फोटो दुकॉलमी
............................
वारणाकाठचे शेतकरी आक्रमक
जुने पारगावमधील पाणी परिषदेत 'अमृत' योजनेला विरोध
म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले
'वारणाकाठावरील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम इचलकरंजीसाठी होणाऱ्या 'अमृत' योजनेतून होत असल्याने याविरोधात दानोळी ग्रामस्थांनी उभारलेल्या वारणा बचाव कृती समितीस जाहीर पाठींबा असून पुढील लढ्यात पूर्ण ताकदीने उतरू. त्याचबरोबर ही अमृत योजना उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही',असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील यांनी दिला.
इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीवरुन प्रस्तावित 'अमृत' योजनेस वारणाकाठाच्या सर्वच गावांतून विरोध करण्यासाठी वारणा बचाव कृती समितीच्या वतीने जुने पारगाव(ता. हातकणंगले)येथे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठच्या प्रमुख कार्यकर्त्यांची पाणी परिषद बोलविण्यात आली होती. यावेळी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील (भुयेकर)होते.
यावेळी बोलताना वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, 'वारणा नदीचे उजवा कालवा आणि डावा कालवा असे दोन विभागात नियोजन आहे. नियोजनात उजवा कालवा ११७ कि.मी.चा असून त्याचे काम ३० कि.मी. झाले आहे आणि डावा कालवा ७० कि.मी.चा आहे पण त्याचे काम कमी झाले आहे. संभाव्य अमृत योजनेस आजपर्यंत वारणा काठावरील पस्तीस गावांनी,निषेध,गावबंद,उपोषणे आणि गावसभेचे विरोधात ठराव दिलेले आहेत. चांदोली धरण बांधताना धरणातील पाणीसाठा हा सिंचनासाठी १८.०५ टीएमसी, पिण्यासाठी ९.५५ टीएमसी, उद्योगासाठी १.२७ टीएमसी, तसेच वापरात न येणारे पाणी यामध्ये बाष्पीभवन १.२८ टीएमसी आणि मृत साठा ६.८८ असा एकूण साठा ३७.४८ इतका अपेक्षित होता. मात्र धरण ३४.३९ चे बांधले आहे. म्हणजे धरण क्षमता ही गरजे पेक्षा ३.०९ टीएमसी ने कमी आहे. मुळातच ३.०९ टीएमसी कमी क्षमतेने बांधण्यात आलेल्या या धरणातील बहुतांशी उद्दिष्ट पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे धरणात पाणी साठा जास्त दिसत आहे. ठरल्याप्रमाणे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास मुळातच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे इचलकरंजीला पाणी देण्याचा प्रश्नच येत नाही. सध्या वारणा लाभक्षेत्रात २८३ गावे आहेत पैकी फक्त ८२ गावाना पाणी मिळाले आहे तर बाकी २०१ गावांना अद्याप वारणेचे पाणी मिळालेले नाही. तर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे २०० संस्थांचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे सध्या असणारा पाणी साठा कमी पडणार असून पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली इचलकरंजीकरांचा प्रोसेस व कापड उद्योगासाठी पाणी नेण्याचा डाव असून हे पाणी पुन्हा प्रदूषित होऊन ते पंचगंगा नदीमार्गे कृष्णा नदीच्या पात्रात मिसळणार आहे. '
कुंभोज सरपंच प्रकाश पाटील म्हणाले, 'कागदोपत्री जेवढे पाणी उपसणार असल्याचे दाखविले आहे, त्यापेक्षा तिप्पट पाण्याचा उपसा सुमारे चार हजार हॉर्सपॉवरच्या पंपाद्वारे २४ तास या योजनेतून होणार असल्याने शेतीसाठी पाणीच उरणार नाही. त्यामुळे वारणा काठी पुन्हा १९७२ ची दुष्काळ सदृष्य परिस्थिती उद्भवणार आहे.'
वारणा बचाव कृती समितीचे सचिव मानोजीराव भोसले म्हणाले, 'वारणा नदीवरुन इचलकरंजीला दररोज सुमारे एक कोटी लिटर पाणी नेण्याच्या अमृत योजनेस सरकारने मान्यता देऊन त्याचे टेंडर नुकतेच काढले. मात्र अगोदरच वारणाकाठावरील शेतीला पाणी अल्प प्रमाणात मिळत असताना व इचलकरंजीला दोन-दोन नद्यांच्या योजना कार्यरत असताना तिसऱ्या योजनेचा घाट घालून वारणाकाठच्या शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे.'
जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, किणीकर यांनी काळम्मावाडीचे शुद्ध पाणी इचलकरंजीपासून चार किलोमीटर वर आले असताना १७ किलोमीटर लांबीच्या पाईप लाईनचा प्रस्ताव मंजूर करण्याचे कामच काय, असा सवाल केला. बाबासाहेब पाटील(भुयेकर) यांनी वारणाकाठच्या लोकांनी या योजनेस कडाडून विरोध करावा, असे आवाहन केले.
यावेळी जगन्नाथ पाटील (ढवळी),माजी जि.प. सदस्य सुरेश कांबळे, गब्रू गावडे आदींनी मनोगत व्यक्त केले. वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुभाष भापकर,शिवाजीराव सिद,बाबासाहेब मोरे,इंद्रजित पाटील,सरपंच अरविंद पाटील, सुधा डोईजड यांच्यासह वारणा बचाव कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत बाबासाहेब मोरे यांनी केले. वीरभद्र डोईजड यांनी आभार मानले.
---------------------------
चौकट
वारणेचे पाणी पेटणार
इचलकरंजी शहरासाठी होणाऱ्या अमृत योजनेला वारणाकाठावरील सर्वच गावांनी तीव्र विरोध केला आहे. बचाव समितीच्या वतीने लवकरच ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील वारणाकाठावरील गावांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याने येत्या काळात वारणेचे पाणी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
..................
फोटो - जुने पारगाव (ता.हातकणंगले)- येथे वारणा बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत बोलताना शहाजीराव पाटील. यावेळी उपस्थित बाबासाहेब पाटील (भुयेकर),मानोजीराव भोसले,महादेव धनवडे, बाबासाहेब मोरे, शिवाजीराव सिद आदी.