म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सुबद्धी द्यावी, यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी कोल्हापूर बंदची घोषणाही त्यांनी केली. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरमध्ये झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरेश पाटील म्हणाले, 'सरकारने गेल्या वर्षभरात मराठा समाजाला सोयी-सवलती देण्यासाठी सात अध्यादेश काढले. पण त्याची प्रभावी अंमलबजावणी केली नाही. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के फीमध्ये सवलत मिळेल असा आदेश काढला. पण, त्याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना झाला नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला राज्य सरकारने ४०० कोटी रुपयांचा निधी दिला. महामंडळाकडे १० हजा ५०० लोकांनी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यातील १५५ जणांना मदत मिळाली. त्यामध्ये मराठा समाजातील फक्त १२ नागरिकांना मदत मिळाली. हा सरकारी आदेश काढताना मराठा समाजाला कर्जच मिळू नये इतक्या जाचक अटी घातल्या आहेत', असा आरोप पाटील यांनी केला. 'मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली असली तरी या आयोगाला काम करता येऊ नये यासाठी कार्यालयासाठी मोठी जागा न देणे, पुरेसा स्टाफ न देणे असे प्रकार सरकारने केले आहेत. मराठा समाजाला गृहित धरण्याचे सरकारचे धोरण असल्याने, समाजाला आरक्षण मिळत नसल्याने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे' असे पाटील म्हणाले. माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले, 'समाजाने यापूर्वी शांततेत व सनदशीर मार्गाने आंदोलने केली. आता राज्य सरकारने आमचा अंत पाहू नये. मन आणि मनगट घट्ट असल्याने समाज आता आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी. आरक्षण देता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा.' महापौर शोभा बोंद्रे व माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष परेश भोसले, शहराध्यक्ष राहुल इंगवले, युवाध्यक्ष मोहन मालवणकर, बाबा महाडिक, श्रीकांत भोसले, भारत पाटील, मोहन साळोखे, आबा जगदाळे, राजू सावंत, अशोक नाईक, अमोल कल्याणकर, भारत तोडकर, संजय पाटील, संजय कुदळे, शिवसेना रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट