जि.प. लोगो
.......................
पूरस्थितीत स्थलांतराचे आव्हान
जिल्हा परिषदेच्या आपत्कालीन आराखड्याच्या अंमलबजावणीत अडचणीची शक्यता
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्हा परिषदेने अतिरिक्त पावसाची शक्यता गृहीत धरुन आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. अतिवृष्टीने जिल्ह्याला अनेकवेळा पुराचा फटका बसून अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशा स्थितीत परिषदेच्या आपत्कालीन कक्षाकडे स्वयंचलित बोट नसल्याने नदी काठावरील गावे व पूरबाधित क्षेत्रातातील नागरिकांचे कसे स्थलांतर करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेकडे असलेल्या ४४ नौका या मनुष्यचलित असल्याने याच नौकांमधून धोकादायक परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करावे लागणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा आपत्कालीन आराखडा कागदावर मजबूत वाटत असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहेत.
हवामान विभागाने यावर्षी मान्सूनचे निर्धारीत वेळेपूर्वी आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच गेल्यावर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो झाली होती. सद्य:स्थितीत सर्व धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठी असल्याने यावर्षी धरणे लगेच भरण्याची शक्यता आहे. धरणे लवकर भरली आणि पावसाचा कालावधी वाढल्यास पुराची शक्यता गृहीत धरुन आपत्कलीन आराखडा तयार केला आहे. आराखडा तयार करताना ग्रामीण भागातील, रस्ते, शाळांच्या खोल्या, नदीकाठावरील गावांचा सर्वे, आरोग्य सुविधा व औषधसाठा यांचा यामध्ये समावेश केला आहे. आराखड्यामध्ये अजूनही दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.
मात्र तयार केलेल्या आराखड्यामध्ये पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी अत्यंत तोकडी यंत्रणा तैनात केली आहे. पूरस्थितीमध्ये नदीकाठावरील गावांबरोबर संपर्क अथवा स्थलांतर करण्यासाठी ४४ लाकडी नौका तयार ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व नौका मनुष्यचलित आहेत. जिल्हा परिषदेकडे एकही स्वयंचलित बोट नसल्याने यावर मर्यादा येणार आहेत.
पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची डागडुगी करण्यास मात्र सुरुवात केली आहे. बाजूपट्ट्या भरण्याबरोबरच रस्त्याच्या बाजूने नवीन चर अथवा जुन्या चऱ्यांची दुरुस्ती सुरु आहे. तसेच रस्त्यावर येणाऱ्या मोऱ्यांचीही दुरुस्ती सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या खोल्यांचा सर्व्हे पूर्ण झाला असून धोकादायक खोल्यांची दुरुस्ती शाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार आहे.
पावसाच्या कालावधित साथीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील १,२१७ गावे आणि १,०३० ग्रामपंचायतींना नियमित आरोग्य सेवा देण्यासाठी ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाच प्राथमिक आरोग्य पथके व आठ तालुका दवाखाने, ४१३ उपकेंद्रे अशी ५१६ आरोग्य संस्थामार्फत २४ तास आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. यासाठी पुरेसा औषधसाठाही करुन ठेवण्यात आला आहे.
..........
चौकट
अतिपावसामुळे वाहतूक खंडित होणारे रस्ते
२८
इतर जिल्हा मार्ग
३०
ग्रामीण मार्ग
५८
............
पूरस्थितीत नौकांचा वापर होणारी गावे
बीड, गाडेगोंडवाडी, हसूर (करवीर) डोणेवाडी, कौलगे, हिटणी (गडहिंग्लज), नृसिंहवाडी, कवठेसार, कुटवाड, आकिवाट, घालवाड, हसूर, कवठेगुलंद, गणेशवाडी, जुने दानवाड, राजापूर, राजापूरवाडी, धरणगुत्ती, कनवाड, खिद्रापूर, शिरढोण, आलास, बस्तवाड (शिरोळ), कसबा ठाणे, नणुंद्रे, बोरगांव पैकी देसाईवाडी, देवठाणे, कोलोली, परखंदले-गोठे (पन्हाळा), वेतवडे, टेकवडे (गगनबावडा), चिखली, बेलवळे बुद्रुक (कागल), घुणकी, निलेवाडी, चंदूर, खोची, चावरे (हातकणंगले), येळवडे, आवळी बुद्रुक (राधानगरी), कापशी, थेरगांव (शाहूवाडी)
.................
तीन गावांचा संपर्क तुटतो
जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावती, कुंभी, ताम्रपणी आदी नद्यांना पूर आल्यानंतर जिल्ह्यातील तीन गावांचा संपूर्ण संपर्क तुटतो. त्यामध्ये टेकवडे (ता. गगनबावडा), बर्की (ता. शाहूवाडी), पिळणी (ता. चंदगड) या गावांचा समावेश असून या गावातील ग्रामस्थांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.
.................
जिल्हा परिषदेकडील प्रमुख औषधांचा साठा
पॅरासिटेमॉल - दोन लाख
सिप्रो - सहा हजार
सेप्ट्रन एसएस - ३० हजार
ओआरएस - ९१ हजार ९६
फ्रुजोलिडिंन - पाच लाख ५३ हजार
रिंगर लॅक्टेट - २३ हजार
आयव्ही - दहा हजार
रँटिडिंन - दोन लाख
...............
३१ मेपर्यंत होणारी कामे
धोकादायक स्थळांची दिशादर्शक फलकांतून माहिती
गटर व नाले सफाई
पुलांची तपासणी
आपत्कालीन पथकांची निर्मिती
धोकादायक शाळा खोल्यांचा सर्व्हे