\Bआपत्कालीन व्यवस्थापनाच्या अज्ञानाचे शिरोलीत दोन बळी\B राहुल मगदूम, कसबा बावडा पुलाची शिरोली येथे शिरोली हाउसिंग सोसायटीत कुळाच्या निष्काळजीपणामुळे गॅसची गळती होऊन झालेल्या स्फोटात मदतीसाठी धावून गेलेल्या दोघांचे बळी गेले. मदतीची भावना असावीच, पण आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अज्ञानामुळे नाहक महेंद्र पाटील आणि मारुती सुतार या दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेने दोन्ही कुटुंबांना जबर धक्का बसला असून, आपत्कालीन व्यवस्थापणाची गरजही अधोरिखित झाली. मूळचे चंदगड तालुक्यातील फाउंड्री उद्योजक के. के. पाटील यांनी १५-२० वर्षांपूर्वी एमआयडीसीत काम करत शिरोलीच्या माळवाडी भागात २००६ मध्ये प्लॉट खरेदी केला. दोन वर्षांपूर्वी दुमजली बंगला बांधला. यापैकी खालील पहिला मजला एमआयडीसीत मशीन ऑपरेटर म्हणून कामास असणारे मूळचे कर्नाटकातील दऱ्याप्पा पाटील यांच्या परिवाराला भाड्याने राहण्यासाठी दिला आहे. ३० मे रोजी सकाळी सातच्या सुमारास तळमजल्यावरून गॅसचा वास आणि धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पहिल्या मजल्यावर झोपलेला मोठा मुलगा महेंद्र पाटील यास त्वरित खाली बोलवले. आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी त्या खोलीत राहणारे निलव्वा कांडगोड, श्रावणी कांडगोड, सुधाराणी कांडगोड यांना बाहेर काढले आणि लगेच महेंद्र याने वडिलांच्या मदतीने तेथे असणाऱ्या चार दुचाकी बाजूला घेतल्या. महेंद्रने स्वयंपाकाच्या खोलीतील खिडकीची काच फोडून शेजारील शेतातील माती व वाळू टाकण्यास सुरवात केली. दरम्यान, आरडाओरडा ऐकून घराशेजारी शेतात पाणी पाजणारे सागर पाटील तसेच शेजारच्या घरातील देवपूजा करत बसलेला नीलेश पाटील, मारुती सुतार, नीलेश आढाव, यांनी तत्काळ धाव घेत स्वयंपाकघराच्या इतर खिडक्यांना असणाऱ्या काचा फोडल्या. सर्वजण वाळू टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. इतक्यात सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीचे लोट खिडकी व दरवाज्यातून बाहेर आले. यावेळी वाळू टाकणारे महेंद्र पाटील, मारुती सुतार, नीलेश आढाव हे आगीच्या भडक्यात सापडले. त्यात महेंद्रला व मारुतीला आगीच्या ज्वाळांनी वेढले. यात ते सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त भाजले. नीलेश पाटील यांच्या चेहऱ्यासह हाताला भाजले. तर सागर पाटील यांनी डोक्याला टॉवेल गुंडाळला होता त्यामुळे त्यांच्या डोक्याचा भाग आगीपासून बचावला. परंतु हात पोटासाह पाठीवर गंभीर इजा झाली. परिसरातील नागरिकांनी सर्वांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेतील जखमींमधील महेंद्र पाटील याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, त्याची झुंज अपयशी ठरली. आग विझवण्यासाठी धावलेले मारुती सुतार हेदेखील दुर्देवी ठरले. वरच्या मजल्यावर झोपलेला महेंद्र आगीत सापडू नये, यासाठी वडिलांनी त्याला खाली बोलवले. मात्र, स्फोटोमुळे तोच सर्वाधिक जखमी झाला. मारुती सुतार हे मूळचे तासगाव तालुक्यातील कुमठे येथील आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते शिरोली येथे राहत होते. आगीची घटना पाहून तेही मदतीला धावले, मात्र मदतीची भावना त्यांच्याच जिवाशी येईल याची कल्पनाही त्यांना आली नाही. के. के. पाटील यांची दोन्ही मुले महेंद्र आणि नरेंद्र हे दोघेही कंदलगाव येथील भारती विद्यापीठात शिकत होते. महेंद्रने बारावीत ९८ टक्के गुण मिळवून सिव्हिल पदविकेचा अभ्यास सुरू केला होता. त्याचे तिसरे वर्ष पूर्ण होऊन त्याने त्यामध्ये ९२ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले होते. लहानपणापासून लोभस व मनमिळावू असणाऱ्या महेंद्रचा सोसायटीपासून शाळा-कॉलेज पर्यंतचा मित्र परिवार मोठा होता. त्याच्या अचानक अपघाती जाण्याने मित्रांना मोठा धक्का बसला आहे. महेंद्र कोकणात गेला असता तर... महेंद्रचे मामा कोकणात असतात. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते आंबे देण्यासाठी कोल्हापुरात आले होते. सुटी असल्याने महेंद्र आणि नरेंद्र या दोघांनाही त्यांनी कोकणात येण्याचा आग्रह केला. लहान भाऊ नरेंद्र मामासोबत सुटीसाठी गेला. मात्र महेंद्रने नंतर येतो असे सांगून वेळ मारून नेली. महेंद्रने मामाचे एकले असते, तर कदाचित त्याच्या बाबतीत असे घडले नसते, असे म्हणून त्याच्या आई, वडीलांनी टाहो फोडला. आपत्कालीन व्यवस्थेचे अज्ञान निष्काळजीपणामुळे सिलिंडरचा स्फोट झाला त्याअगोदर काही मिनिटे धूर आला होता. गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गॅस गळती आणि आग सुरू असताना नेमके काय करावे, याची माहिती नसल्याने सर्वजण आग विझवण्यासाठी धावले. भडकणारी आग नसेल आणि छोट्या प्रमाणात आग असेल तरच विझवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा अग्निशामक यंत्रणेला कळवून आग विझवणे गरजेचे असते. अशावेळी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अज्ञानातून मोठी हानी होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट