धोरणाअभावी लटकली पद मंजुरी
राज्यात प्राध्यापकांची नऊ हजार पदे रिक्त, अध्यापनासह अन्य कामकाजावर परिणाम
Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet:@Appasaheb_MT
कोल्हापूर
विद्यार्थ्यांच्या करिअरच्या टप्प्यामध्ये उच्च शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या सिनीअर कॉलेजच्या पातळीवर विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, संशोधन व गुणवत्ता वाढ यावर फोकस आहे. मात्र संपूर्ण राज्यभरात तब्बल नऊ हजार प्राध्यापक पदांची भरती झालेली नाही. रिक्त प्राध्यापकपदाच्या दुप्पटीहून अधिक शिक्षकेतर पदे राज्याच्या विविध विभागत रिक्त आहेत. भरती बंदीमुळे अध्यापनापासून प्रशासकीय कामकाज अशा पातळीवर 'प्रभारी' कामकाज सुरू आहे. जिमखाना, ग्रंथालय, विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामावर परिणाम होत असल्याचे संस्थाचालकांपासून प्राचार्य प्राध्यापकांपर्यंत सर्वांचेच म्हणणे आहे. विश्वसनीय माहितीनुसार रिक्त पदांच्या भरतीबाबत धोरण अद्याप ठरले नसल्याने भरती बंदीचा निर्णय हटेना असे चित्र आहे.
उच्च शिक्षण व अर्थ विभागाने जानेवारी २०१७ मधील विद्यार्थी संख्या गृहित धरुन तयार केलेल्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीच्या आकृतीबंधाला उच्च शिक्षण व अर्थ विभागाने मंजुरी दिली. मात्र रिक्त पदे शंभर टक्के की सत्तर टक्क्यांपर्यंत भरायची यासंबंधी धोरण ठरत नसल्याने पद भरतीचा निर्णय लटकला आहे. आता हा निर्णय मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी कमिटीपर्यंत पोहचला आहे. राज्यातील प्रत्येक विभागातील रिक्त पदांचा अहवाल शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून उच्च शिक्षण मंत्रालयाला सादर झाला आहे. ग्रंथपाल, शारिरिक शिक्षण संचलक, अधिव्याख्याते, प्रबंधक, अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, ग्रंथालय लिपिक, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, सहायक ग्रंथपाल, लेखपाल मिळून २६ प्रकारच्या पदांचा समावेश आहे.
शारिरिक शिक्षण संचालक नसल्यामुळे ठिकठिकाणी जिमखाना विभागाचे पॅकअप झाले आहे. सिनीअर प्राध्यापक निवृत्त झाल्यामुळे नव्याने पदे भरलेली नाहीत. परिणामी संशोधन प्रोजेक्टवर मर्यादा पडल्या आहेत. 'नॅक'च्या नव्या मूल्यांकन पध्दतीत पूर्ण भरती प्रक्रियेला गुण आहेत. भरती बंदीमुळे अपुऱ्या प्राध्यापकांच्या बळावर 'नॅक' मूल्यांकनाला सामोरे कसे जायचे असा प्रश्न कॉलेजिअसना सतावत आहे. रिक्त पदाबाबत महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत चर्चाही केली आहे. लोणावळा येथे महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेची बैठक झाली. बैठकीत रिक्त पदे व शैक्षणिक प्रश्नांसोबत दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यासाठी कोअर ग्रुपची स्थापना केली. ग्रुपच्या स्थापनेला ऑगस्टमध्ये तीन महिने होतात.
................
कोल्हापूर, सांगली व सातार जिल्ह्यातील रिक्त पदे
पदे मंजूर पदांची संख्या भरलेली पदे रिक्त पदे
अधिव्याख्याते ४२१४ २८२७ १३८७
शिक्षकेतर पदे ३८१२ २४३९ १३८२
एकूण ८०२६ ५२५७ २७६९
.............................................................
सांगली जिल्ह्यात ८३१ पदे भरतीविना (४३० शिक्षक, ४०१ शिक्षकेत्तर कर्मचारी)
कोल्हापूर जिल्ह्यात ९३५ पदे रिक्त (४८७ शिक्षक, ४४८ शिक्षकेत्तर कर्मचारी)
................
कोट
'प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्येवर पदमान्यता दिली जाते. ३१ ऑक्टोबर रोजीच्या पटसंख्येवर पदनिश्चिती केली होती. गेली तीन, चार वर्षे शिक्षण सहसंचालक कार्यालयाने पदमान्यतेचा कॅम्प आयोजित केले. कॉलेजनिहाय किती पदे मान्य आहेत, या संदर्भातील लेखी पत्र आजतागायत दिले नाही. दरम्यान, नियमित प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची पदांची भरती न झाल्यामुळे अध्यापन व प्रशासकीय अशा दोन्ही ठिकाणी परिणाम होत आहे.
डॉ. क्रांतिकुमार पाटील, अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन
..................................
'प्राध्यापक भरतीवरील बंदीमुळे अध्यापनापासून, विद्यार्थी केंद्रीभूत उपक्रमांपर्यत परिणाम झाला आहे. शिक्षणमंत्र्यांनी कोल्हापूर, नांदेड, पुणे येथे प्राध्यापक भरतीची घोषणा केली. पण अद्याप निर्णय झाला नाही. नेट, सेट, पीचडी पात्र होऊनही नियुक्त्या रखडल्याने संबंधित उमेदवारांचे नुकसान होत आहे. कौटुंबिक समस्या उदभवत आहेत. पात्रता असूनही नोकरी नाही, वाढते वय यामुळे अनेकांचे विवाह जुळत नाहीत अशी विचित्र स्थिती बनली आहे.
प्रा. डॉ. किशोर खिलारे, निमंत्रक, सेट नेट पीएचडी प्राध्यापक कृती समिती
...................