म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाज क्रांतिकारी संघातर्फे धनगर समाजाने रविवारी मोर्चा काढला. सत्तेवर आल्यानंतर १५ दिवसांत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाले तरी भाजप सरकाने आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारला मोर्चातून आश्वासनाची आठवण करून दिली. मोर्चात विविध महापुरुषांचे डिजिटल फलक, मागण्यांच्या आशयाचे फलक, धनगरी ढोल, झांज, कैताळ वाद्य वाजवून लक्ष वेधले. दसरा चौक येथे झालेल्या सभेत समाजाने आरक्षणाची जोरदार मागणी केली.
गांधी मैदानातून दुपारी अडीच वाजता आमदार राजेश क्षीरसागर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चास सुरुवात झाली. धनगरी ढोल, पिवळे ध्वज, टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांचा मोर्चा महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, बिंदू चौक मार्गे दसरा चौकात आला. 'याद राखा आम्ही धनगर महाराष्ट्रात १७ टक्के आहोत', 'सरकार आम्हाला आरक्षण केव्हा देणार', 'भ्रष्ट, निष्ठूर राजकारणी नेत्यांच्या जगात भरडलेल्या धनगर समाजाचा कोणी विचार करेल का', 'काठी अन् घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी मोर्चात येऊ द्या की रं', 'दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे (२०१४)', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. मोर्चा दसरा चौकात आल्यानंतर सभेत रुपांतर झाले.
धनगर समाजाने काय घोडे मारले
धनगर समाज क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष विलासराव वाघमोडे यांनी पालकमंत्र्यांसमोर समाजाच्या व्यथा मांडल्या. धनगर समाज हा वाड्यावस्त्यावर विखुरला आहे. समाजावर अंधश्रद्धेचा पगडा आहे. आरक्षण न मिळाल्याने समाजातील तरुणांची प्रगती खुंटली आहे. ना शेती, ना उद्योगधंदे, ना नोकरी यामुळे विकासापासून हा समाज वंचित राहिला. काँग्रेस पक्षाने समाजाला लाथाडले, केवळ मतासाठी समाजाचा वापर केला. श्रीमंत समजल्या जाणाऱ्या समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला. पण धनगर समाजाची उपेक्षा केली. समाजाच्या भाजप सरकार व पालकमंत्र्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पालकमंत्री पाटील यांनी आरक्षणाचा निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा.'
शिवसेना आवाज उठवणार
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'धनगर समाजाच्या मागण्या रास्त आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत समाजाच्या मागण्या पोहचवू. खासदार गजानन किर्तीकर यांनाही मागण्यांचे निवेदन पाठवून त्या माध्यमातून सेनेचे खासदार लोकसभेत हा प्रश्न मांडतील. अधिवेशनातही सेनेचे आमदार हा प्रश्न धसास लावतील.'
व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते
महापौर स्वाती यवलुजे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक आशिष ढवळे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, काँग्रेस ओबीसी सेलचे उमेश पोर्लेकर, गजानन लिंगम, महेश लोखंडे, तानाजी मर्दाने, धनगर समाज क्रांतीकारी संघाचे कृष्णात शेळके, बाळासाहेब मोटे, बाबूराव बोडके, रामभाऊ डांगे, सुरेश शेंडगे, सुलोचना नायकवडी, अरुण गावडे, धोंडीराम सिद, उन्मेष वाघमोडे, अभिजित बत्ते, उन्मेष वाघमोडे, विकास घागरे, देवाप्पा चोपडे, सोमाजी वाघमोडे आदी उपस्थित होते. जिल्हा युवक अध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
ओव्यांतून मागण्या
सभेच्या प्रारंभी कुरळप येथील बिरदेव ओवीकार मंडळाने धनगरी ओव्या सादर केल्या. ओव्यातून धनगर आरक्षण, सोलापूर विद्यापीठ नामकरण या प्रश्नाबाबत सरकारकडून टोलवाटोलवी सुरु असल्याची मांडणी केली. 'मायबाप सरकार आरक्षण कधी मिळणार वाट बघतोय भोळा भाबडा धनगर' अशी ओवी सादर करत समाजाच्या व्यथा मांडल्या.
तर ढोल वाजवा आंदोलन
सभेला सुरुवात होण्यापूर्वी विलासराव वाघमोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मार्च महिन्यापर्यंत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याच्या घरासमोर ढोल वाजवा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर आदी महापुरूषांचे डिजीटल फलक लावलेले लहान टेंम्पो मोर्चाच्या शेवटी होते. फलकावरील महापुरूषांच्या भव्य प्रतिमा आणि त्याखाली लिहिलेल्या त्यांच्या कर्तृत्वावरील ओळी साऱ्यांचे लक्ष वेधल्या.
प्रमुख मागण्या ः धनगर समाजाची अनुसूचित जमाती प्रवर्गात नोंद करून त्वरित अंमलबजावणी करावी, शेळी, मेंढी पालन पोषणास उद्योगाचा दर्जा द्यावा, राष्ट्रीयकृत बॅकांकडून कर्ज मिळावे, डंग धनगर पिढयानपिढ्या कसणाऱ्या जमिनी, त्यांच्या नावावर करावे, क्रिमीलेअरची अट रद्द करावी, धनगर वाडयांवर मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट