\Bवाहतूकदार करणार गनिमी काव्याने आंदोलन \B, सरकारी धान्य वाहतूकही रोखणार
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची तीव्रता वाढली असून, यापुढे गनिमी काव्याने आंदोलन होणार आहे. रात्रीच्या वेळेत होणारी मालवाहतूक रोखण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले असून वाहतूक ठप्प झाल्याने सुमारे १०० कोटींची उलाढाल थांबली आहे. सरकारी धान्य वाहतूकही रोखण्याचा इशारा आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या आंदोलनामुळे टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंधनाचे दर कमी करण्यासह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनमार्फत शुक्रवारपासून (ता. २०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन दिवसात या आंदोलनाची तीव्रता वाढली असून, आंदोलकांकडून महामार्गावरील मालवाहतूक रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोकुळ शिरगाव येथे रविवारी चाळीस ते पन्नास ट्रकच्या चाकांमधील हवा सोडली. यावर पोलिसांनी २० ते २५ आंदोलकांवर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. रविवारी रात्री उशिरा शाहू मार्केट यार्डमधून जाणारे दोन ट्रक आंदोलकांनी अडवले. या दोन्ही ट्रकच्या चाकांमधील हवा सोडून आंदोलकांनी ट्रकचालकांना दमदाटी केली. पुणे-बेंगळुरू महामार्गावर विकासवाडी येथे वाहने अडवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता, मात्र पोलिसांनी अटकाव केल्याने आता गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने घेतला आहे. याबाबत सोमवारी संध्याकाळी शाहूपुरीतील कार्यालयात बैठक घेण्यात आली. पोलिसांचा दबाव झुगारून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी या बैठकीत व्यक्त केला.
चक्काजाम आंदोलनामुळे बहुतांश वाहतूक थंडवली आहे. महामार्गांवर अवजड वाहनांची संख्या अगदीच कमी आहे. अत्यावश्यक सेवेतील दूध, औषधे आणि भाजीपाल्याची वाहने वगळता अन्य वाहनांची संख्या कमी आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापारी संघटनांनी दिली. विशेषत: कोल्हापुरातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणारी साखर, गूळ, खाद्यतेल, कडधान्यांची वाहतूक ठप्प आहे. याशिवाय औद्योगिक वसाहतींमधून बाहेर जाणाऱ्या धातूच्या वस्तूंची वाहतूकही ठप्प आहे. सिमेंट, कापड यालाही मोठा फटका बसला आहे. आणखी काही दिवस वाहतूक बंद राहिल्यास टंचाईच्या झळा सोसव्या लागतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी सकाळी धान्य व्यापाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील धान्यसाठ्याचा आढावा घेतला.
.............
चौकट
... तर बोंब मारो आंदोलन
आंदोलन सुरू असतानाही ट्रक भरणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना आंदोलकांनी लक्ष्य केले आहे. अशा ट्रान्सपोर्ट कंपन्यांना १० हजार, तर ट्रक मालकाला ५ हजारांचा दंड केला जाणार आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या दारात जाऊन बोंब मारो आंदोलन, मालकाच्या तोंडाला काळे फासणे असे आंदोलन करण्याचा निर्णय लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.
चौकट
चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा
वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनाला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. पाठिंब्याचे पत्र सोमवारी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनला मिळाले. याशिवाय खासगी ट्रॅव्हल्स चालक-मालकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली.
...............
कोट
'आंदोलनातील पहिले दोन दिवस वाहतूक सुरू राहिल्याने टंचाई जाणवली नाही. मात्र, रविवारपासून माल वाहतूक बंद आहे. तीन ते चार दिवस पुरेल इतकाच साठा व्यापाऱ्यांकडे आहे. आणखी काही दिवस वाहतूक बंद राहिल्यास टंचाईची स्थिती निर्माण होणार. वाहतूक बंद असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहारही बंद आहेत.
सदानंद कोरगावकर, पदाधिकारी, व्यापारी असोसिएशन
...........
कोट
' बांधकाम साहित्याची उलाढाल मोठी असते. गेल्या दोन दिवसात सिमेंटचे ट्रक आलेच नाहीत. पाऊस उघडल्याने सिमेंटची मागणी वाढत आहे. गोडाऊनमधील सिमेंटचा साठा चार ते पाच दिवस पुरेल इतकाच आहे. आंदोलनावर तोडगा न निघाल्यास बांधकामांवर याचा परिणाम होऊ शकतो.
उत्तम जाधव, सिमेंट वितरक