म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महिलांवरील वाढते अत्याचार, शिक्षणाचे सुरू असलेले खासगीकरण, हमीभाव आणि विचारवंताच्या खुन्यांना पकडण्यात अकार्यक्षम ठरलेल्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे हजारो कार्यकर्ते शुक्रवारी रस्त्यावर उतरले. 'कष्टकरी कामगारांचा विजय असो', 'तक्त बदलो, राज बदलो' अशा घोषणा देत पक्षाचे झेंडे आणि विचारवंतांची पोस्टर हातातून घेऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. भाकपच्या कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोर्चाद्वारे असंतोष व्यक्त केला. मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिल्यानंतर झालेल्या सभेत केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सडकून टीका केली.
शिक्षणाचे खासगीकरण आणि धार्मिकीकरण, असंघटित कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे निर्णय आणि पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ अशा सर्वच घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या भाकपच्या वतीने पाच जिल्ह्यांच्या विभागीय मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखाली टाउन हॉल येथून सुरुवात झाली. मोर्चाची वेळ दुपारी १२ वाजता असताना पक्षाचे कार्यकर्ते सकाळी साडेदहापासून मोर्चास्थळी दाखल झाले होते. 'आमदार-खासदारांना पेन्शन, मग आम्हाला का नाही?', 'कष्टकरी कामगारांचा विजय असो', 'गोविंद पानसरे अमर रहे', 'मोदी, फडणवीस, पालकमंत्री चले जाव' असा नारा देत मोर्चाला सुरुवात झाली.
मोर्चा टाउन हॉल, माळकर तिकटी, शिवाजी रोड, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. हातात पक्षाचे झेंडे, छत्रपती शाहू, भगतसिंग, पानसरे यांची पोस्टर घेऊन हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये महिला, युवक व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे दोन तासांच्या मोर्चानंतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह कायम होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर सभा सुरू झाली.
सभा सुरू झाल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, बी. एल. बरगे, दिनकर सूर्यवंशी, अनिल चव्हाण यांचा समावेश होता. निवासी जिल्हाधिकारी शिंदे यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आल्यानंतर सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सांगलीचे रमेश सहस्रबुद्धे म्हणाले, 'डॉ. दाभोलकर, पानसरे यांचे खुनी कोण आहेत हे माहीत असूनही सरकार त्यांना पकडत नाही. तपास यंत्रणांनीही तपास करण्यास सक्षम नसल्याचे कोर्टापुढे सांगितले आहे. त्यामुळे अशा अकार्यक्षम सरकारला लाल वादळ उलथवून टाकेल. यासाठी कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता आहे.'
सोलापूरचे प्रवीण मस्तूद म्हणाले, 'जाती-धर्माचा आधार घेऊन सर्वसामान्यांवर दोन्ही सरकारकडून हल्ला केला जात आहे. सरकारविरोधातील आवाज 'मेस्मा'च्या माध्यमातून दाबला जात आहे. १,३०० शाळा आणि २५ अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्ती बंद करून विविध समाजांना आरक्षणाचे गाजर दाखविले जात आहे. आश्वासनाच्या माध्यमातून जनतेची फसवणूक करताना अण्णा हजारेंसारखे बुजगावणे उभे केले जात असून महिला, मुलींवर अत्याचार होत असून याविरोधात आवाज उठवणाऱ्या बापाला धमकी दिली जात आहे. ज्या देशात बापच सुरक्षित नाही, तेथे महिला कशा सुरक्षित राहणार आणि 'बेटी बचाव' मोहीम कशी यशस्वी होणार?'
'गोरगरिबांसाठी लढणारे पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या डॉ. दाभोलकरांचे खुनी सापडत नाहीत. दोन्ही खून सरकार पुरस्कृत असून, सरकारला देशाचे संविधान संपवायचे आहे. आपले अपयश लपविण्यासाठी सरकार जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप सतीशचंद्र कांबळे यांनी केला.
यावेळी पुण्याच्या लता भिसे, शाम चिंचणे, अरविंद जक्का यांची भाषणे झाली. मोर्चात दत्ता मोरे, सुमन पाटील, सुमन पुजारी, स्वाती क्षीरसागर, हणमंता लोहार, रघुनाथ कांबळे, नामदेव पाटील, सुनंदा खाडे, गिरीश फोंडे, मारुती निकम यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
.........................
मोर्चातील मागण्या...
विचारवंतांच्या खुन्यासह सूत्रधारांना कडक शिक्षा द्या
दीडपट हमीभाव व विनाअट कर्जमफी, पेन्शन द्यावी
असंघटित कामगारांना किमान वेतन द्या
शिक्षणाचे खासगीकरण व धार्मिकीकरण बंद करा
महिलांवरील अत्याचार थांबवा