आघाडी शांत तर संघटना नामानिराळ्या पदवी प्रमाणपत्र घोळप्रकरणी जबाबदारी अनिश्चित म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर पदवी प्रमाणपत्रात छेडछाड करण्याचा प्रकार घडून आठ दिवसांचा कालावधी उलटला, प्रशासनातील सावळ्यागोंधळामुळे विद्यापीठाचे जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले, मात्र अद्यापही त्या प्रकरणी कुणावरही जबाबदारी निश्चित झालेली नाही. एरव्ही विद्यापीठीय निवडणूक असो की समारंभ प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी केंद्रीभूत धोरणाचा डांगोरा पिटणारी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी व संलग्न संघटनाही या प्रकरणी मौन बाळगून आहेत. विविध अधिकार मंडळावर वर्चस्व गाजविणाऱ्या विद्यापीठ विकास आघाडीची प्रशासनाशी मिलिभगत आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी संघटनांची भूमिकाही पदवी प्रमाणपत्राशी काहीहीदेणेघेणे नसल्यासारखी आहे. पदवीदान हा विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणारा समारंभ असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. यावर्षी विद्यापीठातील अधिकाऱ्यांची एकमेकांवरील कुरघोडी आणि नियमांना फाटा देत कामकाज करण्याच्या पध्दतीचा फटका पदवी प्रमाणपत्राला बसला. केवळ कुलगुरुंच्या स्वाक्षरीने छापलेली २५ हजार प्रमाणपत्रे प्रशासनाला रद्द करावी लागली. त्यानंतर कुलगुरु आणि कुलसचिवांच्या स्वाक्षरीची नव्याने प्रमाणपत्रे घाई गडबडीने छापावी लागली. यानिमित्ताने प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला. पदवी प्रमाणपत्रातील या घोळानंतर याप्रकरणी दोषीवर जबाबदारी निश्चित केली जाईल अशी शक्यता होती. मात्र प्रशासनाकडून कसलीही कार्यवाही झाली नाही. . विद्यापीठ विकास आघाडीची विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर सत्ता आहे. व्यवस्थापन परिषद, सिनेटवर आघाडीचे वर्चस्व आहे. आघाडीची मोट बांधण्यात संस्थाचालक, प्राचार्य संघटनेचा पुढाकार असतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवडणुकीच्या कालावधीत विविध घटकांना एकत्र करुन विद्यापीठ विकास मंचची स्थापना केली. पदव्युत्तर शिक्षक संघटना, कास्ट्राईब, महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघ आदींचा मंचमध्ये समावेश आहे. सेवक संघही विद्यापीठीय राजकारणात आघाडीसोबत आहे. मात्र या घटकाचे प्रमुख या प्रकरणी मौन बाळगून आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाच्या विद्यार्थीं संघटना आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे पक्षाच्या विद्यार्थीं संघटना शहरात सक्रिय असताना पदवी प्रमाणपत्र घोळप्रश्नी कुणाचाही आवाज उमटला नाही. केवळ अखिल भारतीय मराठा महासंघ, युवक संघटना, जनता नागरी निवारा संघटनेने पदवी प्रमाणपत्रातील घोळप्रश्नी प्रशासनाकडे विचारणा केली. जनता नागरी निवारा संघटनेने तर कुलपती कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत. ...................... मिटवामिटवीसाठी यंत्रणा सक्रिय पदवी प्रमाणपत्राच्या घोळानंतर अद्याप कुणावरही जबाबदारी निश्चित झाली नाही. उलट प्रशासनाकडून सिस्टीमचा दोष असल्याचे कारण पुढे करत प्रकरण मिटवामिटवीसाठी यंत्रणा सक्रिय राहिली. विद्यापीठ, संस्थाचालक, प्राचार्य संघटना, शिक्षक संघटना ते विद्यार्थी संघटना अशा प्रत्येक पातळीवर विद्यार्थींहिताला प्राधान्य, त्याला केंद्रस्थानी ठेवून धोरणे राबविण्याची हाकाटी पिटतात. मात्र पदवी प्रमाणपत्राचा घोळ अजून संपला नसताना या साऱ्या संघटना गप्प आहेत
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट