म. टा. वृत्तसेवा, सांगली
सद्भभावनेने रविवारी रस्त्यावर उतरलेल्या सांगलीकरांच्या गर्दीने रॅली मार्ग फुलून गेला. सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी आणि शांततेचे आवाहन करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून शाळा, महाविद्यालये, संस्था, आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, विविध संघटनांचे जथ्थे, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष कर्मवीर भाऊराव पाटील चौकाच्या दिशेने येत राहिले. विविध रंगी गणवेशांच्या गर्दीने व्यापलेल्या चौकात तिरंगी फुग्यांचा भला मोठा गुच्छ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हातून आकाशात स्वच्छंदपणे झेपावला. दिव्यांग विद्यार्थींनीने हिरवा झेंडा दाखविला आणि रॅलीचा मार्ग ओसांडून वाहू लागला.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाला समाजाच्या सर्वच घटकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारचा हक्काच्या सुट्टीचा दिवस असतानाही सरकारी, निमसरकारी, सहकार, खासगी संस्था, संघटना आणि सर्व राजकीय पक्ष सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून हातातहात घालून रॅलीच्या मार्गावर स्वार झाल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली.
जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तिरंगा ध्वज उंचावत रॅली मार्गावर पाऊल टाकले आणि गर्दीने रस्ते व्यापले. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार अमर साबळे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे, सुमन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, विशाल पाटील, विश्वजित कदम, महापौर हारुण शिकलगार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, बापूसाहेब पुजारी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उपमहापौर विजय घाडगे, महापौर गटाचे नेते शेखर माने, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार दिनकर पाटील आदींसह सर्वपक्षीय कृती समितीने रॅलीचा मार्ग धरला.
कर्मवीर भाऊराव पाटील चौक, राम मंदिर, पंचमुखी मारुती रोड, गरवारे महाविद्यालय, महापालिका, राजवाडा चौक, स्टेशन चौक या मार्गे रॅली छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर आली. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाज सुधारकांच्या भूमिकेत रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देशभक्तीपर गाणी आणि तुताऱ्यांचा आवाज घुमत राहिला. पोलिस बॅण्ड, शाळांचे विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी आणि नागरिक अशा क्रमाने रॅली शिस्तबद्धपणे सुमारे ३ किलोमीटरचे अंतर पार करताना सामाजिक एकतेच्या घोषणांनी सांगली शहर दुमदूमून सोडले. व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान नव्हते, पण त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
सांगली जिल्हा प्रशासनाने सामाजिक सद्भावना रॅली यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या वतीने अभिनंदन करून महसूल मंत्री पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण पक्की आहे. मात्र, त्याला गेल्या काही दिवसामध्ये ज्या विविध घटना घडल्या, त्यातून थोडासा धक्का बसला. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने सामाजिक सद्भावना रॅली आयोजित करून विद्यार्थ्यांबरोबर सर्व जाती धर्माच्या नागरिकांमध्ये जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. आम्ही सर्व एक आहोत, ही भावना घट्ट करण्याचा प्रयत्न केला. हे राज्यासाठी आदर्श ठरेल, असे सांगली मॉडेल सर्वांपुढे ठेवले आहे.’
दरम्यान, छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर सद्भावनेसाठी अवतरलेल्या विराट जनसमुदायाच्या साक्षीने मिले सूर हमारा तुम्हारा या गाण्याने रॅलीचा समारोप झाला.
पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी आभार मानले. या वेळी सर्वांनी स्तब्ध उभे राहून शहिदांप्रती आदरांजली व्यक्त केली. ही रॅली यशस्वी करण्यासाठी गेले आठवडाभर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगर पालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपायुक्त सुनील पवार, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, मिरजचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार आणि सर्व विभागांचे विभाग प्रमुख, तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अशी होती सुरक्षा व्यवस्था
रॅलीवर महानगरपालिकेच्या वतीने एकूण १७, पोलिस विभागाच्या वतीने २० आणि दोन ड्रोन कॅमेऱ्यांची नजर होती. रॅली मार्गामध्ये संदेशवहनासाठी वॉकी-टॉकीचा वापर करण्यात आला. तसेच, स्वयंसेवकांनीही स्वयंस्फूर्तीने मदत केली. महानगरपालिकेच्या वतीने रॅलीमार्गावर ११ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ८ ठिकाणी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती. ११ अग्निशमन वाहने आणि ३ रुग्णवाहिकांचीही व्यवस्था, वैद्यकीय पथकेही ठेवण्यात आली होती रॅलीसाठी ५०० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही रॅली यशस्वी करून सांगलीकरांनी सामाजिक समता, एकता, अखंडतेचा संदेश सर्वदूर पोहोचविला आहे.
रॅली मागील उद्देश
नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशीच्या कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्याने काहींशी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अफवांचे पीक फोफावत राहिल्याने जातीय पातळीवर येऊ घातलेला तणाव वेळीच रोखला गेला तरी अंतर्गत खदखद अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर आमच्यात फूट पाडू नका, अन्यथा तुमचे नामोनिशान राहणार नाही, आम्हाला आपसात नाही तर देशासाठी लढायचे आहे, तिरंगा हाच आमचा धर्म आहे, असा इशारा संधीसाधूना आणि समाजाला एकतेचा संदेश देण्यासाठी सांगलीत रविवारी मकर संक्रातीचा योग साधून जिल्हा प्रशासनाने सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीला आलेल्या विद्यार्थ्यांनीचा मृत्यू
प्रशासकीय सद्भावना रॅली संपल्यानंतर शिक्षकांबरोबर घरी निघालेल्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे (वय १४) या विद्यार्थीनीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. चक्कर येत असल्याचे सांगत तिने आपल्या वडिलांना बोलावून घेण्यास शिक्षकांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच ती बेशुद्ध पडली. त्यावेळी तेथूनच जात असलेल्या राज ठाकरे यांच्या वाहन ताफ्यांत शेवटी असलेल्या रुग्णवाहिकेतून ऐश्वर्याला त्वरीत सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, तिचे प्राण वाचविण्यात यश आले नाही. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून संबधित मुलीच्या पालकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती गाडगीळ यांनी पत्रकारांना दिली.
जिल्हा प्रशासनाच्या सद्भावना एकता रॅलीत सहभागी होऊन घरी परतणारी शालेय विद्यार्थींनी मृत्यूमूखी पडल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, जिल्हा आरोग्याधिकारी यांच्यासह अनेकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ऐश्वर्या कांबळे (वय १४, ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला) ही तिच्या शाळेतील शिक्षिका आणि अन्य विद्यार्थिनींबरोबर सहभागी झाली होती. ती घरी परतत असताना तिला एसएफसी मॉलसमोर अचानक त्रास झाला. पालक धावत आले. संपूर्ण यंत्रणा मदतीला धावली परंतु, तिचे प्राण वाचविण्यात यश आले नाही. तिची आजी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असल्याने त्यांचे कुटुंब राजवाड्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानात रहात होते. वडील खासगी रखवालदार म्हणून काम करतात.
अत्यंत दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागल्याने शोकाकुल झालेल्या ऐश्वार्याच्या वडिलांची संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ती किरकोळ आजारी होती. शनिवारी डॉक्टरांना दाखविले होते, काही चाचण्या रविवारी करायच्या होत्या. तिला रॅलीला जाऊ नको, असे सांगत होतो. पण तिने माझ्या मैत्रिणी जाणार असल्याने मी ही जाणार असल्याचे सांगून ती बाहेर पडली होती. तिच्या मृत्यू बाबत तक्रार करणार नाही. रॅलीचा उद्देश चांगला होता. तक्रार देऊन काही आमची मुलगी परत येणार नाही.’
या बाबत जिल्हा प्रशासनानेही खुलासा केला आहे. ऐश्वर्या शशिकांत कांबळे आजारी होती. तरीही ती रॅलीत सहभागी झाली. मात्र, तिचा मृत्यू रॅली दरम्यान किंवा स्टेडियमवर झालेला नसून, ती रॅली संपवून घरी परतत असताना रस्त्यात चक्कर येऊन झाला आहे. जवळच उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून तिला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तिचे शवविच्छेदन सुरू आहे. विद्यार्थिनीचा मृत्यू रॅलीमध्ये झाला नसला तरी, ही घटना दुर्दैवी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तिच्या कुटुंबीयाला आर्थिक मदतीचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. या बाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ऐश्वर्याचा आकस्मिक मृत्यू असल्याने पोलिस त्याची चौकशी करीत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, ऐश्वर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेतील सरकारी रूग्णालयात आणला. तिच्या प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त निधी मिळवून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट