म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्हा नियोजन मंडळाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेला निधी येतो. त्याचे नियोजन करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला असताना त्यात ढवळाढवळ करणारे पालकमंत्री कोण? या निधीत लोकप्रतिनिधींच्या कामांचा समावेश केला नाही तर प्रस्ताव नामंजूर करण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्र्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी सर्वसाधारण सभेत दिला. तर सभेनंतर दलितवस्ती सुधारणा योजनेसाठी नगरसेवकांना डावलणाऱ्या सरकारच्या अध्यादेशाची काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांच्यावतीने महापालिकेच्या चौकात शंखध्वनी करत होळी करण्यात आली.
जिल्हास्तरावरील सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत (डीपीडीसी) दोन कोटी ९४ लाख व नागरी दलितेतर सुधारणा योजनांमधील एक कोटी २५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचे प्रस्ताव सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर होते. या प्रस्तावानुसार लोकप्रतिनिधींच्या कामांची टक्केवारी जास्त झाली असून काही नगरसेवकांनाच केवळ दोन लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
याबाबत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी डीपीडीसीकडून मिळणाऱ्या निधींचे नियोजन करण्याचे अधिकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला आहेत. पण नगरसेवकांना विचारात न घेता लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांचा समावेश करुन नगरसेवकांच्या हक्कावर गदा आणली जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'या नवीन प्रस्तावामुळे नगरसेवकांना केवळ दोन लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. आम्हाला ही दोन लाख रुपयांची भीक नको. निधी द्यायचा असेल तर संपूर्ण नियोजन करण्याचे अधिकार महासभेला द्यावेत. अन्यथा सर्वच निधी पालकमंत्र्यांना परत द्या. त्यांनाच सारे नियोजन करु द्या. आम्ही त्यांच्या दारात बसून निधीसाठी 'भीक मांगो' आंदोलन करु.'
नागरी दलितेतर सुधार योजनेच्या निधीतील कामे करण्यासाठी केवळ आमदार, खासदारांच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल, असा अध्यादेश सरकारने नुकताच काढला आहे. त्याबाबतही सभेमध्ये देशमुख, भूपाल शेटे, जयश्री चव्हाण यांनी आवाज उठवला. या अध्यादेशातून सरकारने नगरसेवकांना प्रक्रियेतून बाजूला करण्याचे काम केले आहे. यातून भागातील निकडीची विकास कामे होणार नाहीत, अशी भीती देशमुख यांनी व्यक्त केली. तर शेटे यांनी या अध्यादेशामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर प्रहार करण्याचे षड्यंत्र असून त्याचा निषेध केला. त्यानंतर महापालिकेच्या चौकात महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, शारंगधर देशमुख, सभागृह नेते प्रविण केसरकर, शिक्षण सभापती वनिता देठे, नगरसेवक अर्जुन माने, निलोफर आजरेकर, शोभा कवाळे, वृषाली कदम, प्रतापसिंह जाधव, सुभाष बुचडे, रिना कांबळे यांच्या उपस्थितीत शंखध्वनी करत अध्यादेशाची होळी करण्यात आली.
इतिहास विभागाचे मत घ्यावे
राजर्षी शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार त्यांच्या नर्सरी बागेतील समाधीशेजारी राजगुरु रघुपती पंडित उर्फ पंडित महाराज यांची समाधी बांधण्याचा ठराव सभेमध्ये मंजूर करण्यात आला. तर नगरसेवक भूपाल शेटे यांनी काहीजण पंडित महाराजांची समाधी शेजारीच व्हावी, असा विपर्यास केला जात असल्याचे मांडले. तसेच महाराजांच्या पत्राचा शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागाकडून अभ्यास केला जावा, असेही सुचवले. सभेपूर्वी राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनीच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नगरसेवकांना शाहू महाराजांचा आदेश, गुलाब फूल देऊन शाहू महाराजांच्या इच्छेनुसार पंडित महाराज यांची समाधी व्हावी, असे निवेदन दिले. यावेळी उदयसिंह राजेयादव, राकेश तुपारे, प्रमोद सावंत, नारायण शिंदे, संचिता कदम आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट