म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर
'शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध योजना राबविल्या आहेत. क्षारपड जमिनी विकास, ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांना गरज असेल, तेव्हा कर्ज देण्यात येत आहे. जिल्हा बँकेची प्रगती साधण्यासाठी विकास सेवा संस्था अधिक चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत,' असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
जयसिंगपूर येथील इंद्रध्वज सभागृहात जिल्हा बँकेच्या वतीने शिरोळ तालुक्यात सभासद पातळीवर शंभर टक्के कर्जवसुली केलेल्या विकास संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी खासदार राजू शेट्टी, संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, 'अन्य बँकांच्या तुलनेत जिल्हा बँक सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देते. शेतकऱ्यांनीही आपली बँक समजून जिल्हा बँकेत ठेवी ठेवण्यास प्राधान्य द्यावे. उसाची बिले यापुढे जिल्हा बँकेत जमा होतील.'
खासदार राजू शेट्टी म्हणाले, 'जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी आधारवड असून बँक, सेवा सोसायट्या व शेतकरी यांच्यातील संबंध चांगले राहिले पाहिजेत. सोसायट्यांवरच शेतकरी अवलंबून असतो. यामुळे बँक व सोसायट्या अधिक चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. स्पर्धेच्या काळात शेतकऱ्यांना कमी व्याजाने अधिकाधिक कर्जपुरवठा झाला पाहिजे. मात्र, कर्जाच्या परतफेडीची क्षमताही आपल्याकडे असावी. सामान्य माणसाला सहकारी संस्थांचा आधार असून या संस्था मोडल्या जाऊ नयेत, याची दक्षताही घेण्याची गरज आहे.'
बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, 'अडीच वर्षांपूर्वी जिल्हा बँक तोट्यात होती. बँकेवर प्रशासक नियुक्ती केली होती. यानंतर आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील नव्या संचालक मंडळाने बँक प्रगतिपथावर नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. एकेकाळी राज्यात आदर्शवत असणाऱ्या जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी थकीत कर्जवसुलीचे योग्य नियोजन केल्यानेच बँक नफ्यात आली.'
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांनी स्वागत केले. १०० टक्के कर्जवसुली करणाऱ्या विकास संस्थांचा सत्कारही करण्यात आला. बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सावकर मादनाईक, बंडा माने, अमरसिंह पाटील, सुभाषसिंग रजपूत, सुरेश शहापुरे, रावसाहेब भिलवडे, संजय नांदणे, संजय बोरगावे, आदित्य पाटील-यड्रावकर, इकबाल बैरागदार, पै. केशव राऊत, आदिनाथ हेमगिरे यांच्यासह विविध विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
०००
एफआरपी द्यायची कशी?
चौदा दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी साखर विकणे अथवा ती तारण ठेवून पैसे उपलब्ध करणे, हे दोनच पर्याय आहेत. मात्र, साखर वेळेत विकली जात नाही. तर राष्ट्रीयीकृत बँकांनी साखर उद्योग डेंजर झोनमध्ये टाकला आहे. यामुळे एफआरपी चौदा दिवसांत द्यायची कशी, असा प्रश्न आहे. एफआरपीसाठी कारखान्यांना चौदा दिवसांचे बंधन घालू नये, अशी अपेक्षा आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
०००००
फोटो-
जयसिंगपूर येथे शंभर टक्के कर्जवसुली करणाऱ्या सेवा संस्था प्रतिनिधींचा सत्कार करताना बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ. शेजारी खासदार राजू शेट्टी, संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर, आदी. (छाया : राहुल मोरे, जयसिंगपूर)
००००००००