फोटो
.................
भाजप सरकार
शेतकरी विरोधी
अजित पवार यांचा जयसिंगपूर येथील सभेत हल्लाबोल
म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर
'राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून शिक्षणांचा बोजवारा उडाला आहे. शेतीमालाला भाव नाही. समाजातील सर्वच घटकात मोठी अस्वस्थता आहे. भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे,' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राज्याबरोबरच देशात परिवर्तन घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जयसिंगपूर येथे नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह पटांगणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, आमदार जयंत पाटील, हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार प्रकाश गजभिये, संग्राम कोते-पाटील, शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आर.के. पोवार, राजू लाटकर, भैय्या माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, 'आज राज्यात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली ती पाळली नाहीत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कर्जमाफ होत नाही. आपण एकीकडे शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जात असताना दुसरीकडे सरकार संविधान बदलण्याची भाषा करीत आहे. साखरचे दर ३४०० रुपयांवरुन २८०० रुपयांवर आले आहेत. अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना आयात निर्यातीचे धोरण बदले जात होते. मात्र आताच्या सरकारकडे कोणतेही धोरण नाही. भाजपचे सरकार शेतकऱ्यांचे हित जाणून घेत नाही. साखर कारखान्याबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर पुढील वर्षी कारखाने सुरु होणार नाहीत, अशी स्थिती आहे. सुतगिरण्या अडचणीत आहेत. समाजातील सर्व घटकांना न्याय देईल असा एकही मंत्री सरकारमध्ये नाही. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन हाती घेतले आहे.'
प्रास्ताविकात बोलताना डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, 'गेल्या आठ दिवसात शिरोळ तालुक्यातील संपर्क दौऱ्यात सरकारबाबत असंतोष जाणवला. शिरोळ तालुक्यात २० हजार एकर शेतजमीन क्षारपड बनली आहे. एकरी एक लाख रुपये खर्च केले तर ही जमीन पुन्हा उत्पादनाखाली येईल. भाजीपाल्याचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारने आजवर पोकळ आश्वासने दिली आहेत. याविरूध्द लढा देण्यासाठी येथील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहील.'
यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार हसन मुश्रीफ, जयंत पाटील यांची भाषणे झाली. आभार तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी मानले. या सभेस पी.एम. पाटील, माजी जि.प.अध्यक्ष नानासो गाट, नावीद मुश्रीफ, शिरोळ विधानसभा परिक्षेत्राचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, राष्ट्रवादीचे हातकणंगले तालुकाध्यक्ष डी.बी. पिष्टे, मदन कारंडे, माजी नगराध्यक्ष व नगरसेविका स्वरुपा पाटील-यड्रावकर, नितू पाटील-यड्रावकर, रावसाहेब भिलवडे, शिरोळ पंचायत समिती सभापती मिनाक्षी कुरडे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...........
चौकट
हल्लाबोल आंदोलनाचा धसका
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याने सरकारने याचा धसका घेतला आहे. २०१९ च्या निवडणुकीत आपले खरे नाही हे त्यांना कळून चुकले आहे. परदेशातून काळे धन आणू, नागरिकांच्या खात्यात १५ लाख जमा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र निवडून आल्यानंतर ते आश्वासन विसरले. सहा कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली होती. मात्र त्यांनी तरुणाईची फसवणूक केली आहे. महागाई, रोजगार, अच्छे दिन यावर ते काही बोलत नाहीत. देशात जातीय तेढ वाढत आहे. राज्यातही ही स्थिती आहे. सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत समाजाला फसविले. या फसव्या सरकारला उलथवून टाकण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे.'