(फोटो आहेत)
निर्णय स्वागतार्ह पण निकषांचे काय?
किंवा
पारदर्शकता ठेवल्यास अभूतपूर्व निर्णय
साहित्य संमेलन अध्यक्ष निवड प्रक्रियेचे साहित्यिकांतून स्वागत
कोल्हापूर
लीड ,
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आता निवडणूक होणार नाही, तर निवड होणार आहे. घटक संस्थांनी सुचवलेल्या तीन साहित्यिकांच्या नावांतून एक नाव निवडण्याचे काम साहित्य महामंडळ करेल. साहित्यिकांसह वाचकांनीही या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आणि वाद ही परंपरा टाळण्यासाठी अध्यक्षपदाचे निकष काय असणार? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. योग्य निकष आणि निवड मंडळाने पारदर्शकता ठेवल्यास हा निर्णय अभूतपूर्व ठरणार आहे. साहित्यिक गुणवत्तेपेक्षा निवडून येण्याची क्षमता हाच निकष बळावत होता, त्यामुळे महामंडळाने केलेली घटनादुरुस्ती अनेक कसदार साहित्यिकांना अध्यक्षपदाच्या संधीपर्यंत पोहोचवणार आहे. जाणकार साहित्यिकांमुळे मराठी साहित्यासह भाषेचाही दर्जा सुधारेल आणि खऱ्या अर्थाने संमेलनांमध्ये 'साहित्य' दिसेल. मात्र,अध्यक्षपदाच्या निकषांवरून पुन्हा वाद होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
............
निवड समितीची मक्तेदारी नको
गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य महामंडळ आणि संमेलने यावर ठराविक लोकांची मक्तेदारी असलेली दिसते. अखिल भारतीय असे नाव असूनही दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोकण मराठी साहित्य सभा, आदी संस्थांना संलग्नता मिळत नाही. असे प्रकार कधी थांबणार? अध्यक्षपदासाठी निवडणूक थांबवून निवड प्रक्रिया राबवणे स्वागतार्ह आहे. मात्र, यात निवड समितीचा सच्चेपणा आणि पारदर्शकता गरजेची आहे. निवड समितीची मक्तेदारी बनली तर पुन्हा मागे सुरू होते त्याचाच अनुभव येणार. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा माझा अनुभव वाईट आहे. यात अनेकांचे हितसंबंध दडलेले असतात. संमेलनातील विशिष्ठ गटांचा प्रभाव कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. याची अंमलबजावणी करणे वाटते तितके सोपे नाही हे महामंडळाने लक्षात घ्यावे. जुना गोंधळ टाळून नवीन प्रक्रिया राबवावी.
चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिक
............
उशिरा सुचलेले शहाणपण
साहित्य महामंडळाने यापूर्वीच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. उशिरा का होईना, पण निर्णय घेतला हे महत्त्वाचे. निवडणूक प्रक्रिया रद्द करून निवड प्रक्रियेतून अध्यक्ष निवडण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. यापूर्वीच हा निर्णय घेतला असता तर कदाचित बा. भ. बोरकर, इंदिरा संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दिसले असते. निवडणूक प्रक्रियेतून दया पवार, शिवाजी सावंत अशा मोठ्या साहित्यिकांना दगदग सोसावी लागली. निवडून आलेल्या अनेक अध्यक्षांच्या साहित्यिक दर्जाबाबत आजही प्रश्नचिन्ह आहे. केवळ निवडून येण्याच्या क्षमतेवर ते अध्यक्ष बनले. साहित्य आणि भाषेच्या विकासासाठी त्यांनी काय केले, याचे उत्तर आजही मिळत नाही. नव्याने घेतलेला निर्णय साहित्य संमेलनांसह साहित्य आणि मराठी भाषेचाही दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. साहित्य संमेलनातील अध्यक्षांची भाषणेही आता दर्जेदार असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. निवडप्रक्रियेवरून वाद होऊ नयेत एवढीच अपेक्षा.
प्रा. डॉ. राजन गवस, मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ
.............
टुकार लेखकांना आळा बसेल
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन हे साहित्यिकांचे राहिले नसून, ते बिगर साहित्यिकांचे झाले आहे. कधी प्रशासक, कधी लेखकराव, तर कधी ग्रंथसंपादकांनीही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मिरवून घेतले. राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप हा पुन्हा वेगळाच मुद्दा. साहित्य संमेलनात साहित्य सोडून सारे काही सुरू होते. याच्या मुळाशी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया कारणीभूत होती. कोणीही टुकार लेखक त्याच्या राजकीय आणि आर्थिक बळावर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बसत होता. आता लेखकराव होऊ पाहणाऱ्यांना आळा बसेल. अध्यक्षांची निवड करण्याची मोठी जबाबदारी साहित्य महामंडळाकडे आली आहे. महामंडळाने जबाबदारीचे भान ठेवून दर्जेदार साहित्यिकांची निवड समिती तयार करावी. ज्यांनी साहित्य क्षेत्रात खरेच चांगले योगदान दिले, त्यांचीच निवड केली जावी. गरज पडल्यास ठराविक वर्षांनी निवड समितीची पूनर्रचना करावी. यामुळे निवड समितीचीही मक्तेदारी होणार नाही.
प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर, साहित्यिक
..............
निवड प्रक्रियेवरून वाद नकोत
अध्यक्षपदासाठी निवडणूक रद्द करून निवड प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय साहित्य संमेलनातील वादाची परंपरा खंडित करणारा ठरू शकतो. संपूर्ण साहित्य क्षेत्रासाठी हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. निवडणूक प्रक्रियेमुळे अनेक दर्जेदार साहित्यिक अध्यक्षपदापासून दूरच राहिले. विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विचारणा झाली. भालचंद्र नेमाडेंसारखे अनेक साहित्यिक आजही निवडणूक प्रक्रियेमुळेच अध्यक्षपदापासून दूर आहेत. वादाची परंपरा खंडित करण्यासाठी निवड प्रक्रियेचे स्वागत आहे. मात्र, निवड प्रक्रिया पारदर्शक असावी. साहित्य महामंडळाने सहयोगी संस्थांची मते आजमावून घ्यावीत. निवडलेल्या साहित्यिकाच्या नावावरून पुन्हा वाद होऊ नयेत, अन्यथा निवड झालेल्या लेखकाचा आणि त्याच्या साहित्याचाही अपमान होईल. राजकारणविरहित निवड प्रक्रिया राबवल्यास वाद होणार नाहीत, असे वाटते.
बाबा परीट, कथालेखक