satish.ghatage@timesgroup.com
Tweet:@satishgMT
कोल्हापूर : सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेने महाराष्ट्र रणजी आणि भारतीय संघात जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंची निवड व्हावी यासाठी ज्युनिअर क्रिकेटकडे लक्ष दिले. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राच्या विविध गटाच्या संघात १४ खेळाडूंची निवड झाली आहे. कोल्हापुरच्या अनुजा पाटीलची तर थेट भारतीय ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. महिला क्रिकेटला उर्जितावस्था देण्यासाठी संघटनेचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित स्वःमालकीचे मैदान आणि अद्यायवत ट्रेनिंग स्कूल उभारण्याचा संकल्प संघटनेने आखला आहे.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गेल्या ५० वर्षांतील खेळाडूंचा गौरव, चर्चासत्र, प्रदर्शन आदी कार्यक्रम सुरू आहेत. कोल्हापूरचे खेळाडू फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय संघात खेळले पाहिजेत हे ध्येय ठेऊन पायाभूत सुविधा निर्माण करून देताना संघटनेचे स्वतःचे मैदान असावे, वर्षभर सुरू राहणारे क्रिकेट ट्रेनिंग स्कूल तेथे उभारले जावे असा निर्धार करण्यात आला आहे.
१९६८ मध्ये एसटीतील निवृत्त अधिकारी गोपाळराव घोरपडे यांनी जिल्हा क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तत्कालिन नगराध्यक्ष तात्यासाहेब पाटणे हे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. जिल्हा क्रिकेट संघटना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेशी (एसीए) संलग्न होती. सखारामबापू खराडे, बाळासाहेब खराडे, जयसिंगराव कुसाळे, रणजितसिंह महागावकर यांनी संघटनेचा विस्तार केला. कोल्हापूरच्या खेळाडूंना महाराष्ट्र रणजी संघात निवडीसाठी पुण्यात जावे लागायचे. सोमवार ते शुक्रवारी कोल्हापुरात सराव आणि नंतर शनिवार, रविवार असे दोन दिवस पुण्यात सामने असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या जिद्दी खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान पक्के केले. पांडुरंग साळगावकर, रमेश कदम, रमेश हजारे, उमेश गोटखिंडीकर यांनी महाराष्ट्र संघाकडून दमदार खेळ करत कोल्हापूरचे नाव गाजवले.
‘एमसीए’वर पुण्याचे वर्चस्व असले तरी खऱ्या अर्थाने २००५ नंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे तत्कालिन अध्यक्ष अजय शिर्के यांनी कोल्हापूरसह २२ जिल्ह्यांना एमसीएमध्ये प्राधान्य दिले. त्यानंतर पुण्याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांतील खेळाडू महाराष्ट्र संघात दिसू लागले. आज जिल्ह्यातील १२ ते १४ खेळाडू महाराष्ट्राच्या विविध वयोगटाच्या संघात प्रतिनिधीत्व करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी संघटनेने प्रसिद्ध प्रशिक्षक प्रमोद इंगळे यांच्या मार्गर्शनाखाली १४ वयोगटाचा जिल्हा क्रिकेट संघ तयार केला. संघाने सर्व जिल्ह्यांना पराभूत करत कोल्हापूरला विजेतेपद पटकावून दिले. गेल्यावर्षी, २०१७ मध्ये १६ वयोगटाखालील संघानेही अजिंक्यपद पटकावले.
जिल्हा संघ तयार करताना सर्वांना १४ आणि १६ या दोन्ही वयोगटांची बांधणी करण्यास सांगण्यात आले आहे. आज दोनशेहून अधिक खेळाडू सराव करत आहेत. तर ४० खेळाडू कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील संघांकडून प्रतिनिधीत्व करत आहेत. अनुजा पाटील कोल्हापूरची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील एकदिवशी सामन्यांसाठी अनुजा सज्ज झाली आहे. अनुजापाठोपाठ कोल्हापूरमधील अन्य मुलीही महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधीत्व करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
००००
आम्ही धोरण निश्चिती करून ज्युनिअर क्रिकेटवर भर दिला. त्यासाठी प्रदीप इंगळे हे तज्ज्ञ प्रशिक्षक गेली दोन वर्षे, संघटनेला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभही संघटनेला झाला. गेल्या दोन वर्षांत १४ आणि १६ वयोगटातील संघांनी एमसीए निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. क्रिकेटचा प्रसार वेगाने करण्यासाठी यापुढे स्वमालकीचे मैदान व ट्रेनिंग सेंटर उभारणीवर भर देणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आजी-माजी खेळाडूंचा सत्कार, चर्चासत्रे, क्रिकेट साहित्याचे प्रदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र ज्युनिअर क्रिकेट अधिकाधिक बलवान करणे हे आमचे टार्गेट असेल. त्यासाठीच स्व मालकीचे मैदान आणि ट्रेनिंग सेंटर सु हे मुख्य ध्येय ठेवले आहे.
- बाळ पाटणकर, अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटना
००
ग्रामिण क्रिकेट मूळ धरतेय
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत, तालुकास्तरीय क्रिकेट संघटना कार्यरत आहेत. यापैकी करवीर, शिरोळ आणि गडहिंग्लज या तालुक्यांत क्रिकेटने चांगले मूळ धरले आहे. आज जिल्हा महिला क्रिकेट संघाच्या निवड चाचणीत गडहिंग्लजसारख्या ठिकाणाहून १२ मुली येतात, सहभागी होतात ही बाब महिला क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय आशादायक आहे. करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यांतही संघ तयार होत आहेत. कागल आणि इचलकरंजी या शहरांतील क्रिकेटची मैदानेही तयार झाली आहेत.
- चेतन चौगुले, उपाध्यक्ष जिल्हा क्रिकेट संघ
गुणवत्तेमुळे मागणी वाढली
गेल्या चार वर्षांत संघटनेने ज्युनिअर क्रिकेटकडे अधिक लक्ष दिले. या वयोगटातील मुले अधिक सक्षम कशी होतील यावर भर दिला. प्रसिद्ध प्रशिक्षक प्रमोद इंगळे यांच्या मार्गर्शनाखाली २००हून अधिक खेळाडू कोल्हापुरात सराव करीत आहेत. कोल्हापूरच्या ४०पैकी २० खेळाडू कोल्हापूरकडून आणि अन्य २० दर्जेदार खेळाडू पुण्यातील विविध क्लबकडून प्रतिनिधीत्व करत आहेत. पुण्यातील क्लबकडून कोल्हापूरच्या खेळाडूंना मागणी वाढली आहे. येथील खेळाडूंच्या गुणवत्तेची ही पोहोचपावती आहे.
- रमेश कदम, सचिव, जिल्हा क्रिकेट संघ
प्रायोजक, दानशूर मंडळींचा आधार
शहरातील संस्था आणि दानशूर मंडळींच्या मदतीवर कोल्हापूरच्या क्रिकेटचा विकास सुरू आहे. सद्यस्थितीत काटकसर करुन कोल्हापूर जिल्हा संघटना काम करत आहे. संघटनेकडे स्वतःचे मैदान नसतानाही शाहूपुरी जिमखाना, शास्त्रीनगर मैदान, राजाराम कॉलेजचे मैदान, पोलिस मैदान, डी. वाय. पाटील मैदान, शिवाजी स्टेडियम, इचलकरंजी आणि कागल या मैदानांवर वर्षभर १४ स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यातून कोल्हापूरच्या क्रिकेटला अधिक गती मिळत आहे. आजच्या घडीला वेगवेगान खेळाला प्राधान्य आहे. तशी तयारी सुरू आहे.
- बापू मिठारी, खजानिस जिल्हा क्रिकेट संघटना
ट्रेनिंग स्कूलची उभारणी करणार
कोल्हापूर शहरातील सर्व मैदाने सखल भागात आहेत. त्यामुळे दरवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापुरातील क्रिकेटचा सराव बंद असतो. या ऑफ सिझनमध्ये खेळाडू क्रिकेटपासून, सरावापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे आम्ही मे महिन्यातच ज्युनिअर खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करतो. खेळाडूंच्या कपॅसिटी बिल्डिंगसाठी नव्या, अत्याधुनिक तंत्राचा अवंलब केला जात आहे. भविष्यात जिल्हा क्रिकेट संघटनेच्यावतीने ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये तीन इनडोअर विकेट, पाच आउडडोअर विकेट्स, थीम मॅचेस यांचा समावेश केला जाणार आहे. नव्या तंत्राचा अवलंब करून क्रिकेटचा प्रसार व्हावा यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
- ऋतुराज इंगळे, माजी अध्यक्ष जिल्हा संघटना
दरवर्षी १४ स्पर्धाचे नियोजन
दरवर्षी विविध वयोगट, आंतरशालेय, आंतर महाविद्यालयीन अशा १४ स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करणारी एकमेव कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटना आहे. आगामी कालावधीत महिला क्रिकेट वाढावे यासाठी, मुलींसाठी भाऊसाहेब निंबाळकर स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील संघांना आमंत्रित केले जाणार आहे.
- केदार गयावळ, सह सचिव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट