आकृतीबंधाच्या सीमा ओलांडा
दमसासच्या ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभात डॉ. गोपाळ गुरु यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'मराठी भाषेत दर्जेदार साहित्यिक आहेत, मात्र साहित्यिकांनी आता आकृतीबंधाच्या सीमारेषा ओलांडण्याची गरज आहे. साहित्यिकाच्या आत्मपरीक्षणामुळेच हे शक्य आहे. साहित्यिकाचे आत्मभान वाढवण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे काम महत्त्वाचे आहे,' असे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये शुक्रवारी (ता. २५) पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी पी. विठ्ठल आणि अरुण इंगवले यांना राज्यस्तरीय काव्य पुरस्काराने तसेच विविध २७ साहित्यकृतींना पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक संजय मोहिते होते.
यावेळी बोलताना डॉ. गुरू म्हणाले, 'सामाजिक भान असल्याशिवाय कसदार साहित्य निर्मिती होत नाही. लेखकांचा अनेकांशी संवाद असावा, त्याचबरोबर त्याच्या साहित्याचे योग्य समीक्षणही व्हावे. मराठी भाषेतील लेखकांवर प्रस्थापित साहित्यिकांचा मोठा प्रभाव होता. गेल्या काही पिढ्या यातून बाहेर पडल्या नाहीत. नव्या लेखकांनी आता आकृतीबंधाच्या सीमारेषा ओलांडाव्यात. मराठीतील उत्तम साहित्याचा अन्य भाषांत अनुवाद करणे ही आजच्या काळाची गरज आहे. दमसासने यासाठी काम करावे.'
ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. आनंद पाटील यांनी ग्रंथ परीक्षणाचे निकष सांगितले. नवे लेखक प्रस्थापित साहित्याची झूल झुगारून लिहीत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. लेखकाला लोकल असूनही ग्लोबल होता आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पोलिस अधीक्षक मोहिते यांनी अलिकडच्या साहित्याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मराठी पुस्तकांचा खप कमी होत असल्याबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली जाते. मात्र, जगभरात इंग्रजी पुस्तकांचा खप अधिक आहे आणि ते लोक इंटरनेटचाही वापर मोठ्या प्रमाणात करतात. दर्जेदार साहित्याला वाचक आहेत. साहित्य दर्जेदार असेल तर वाचक ते स्वीकारतात.'
दमसासचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी प्रस्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. 'लेखकांना प्रोत्साहन देण्यासह नवीन पिढी लिहिती व्हावी यासाठीही दमसासचे काम सुरू आहे. यातूनच 'गौतमच्या कविता' हा बाल साहित्यिकाचा कविता संग्रह साकारला. साहित्याचा गांभीर्याने विचार करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासह चिकित्सक वाचक घडवण्याचाही प्रयत्न दमसासकडून सुरू आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन गोवा आणि उत्तर कर्नाटकातील साहित्यिकांच्याही कलाकृतींचा विचार दमसासमध्ये होतो.'
यावेळी पुरस्कारप्राप्त कवी पी. विठ्ठल, अरुण इंगवले यांच्यासह दत्ता मोरसे, अशोक जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. दमसासचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम, कार्यवाह गोविंद पाटील, गौरी भोगले, भीमराव धुळुबुळू, श्याम कुरळे, दि. बा. पाटील,आदी उपस्थित होते.
०००००००००
चौकट - पुरस्कारप्राप्त साहित्यिक
धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार
अरुण इंगवले (आबूट घेऱ्यातला सूर्य)
पी. विठ्ठल (शून्य एक मी)
दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
दत्ता मोरसे (झुंड), अशोक जाधव (भंगार), श्रीकांत पाटील (लिहू आनंदे), यशवंत माळी (किराळ), सतीश सोळांकूरकर (रुजवात), सुहास पंडित (शब्द माझ्या सोबतीला), रा. अ. गुरव (शाळेतल्या गोष्टी)
विशेष पुरस्कार
नवनाथ गोरे (फेसाटी), अर्जुन व्हटकर (मुक्या जंगलाची गर्जना), रवींद्र गुरव (सावट), अनुराधा खांडेकर (आर्त प्रीत), केशव हेरले (छत्रपती राजाराम महाराज), रुपा शहा (लेखा जोखा), बा. ना. धांडोरे (नागवंश), कोल्हापूरचा टोल लढा (विश्वास पाटील), भीमराव कुंभार (मी भीमराव कुंभार बोलतोय), रावसाहेब पुजारी (कोल्हापूर पर्यटन), मोहन लोंढे (मांग संस्कृती आणि भाषा), शिवाजी देसाई (एकसंध होताना), शरद गायकवाड (शंकर भाऊ साठे), प्रतीक पाटील (ऑफिशिअल सिक्रेट), सुभाष कोरे (कर्मयोगी डॉ. एस. एस. घाळी), गौतमच्या कविता (गौतम पाटील), उर्मिला शहा (घायाळ आभाळ), प्रल्हाद कुलकर्णी (साहित्याचे पश्चिमरंग)