जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
स्पर्धा परीक्षा अतिशय कठीण व खडतर असतात. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ला अभ्यासात झोकून द्यावे. दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरातही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू झाल्याने त्याला फायदा विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकू लागले आहेत हे एक चांगले लक्षण आहे, असे मत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केले. करिअर करण्यासाठी पालकांनी पाल्यावर इच्छा लादू नयेत, असा सल्लाही दिला.
हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये शनिवारी सुरू झालेल्या मटा एज्युफेस्टच्या उद्घाटनप्रसंगी 'प्रशासकीय सेवेतील संधी' विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. चाटे एज्युकेशन ग्रुप एज्युफेस्टचे मुख्य प्रायोजक आहेत.
जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'दहावी व बारावी नंतर पालक व विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडतो. अशावेळी मटा एज्युफेस्ट हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरला वळण देण्यास उपयुक्त ठरू शकतो. मटा एज्युफेस्टचे अतिशय नेटके नियोजन केले असून दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांना विविध शाखांची माहिती एका छताखाली उपलब्ध झाली आहे. दहावी व बारावीनंतर ठरावीक विद्यार्थी ध्येयानुसार वाटचाल करत असतात पण बहुतांशी विद्यार्थी व पालकांची द्विधा मन:स्थिती असते, याकडे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी लक्ष वेधले. आपल्याला यश मिळेल का याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असते. तर आपल्या मुलांने इजिंनीअर, डॉक्टर बनावे अशी पालकांची अपेक्षा असते. पालक आपल्या इच्छा मुलांवर लादत असतात. पालकांनी पाल्याच्या मनाचा कल, त्याची कोणत्या विषयात गती आहे याचे निरीक्षण केले पाहिजे. निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला उपजत कला दिल्या असतात. पालकांनी आपल्या मुलांतील कला जोपासण्यासाठी मार्गदर्शक राहिले पाहिजे. आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थी स्वत:ला झोकून देतात. त्यामुळे ते यशाची पायरी सहज गाठतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांची गळती मोठ्या प्रमाणात होते याकडे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी लक्ष वेधले. ६० टक्के विद्यार्थी दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. बारावीनंतर गळतीचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढते. फक्त २० टक्के विद्यार्थीच पदवी शिक्षण पूर्ण करतात. वीस टक्के विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी जरी आपण करत असलो तरी शिक्षण सोडलेल्या ८० टक्के विद्यार्थ्यांना किमान कौशल्य शिक्षणांकडे वळवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रशासकीय सेवेतील संधीवर बोलताना जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'स्पर्धा परीक्षा हा अतिशय कठीण व खडतर असतात. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला वाहून घ्यावे लागते. केंद्रीय लोकसेवा व राज्य सेवा परीक्षाचा अभ्यास बारावीपासून सुरू करण्याचा सल्ला त्यांनी दिला. बारावीनंतर ज्या शाखेत प्रवेश घेणार असतो त्या विषयांचा मुख्य परीक्षेत समावेश असतो. रोज १२ ते १४ तास अभ्यासाची तयारी ठेवली पाहिजे. पूर्वीच्या काळी अशा परीक्षांची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत नव्हती. आता दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरातही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या संस्था सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत चमकत आहेत.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, प्रशासकीय सेवा याबरोबर सध्या खेळांतही करिअर संधी आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोल्हापुरातील नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत ही उत्तम उदाहरणे आहेत. आयपीएल क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, प्रो कबड्डीमध्ये खेळाडूंच्यावर ५० लाखांपासून १० कोटींपर्यंत बोली लागत आहेत. तीन महिन्यांत खेळाडू लखपती, करोडपती होत आहे. ज्या प्रमाणे अभ्यास करताना नियोजन करावे लागते त्यामुळे खेळातील करिअर करण्यासाठी खेळाडूंना कष्ट, नियोजन यांची सांगड घालून जिद्दीने प्रवास करावा लागतो,' असे मत व्यक्त केले.
००००
मटाचे कौतुक
महाराष्ट्र व देशहिताचे विचार करणारे दैनिक महाराष्ट्र टाइम्स शालेय जीवनापासून वाचत आहे. निरपेक्ष, सडेतोड भूमिका असलेल्या मटाने महाराष्ट्राला तीन पिढ्यामध्ये बौद्धिक ज्ञानाची भर घातली आहे. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेऊन लेखन करणाऱ्या मटाने विद्यार्थी व करिअरकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे मत जिल्हाधिकारी सुभेदार यांनी व्यक्त केले.