात शांतता ठेवावी. खेड्यातून आलेले युवक, बाहेरचे लोक, अवैध व्यावसायिकांकडून मराठा आंदोलनास गालबोट लागणार नाही, याची विशेष काळजी मराठा समाजातील नेत्यांनी घ्यावी. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल', अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे - पाटील यांनी सोमवारी दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येथील दसरा चौकात सकल मराठा ठोक मोर्चातर्फे १३ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी भेट देऊन महानिरीक्षक नांगरे - पाटील यांनी मराठा नेत्यांसोबत मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
नांगरे - पाटील म्हणाले, ' ९ ऑगस्ट रोजीच्या बंद दिवशी कोणीही पोलिसांवर हल्ला करणार नाही, एसटीसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, यासाठी आंदोलनातील नेत्यांनी आचारसंहिता तयार करावी. सोशल मिडियातील चितावणीखोर मेसेजला तरूण बळी पडणार नाहीत, यावर लक्ष ठेवावे. शांततेचे आवाहन करण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती यांनाही येण्याची विनंती करू.'
पोलिस प्रमुख देशमुख म्हणाले, 'राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरला सामाजिक समतेचा संदेश दिला. शहराला वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे. अशा शहरात बंददरम्यान गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी. इतर जिल्ह्यात हिंसेच्या घटना घडत आहेत. कोल्हापुरात का नाही, असा चुकीचा समज करून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कुणीही वागू नये. '
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, 'आंदोलन सरकारवर दबाव आणण्यासाठी आहे. राज्यात विविध ठिकाणी हिंसा घडली, मात्र कोल्हापुरात शांततेने आंदोलन केले जात आहे. शांततेनेच आंदोलन करून आरक्षण मिळवणार आहोत.'
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले, 'मराठा आंदोलनासंबंधी मुख्यमंत्री चुकीचे वक्तव्य करून माफी मागतात. ते सातत्याने समाजाची दिशाभूल करीत आहेत. नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र त्यावेळी आचारसंहिता सुरू होणार आहे. त्यावेळी आचारसंहितेचे कारण पुढे जाण्याची शक्यता आहे.'
दिलीप देसाई म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांचे ऐकून पोलिसांनी आंदोलकांवर दबाव आणू नये. आंदोलन शांततेत सुरू आहे. पोलिसांना आम्ही सहकार्य करीत आहोत. मुख्यमंत्री, पालकमंत्री खोटे बोलतात, अशी समाजाची भावना झाली आहे. यामुळे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.'
जयेश कदम यांनी,नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्री राजीनामा देऊन निवडणुका जाहीर करणार का, असा सवाल उपस्थित केला.
याप्रसंगी माजी आमदार सुरेश साळुखे, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, सचिन तोडकर, राजू लिंग्रस, फत्तेसिंह सावंत, प्रा. जयंत पाटील यांनी विविध सूचना मांडल्या. यावेळी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह आंदोलनातील प्रमुख नेते उपस्थित होते.
..............
चौकट
संयुक्त राजारामपुरीतर्फे मंगळवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता रॅलीने जाऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संयुक्त राजारामपुरीतर्फे प्रसिध्दी पत्रकातून दिली. दरम्यान, प्रहार अपंग क्रांती आंदोलन, नवदुर्ग तरूण मंडळ, कोल्हापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशन, बहुजन सेवा, कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था, जिल्हा दळप, कांडप गिरणी मालक संघ, जिल्हा सहकारी संस्था गटचिटणीस संघटनेने पाठिंबा दिला. ९ ऑगस्टचा बंद शांततेत करण्याचे आवाहन छावा संघटनेचे अध्यक्ष राजू सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले.