संशोधन ठरणार समाजोपयोगी
विद्यार्थ्यांचे पीएचडी प्रबंधांमधील समाजभान कौतुकास्पद
Anuradha.kadam@timesgroup.com
Tweet:@anuradhakadamMT
कोल्हापूर : शिक्षण हे समाजाला दिशा देणारे असावे ही उक्ती सार्थ ठरवणारे उच्चशिक्षणातील संशोधनप्रबंध समाजाला उपयुक्त ठरणारे आशय मांडत आहे. यंदाही शिवाजी विद्यापीठातून पीएचडी पदवी संपादन केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी निवडलेले विषय समाजासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. प्रबंधांमधील समाजभान कौतुकास्पद तर आहेच, पण संशोधन केवळ पदवीपुरते सीमित न राहता ते समाजातील समस्यांच्या सोडवणुकीचा स्रोत बनले पाहिजे हा विचारही संशोधन तरुणाई अधोरेखित करत आहे.
यावर्षी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात कला, वाणिज्य, शास्त्र या प्रमुख विद्याशाखांसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विषयात २३९ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. गेल्या काही वर्षांत संशोधनाला सामाजिक संदर्भ असलेल्या विषयांची जोड देण्याकडे कल वाढत आहे. भाषेसंदर्भातील विषयांमध्ये समाजाच्यादृष्टीने प्रत्यक्ष अमलात येईल असे संशोधन करण्यासाठी कमी वाव मिळतो. मात्र हा प्रवाह शास्त्र, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्र, पत्रकारिता व गृहविज्ञान यांसारख्या विषयांमध्ये अधिक गतिमान होण्याची संधी असल्याने विद्यार्थ्यांच्या संशोधनात यावर्षी समाजाला दिशादर्शक ठरणाऱ्या संशोधनाचा आलेख वाढता आहे.
शिवाजी विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांतील अनेक विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी आरोग्यविषयक समस्या, त्याची कारणे, बदलते राहणीमान, फास्टफूड संस्कृती यावर भाष्य करत आरोग्याशी निगडित संशोधन केले आहे. गृहविज्ञान व फूड टेक्नॉलॉजी या विषयातील पदव्युत्तर पदवीनंतर संशोधन प्रबंधाकडे वळलेल्या या विद्यार्थ्यांचे प्रबंध व त्यामध्ये मांडलेल्या अहवालातील नोंदी निश्चितच उपयुक्त ठरतील अशा आहेत. विद्यापीठातील फूड टेक्नॉलॉजीच्या सिद्धार्थ लोखंडे व इराण्णा उडचण यांनी 'हेल्थ इज वेल्थ' या संकल्पनेवर संशोधन प्रबंध सादर केले आहेत. त्याचा उपयोग व्यक्तिगत व सामाजिक या दोन्ही पैलूंनी प्रत्यक्ष अनुकरणीय ठरणार आहे. तर सरिता कसराळकर या विद्यार्थिनीने गृहविज्ञान विषयातून सादर केलेला प्रबंधही आहार व आरोग्य यांची सांगड घालणारा आहे.
आरोग्याशी निगडित पण आजार व व्याधींवर नियंत्रण ठेवणाऱ्या औषधांच्या संशोधनावर जीवरसायनशास्त्रातील संशोधन फायदेशीर ठरणार आहे. या विभागातील तानाजी मोरे याने मधुमेह आजारावर मात करणारे तंत्रज्ञान संशोधनातून मांडले आहे. इन्सुलीन या घटकाने मधुमेहींना दिलासा दिला असला तरी यासारख्या अन्य घटकांपासून मधुमेह नियंत्रित करण्याचे संशोधन केले आहे. गेल्या वर्षभरात या विभागातील दहा विद्यार्थ्यांनी मधुमेह विषयावर केलेले संशोधन वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून उपयुक्त ठरू शकते
पर्यावरणशास्त्र व भूगोल यंदा सादर करण्यात आलेले प्रबंध हे प्रदूषण समस्यांना उत्तर शोधणारे आहेत. यामध्ये पल्लवी भोसले, हेमंत सावंत व जालंधर पाटील यांच्या प्रबंधांमध्ये पर्यावरणावर आक्रमण करणारे घटक व त्यांचा सामाजिक आरोग्यावर होणारा परिणाम या अनुषंगाने मांडलेली निरीक्षणे भविष्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
सामाजिक शास्त्रांमध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांतील संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांना सामाजिक सद्य:स्थितीची जोड आहे, तर गेल्या काही वर्षांत बदललेली आर्थिक समीकरणे हा गाभा ठेवून यंदा अर्थशास्त्र व व्यवस्थापन या विषयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा वित्तीय क्षेत्राला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यशास्त्र विषयातील सूर्यकांत गायकवाड याने भाषेचे राजकारण हा विषय लोकशाही, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचूक टिपला आहे.
कोट
लोकांना आता समतोल आहाराचे महत्त्व पटत आहे. फूड अँड टेक्नॉलॉजी या विषयातील संशोधन थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असल्याने याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. संशोधनातील निरीक्षणे प्रत्यक्ष जीवनात राबविताना किंवा त्यापासून काही घटक बनविताना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे असावेत याचाही विचार विद्यार्थी करतात.
डॉ. ए. के. साहू, विभागप्रमुख, फूड अँड टेक्नॉलॉजी
कोट..
सामाजिक शास्त्रातील संशोधन हे एका वेगळ्या अर्थाने उपयुक्त ठरू शकते. राज्यशास्त्रातील विद्यार्थी जेव्हा संशोधन करतात तेव्हा त्याची सैद्धांतिक मांडणी खूप महत्त्वाची असते. त्यातून समाजमनाला दिशा देणे, जाणीवजागृती करणे तसेच मतपरिवर्तन करणे यापातळीवर या संशोधनाची परिणती दिसून येते.
डॉ. भारती पाटील, विभागप्रमुख राज्यशास्त्र विभाग