पान ६ मेन
दुकॉलमी फोटो
ऑन दि स्पॉट ... लोगो
...........................
दबावतंत्रामुळे वारणाकाठी खदखद
जशास तसे उत्तर देण्याचा ग्रामस्थांचा इशारा, आंदोलनाची व्याप्ती वाढू लागली
अजय जाधव, जयसिंगपूर
इचलकरंजी शहराची अमृत योजना कार्यान्वित झाल्यास भविष्यात वारणाकाठच्या गावांना पाणीटंचाई भेडसावेल या शक्यतेमुळे नदीकाठच्या गावांचा विरोध कायम आहे. शिरोळ तालुक्यातील दानोळी हे गाव या आंदोलनाचे केंद्र बनले आहे. गेल्या बुधवारी येथे वारणा बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. यानंतर १४९० जणांवर गुन्हे दाखल झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. कृष्णा नदीतून पाणी योजना असताना इचलकरंजीकरांचा वारणेच्या पाण्याचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारणेच्या पाण्याचा थेंबही देणार नाही, प्रसंगी जशास तसे उत्तर देवू अशी ग्रामस्थांची भूमिका असून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.
इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी ७० कोटीची योजना मंजूर झाली. मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अमृत योजनेच्या कामाचा ऑनलाइन प्रारंभही झाला. मात्र अद्याप या योजनेचे काम सुरू नाही. या योजनेचे जलउपसा केंद्र दानोळी येथे होणार आहे. दोन मे रोजी या योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार असल्याने दानोळीसह वारणा काठचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. दगड टाकून तसेच टायर्स पेटवून रस्ते अडविल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला अन् अधिकाऱ्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. दरम्यान यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठा योजनेस विरोध केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तब्बल १४९० जणांवर गुन्हा दाखल केला.
वारणा काठच्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्याने दानोळीसह वारणा काठी खदखद आहे. मुळातच चांदोली धरणाची क्षमता तीन टीएमसीने कमी आहे. वारणा काठच्या गावांना उन्हाळ्यात पाणीप्रश्न भेडसावतो. इचलकरंजी शहरास पाणी दिले तर आणखी भिषण स्थिती निर्माण होईल, नदीकाठच्या ७० गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल अशी ग्रामस्थांना भीती आहे. यामुळेच आपल्या हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आंदोलन सुरू आहे. इचलकरंजी शहरासाठी पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांवरून पाणी योजना असताना वारणेच्या पाण्याचा अट्टाहास कशासाठी असा वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांचा प्रश्न आहे. कृष्णा योजनेला गळती लागल्याने पाणी प्रश्न निर्माण होतो. यामुळे ही योजनाच सक्षम करावी असेही त्यांचे मत आहे.
अमृत योजनेचा प्रश्न चर्चेने सोडविण्यासाठी यापूर्वी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या. मात्र यानंतरही योजनेस विरोध कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना पूर्णत्वास जावू न देण्याचा निर्धार वारणा बचाव कृती समितीने केला आहे. दोन मे रोजी दानोळीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून अमृत योजनेच्या कामास प्रारंभ करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे सरकार व प्रशासनाविरूध्द दानोळी तसेच परिसरातील गावामध्ये संताप व्यक्त होत आहे. इचलकरंजी येथील लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाला हाताशी धरून दबातंत्राचा वापर केला जात असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. यामुळेच आंदोलन तीव्र करण्याबरोबरच त्याची व्यापकता वाढविण्यासाठी वारणाकाठचे ग्रामस्थ एकवटले आहेत. अमृत योजनेसाठी दानोळी येथे वारणा नदीकाठी जलउपसा केंद्राची जागा अद्याप निश्चित नाही. यामुळे दंडुकशाही खपवून घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. इचलकरंजी शहरासाठी एक टीएमसी आरक्षित पाणी उचलले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र भविष्यात हा पाणी उपसा तीन टीएमसीपर्यंत होईल अशी ग्रामस्थांत भीती आहे.
आपल्या हक्काचे पाणी वाचविण्यासाठी वारणाकाठच्या ग्रामस्थांनी सुरू केलेल्या या आंदोलनात आता ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील ग्रामस्थांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. तर शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी या आंदोलनास उघडपणे पाठिंबा दिल्याने आंदोलनास बळ मिळाले आहे. शिरोळ तालुक्यातील गावांनीही कडकडीत बंद पाळून वारणा बचाव कृती समितीच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. वारणेचे पाणी दबावतंत्राने नेण्यात येणार असेल तर पाण्यासाठी प्रसंगी छातीवर गोळया झेलण्याची तयारी ग्रामस्थांनी ठेवली आहे. अमृत योजनेच्या विरोधातील आंदोलनाचे दानोळी हे केंद्र बनले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असली तरी पाण्यासाठी अबालवृध्दांची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.
...............
चौकट
..तर शिरोळ तालुक्याला फटका
दानोळी बंधाऱ्यातून पुढे जाणारे वारणेचे पाणी हरिपूरजवळ कृष्णा नदीत मिसळते. वारणेच्या या पाण्याचा लाभ जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड या शहरांसह शिरोळ तालुक्यातील अन्य गावांना होतो. इचलकरंजी शहराची अमृत योजना कार्यान्वित झाल्यास वारणेचे पाणी कृष्णा पात्रात मिसळणार नाही. परिणामी शिरोळ तालुक्यातील गावांना सांगली शहरातील शेरी नाल्यामुळे दुषित झालेले कृष्णा नदीचे पाणी प्यावे लागेल, अशीही नागरिकांना भीती आहे.
............................................
आंदोलनास मिळतेय बळ
कोल्हापूर व इचलकरंजी शहरातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असल्याने पंचगंगा नदीचे पाणी दुषित होते. शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीकाठच्या गावांना कोणत्याही प्रक्रियेशिवाय हे पाणी प्यावे लागते. वारंवार आंदोलने करूनही पंचगंगा प्रदुषणाबाबात प्रशासन गांधारीची भूमिका घेते. प्रदुषण करणाऱ्या घटकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. आता इचलकरंजी शहरासाठी थेट वारणा नदीतून अमृत योजना झाल्यास पंचगंगा नदीच्या प्रदुषणात आणखी वाढ होईल, या शक्यतेमुळे वारणा बचाव कृती समितीच्या आंदोलनाला शिरोळ तालुक्याचे बळ मिळत आहे.
............................
कोट
पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी पुढाकार घ्यावा
'इचलकरंजी शहराचा वारणेच्या पाण्यावर हक्क नाही. बळाचा वापर करून अमृत पाणी योजना राबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असला तरी त्यांना वारणेचे थेंबही पाणी देणार नाही. इचलकरंजीच्या नागरिकांना शुध्द पाणी मिळू नये हा आमचा उद्देश नाही. सध्या कृष्णा नदीत मिसळलेले वारणेचे पाणी त्यांना मिळते. पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांना मदत करू.
- महादेव धनवडे, अध्यक्ष वारणा बचाव कृती समिती
...............
आंदोलनाची व्याप्ती वाढविणार
इचलकरंजी पालिकेस वारणा नदीच्या उगमापासून हरिपूरच्या संगमापर्यंत पाणी उपसा करू देणार नाही. त्यांनी पंचगंगा शुध्दीकरणासाठी प्रयत्न केल्यास अन्य गावांनाही शुध्द पाणी मिळेल. हक्काच्या पाण्यासाठी आम्ही भूमिका मांडत असताना खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आता कोणत्याही परिस्थितीत वारणेचे पाणी देणार नाही. सांगली जिल्ह्यातील सांगाव येथे ११ मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.
- मानाजीराव भोसले, सचिव वारणा बचाव कृती समिती
..............
आता जशास तसे उत्तर
इचलकरंजी शहरासाठी अमृत योजनेतून करण्यात येणारा पाणी उपसा कागदावर एक टीएमसी असून प्रत्यक्षात तीन टीएमसी होणार आहे. वारणाकाठचा शेतकरी या षडयंत्रास फसणार नाही. अमृत योजना कार्यान्वित झाल्यास वारणाकाठच्या गावांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होईल. पाणी योजना राबविली जावू नये यासाठी हात जोडून विनंती केली, मात्र प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले. आता जशास तसे उत्तर दिले जाईल.
-रावसाहेब भिलवडे, माजी उपसरपंच, दानोळी