महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काहींच्या तडजोडीच्या राजकारणामुळे सून मेघा पाटील यांचा पराभव झाला. त्या पराभवाविषयी खंत नाही, पण पक्षाच्या पराभवाचे दु:ख मोठे आहे. 'स्थायी'तील घटनेनंतर आमच्या कुटुंबांतील कुठलाही सदस्य हिमालयासारखा वितळला नाही, उलट सह्याद्रीच्या पाषाणासारखे आम्ही ठामपणे उभे राहिलो. तडजोडीचे राजकारण सोडून जिल्हा नेतृत्वाने 'स्थायी'तील प्रकाराची सखोल चौकशी करुन योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. तडजोडीचे राजकारण सोडून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी गटबाजीच्या राजकारणावर त्यांनी निशाणा साधला.
पक्षाचे निवडणूक निरीक्षक दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतर्गत निवडणुकीसाठी ताराबाई पार्क येथील पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आमदार के. पी. पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, माजी आमदार नामदेवराव भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चिंता करायची गरज नाही. पाच आमदार आणि दोन खासदार निवडून आणण्याची ताकद पक्ष कार्यकर्त्यांत असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
महापालिकेतील राजकारणावर भाष्य करताना जिल्हाध्यक्ष ए. वाय.म्हणाले, पक्षाच्या स्थापनेपासून प्रामाणिकपणाने काम करत आहे. पक्ष नेतृत्वाने सोपविलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र स्थायीच्या निवडणुकीत राजकारण झाले, त्या पराभवाने नाउमेद झालो नाही. पण पराभवाने पक्षाची पिछेहाट झाली. आपण कधीच तडजोडीचे राजकारण करणार नाही. पक्षाने पाठीवर हात ठेवून लढण्याची ताकद द्यावी. राष्ट्रवादीचा झेंडा जिल्ह्यात फडकावू. '
पक्षातील गटबाजीवरुन माजी खासदार निवेदिता माने यांनी बैठकीत खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या की, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे जिल्ह्यात पक्ष संघटनेचे उत्कृष्ट काम करत आहेत. उत्कृष्ट संघटनेबद्दल त्यांचा पक्षीय पातळीवर गौरव झाला. पक्षाची बांधणी चांगल्या पध्दतीने होत असताना महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत गालबोट लागले. कुटुंबांतील सदस्यांच्या पराभवाची जखम अस्वस्थ करणारी असते. पक्षामध्ये कुणीतरी शह देण्याचे, नेत्यांच्या विरोधात फूस लावण्याचे काम करत आहे. एकमेकांचे पाय ओढणे आणि कान भरण्याचे काम थांबले पाहिजे. स्थायीच्या निवडणुकीत फूस देणाऱ्यावर पहिल्यांदा कारवाई करावी.
पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविकात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तसेच जिल्ह्यात सुमारे आठ हजार सक्रिय सभासदाची नोंदणी झाल्याचे सांगितले. करवीर तालुका प्रमुख मधुकर जांभळे यांनी आभार मानले.
घोटाळा करणारे सगळे मोदी
निरीक्षक दिलीप पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या राजकारणात दिग्गज नेते आहेत. त्यांच्या राजकारणाविषयी रोज वर्तमानपत्रातून वाचत असतो. पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यात लक्ष घातले आहे. त्यांचा दौरा संपल्यावर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये पुन्हा राजकारण सुरु झाले. त्यामुळे मी त्यावर बोलण्याचे धाडस करणार नाही. मात्र नेत्यांच्या राजकारणात पक्षाला कसली झळ बसणार नाही, याची खात्री आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारकडून लोकांची फसगत झाली आहे. या सरकारच्या कालावधीत ६५००० कोटींचा घोटाळा झाला आहे. आणि हा घोटाळा करणारे सगळे मोदी आडनावाच्या व्यक्ती आहेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी हा प्रमुख पक्ष म्हणून समोर येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट