Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT
कोल्हापूर : प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी तत्त्वावरील सर्व कर्मचा-यांनी गेल्या दहा दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे प्रस्तावित, प्रगतिपथावर, मंजुरीच्या टप्यातील जिल्ह्यातील १२० कोटींची नवीन रस्ते, पूल, रस्त्यांची देखभाल दुरुस्तींच्या कामांना ब्रेक लागला आहे. आंदोलन राज्यस्तरावर सुरू असल्याने प्रलंबित मागण्यांप्रश्नी सरकारशी चर्चा करून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलनाची धार वाढणार असल्याचे दिसत आहे. परिणामी येथील ग्राम सडक योजना कार्यालयातील कामकाज ठप्प राहून त्याचा विकासकामांवर परिणाम होणार आहे.
येथील जिल्हा परिषदेसमोरील कागलकर हाउसमध्ये प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत कार्यालये आहेत. त्या कार्यालयांतून केंद्रस्तरावरून प्रधानमंत्री आणि राज्यस्तरावरून मुख्यमंत्री विभागातून रस्ते, पूल बांधकाम, दुरुस्तीच्या कामांना निधी मिळतो. या कार्यालयात कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक, स्थापत्य अभियंता सहायक अशी पदावर कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त कर्मचारी काम करतात. त्यांची २०१२ पासून देय वेतनवाढ मिळावी, अपघाती विमा संरक्षण मिळावे, वैद्यकीय रजा आणि प्रवास भत्ता नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळावे, अशी मागणी आहे. या मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी सरकारकडे अर्ज, विनंत्या केल्या. मात्र, सरकारने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा कार्यालयातील १३ आणि राज्यातील ७३४ कर्मचा-यांनी १५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनात कार्यालयातील महत्त्वाच्या पदांवरील सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. रस्ते, पूल, जलसंधारणाची कामे जैसे थे आहेत. ब्रेक लागलेल्या कामांत सर्वाधिक रस्त्यांची कामे आहेत. अनेक रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. खडी, मुरूम टाकले आहे. मात्र, पुढील काम आंदोनामुळे थांबले आहे. त्याचा त्रास संबंधित भागातील वाहनधारकांना होत आहे. राज्यस्तरीय आंदोलन असल्याने जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांकडे काम कधी सुरू होणार यासंबंधीचे ठोस उत्तर नाही.
०००००
कोट...
विविध मागण्यांसाठी ग्राम सडक कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे बंद आहेत.
एस. एन. शेळके, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
-------
वेतनवाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी १५ फेब्रुवारीपासून कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १२० कोटींच्या रस्त्यांसह, पुलांची कामे ठप्प आहेत. सरकारने सकारात्मक तोडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करणार आहे.
गणेश गायकवाड, कंत्राटी कनिष्ठ अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
-------------------
२९७ कि.मी.चे रस्ते
कामांना ब्रेक लागलेले महत्त्वाचे रस्ते असे : करवीर : दोनवडे ते सांगरूळ, शिये-रामनगर, तामगाव ते मुडशिंगी वसाहत, निगवे खालसा ते म्हसोबा माळवाडी, कळंबा ते कात्यायनी पार्क, वडगाव ते वाकरे मळा, कंलदगाव, कोगिल खुर्द, कणेरी, कोगील रस्ता, मुडशिंगी ते कागले वसाहत, सरनोबतवाडी ते पाटील कृषी कॉलनी रस्ता, गोकुळ शिरगाव ते माळवाडी रस्ता. यासह कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, चंदगड, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यातील लाखो रुपयांच्या रस्त्यांची कामे आहेत. याशिवाय आठ पुलांची कामे थांबली आहेत. २९७ किलोमीटरच्या ८१ रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागला आहे.
---------------------
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट