म. टा. वृत्तसेवा, सांगली
कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला बुधवारी हिंसक वळण लागले. काही ठराविक हुल्लडबाजांनी खासगी गाड्या, बंद दुकाने आणि एसटी गाड्यांवर दगडफेक केली. गणेश मंदिरासमोरील पूजेच्या साहित्यांच्या दुकानांना लक्ष केले गेल्याने आणि मारुती चौकात शिवप्रतिष्ठानच्या पोस्टरवर दगडफेक झाल्याने तणाव वाढला. दोन्ही गट एकमेकांसमोर आले होते. परंतु, पोलिसांनी प्रसंगावधान ओळखून आक्रमक पवित्रा घेऊन जमावाला पांगविले, अन्यथा ना गंभीर घटनेला सामोरे जावे लागले असते. सांगलीचे रस्ते सुनसान झाले होते.
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दलित नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने सांगली मिरजेसह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपनगरांसह सांगलीत कडकडीत बंद होता. मध्यवर्ती बसस्थानकाची दोन्ही गेट बंद ठेवण्यात आली होती. स्थानिक दलित नेत्यांची सरकारी विश्रामधामवर बैठक सुरू होती. परंतु, सकाळपासूनच शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात हातात निळे झेंडे घेऊन मोटारसायकलवर स्वार होऊन तरुणांचे घोळके येत होते. बराच काळ घोषणा सुरू होत्या. त्यानंतर अचानक काहींनी मोटारसायकलवरुन रॅली सुरु केली. रॅलीतील काही जण मारुती चौकाकडे तर काही जण थेट गणपती मंदिराकडे धावले. मंदिराकडे धावलेल्यांनी त्या ठिकाणी पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या सात दुकांनाना लक्ष केले. तेथील काठ्या घेऊन दुकानातील साहित्याची नासधूस करून फोटोसारख्या वस्तू भिरकावून दिल्या. त्याचवेळी मारुती चौकात जमलेल्या जमावाने गावभागात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर जमावाने चौकात संभाजी भिडे यांची प्रतिमा असलेले शिवप्रतिष्ठानचे पोस्टर हटविण्याची मागणी केली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन पोस्टर हटवेपर्यंत काहींनी त्या पोस्टरवर दगडफेक केली. पोस्टर हटविल्याचे समजताच भिडे समर्थकांची गर्दी वाढू लागली. त्यांनी पोस्टरच्या ठिकाणी झेंडा लावला. काही वेळाने त्या ठिकाणी अन्य ठिकाणचे पोस्टर आणून लावण्यात आले. चौक आणि मंदिरासमोरील घटनांमुळे दोन्ही ठिकाणी हिंदुत्वावादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले आणि तणावात वाढत गेला. रस्त्याकडेला उभा असलेल्या अलिशान खासगी गाड्या, बंद दुकांनावर दगडफेक करीत निघालेल्या जमावाने अनेकवेळा काठ्याही नाचविल्या. राजवाडा चौकात रस्ता रोखण्याचा प्रयत्न करून जमाव हरभट रोड मार्गे पुन्हा मारुती चौकाकडे येण्याच्या तयारीत असतानाच मारुती चौकातील जमावाने त्या जमावाच्या दिशेने आगेकूच केली. एकमेकांना उघड आव्हान देत दोन्ही जमाव आमने-सामने येऊ लागल्याने कोणत्याही क्षणी गंभीर घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु, या बाबत माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे, पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी मोठी पोलिस फौज घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली. तोडफोड करून शिवराळ भाषेत शिवीगाळ करणाऱ्या जमावाला हुसकावून लावल्याने अनर्थ टळला. गणपती पेठेतही पोलिसांना अशीच आक्रमक भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे हुल्लडबाजी करणारा जमाव हळूहळू गायब झाला आणि सांगली शांततेच्या मार्गावर आली. हुल्लडबाजी करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलिस अधीक्षक शर्मा आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक मारुती चौकात झाली. शर्मा, गाडगीळ आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी शांततेचे आवाहन केले. पोलिसांनी हुल्लडबाजांना ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने शांतता आणि संयम ठेवा, असे आवाहन चौगुले यांनी केले.
बारा एसटी, वीस वाहने, बारा दुकानांची तोडफोड
सांगलीत बुधवारी आंदोलकांनी अलिशान गाड्या, बंद दुकानांना लक्ष केले. बापट बाल शिक्षण मंदिरानजीक रस्त्याकडेला उभ्या असलेल्या होंडा सिटी, मारुती सुझुकी सारख्या तीन, पुष्पराज चौकात दोन, गावभागात सहा, स्टेशन चौकात एक अशा सुमारे १५ ते २० वाहनांना लक्ष केले. रस्त्याकडेला बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांच्या साहित्याची फेकाफेकी केली. शहरातील १२ दुकानांवर दगडफेक करून काचा फोडल्या. हरभट रोड आणि बुरुड गल्लीत प्रत्येकी एक अशी दोन एटीएमच्या काचांचा चक्काचूर केला. जिल्ह्याच्या विविध भागात १२ एसटी गाड्या फोडल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भीमा कोरेगाव परिसरातील गावांमध्ये दलितांवर झालेल्या आमानुष हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, या मागण्यासाठी बुधवारी रिपब्लिकन पक्षाने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या मागण्यांची तत्काळ दखल घेतली गेली नाहीतर ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
पाच कोटींची उलाढाल ठप्प
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाले. मार्केट यार्ड, फळ मार्केटमध्ये पाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बुधवारी बेदाण्याचे सौदे निघतात. मात्र, बंदमुळे सौदे निघाले नाहीत. गुळ, हळदीसह अन्य धान्य मालाची आवक तसेच विक्री व्यवहार बंद राहिले.
साडेअकरानंतर हळद, गुळाचे सौदे बंद ठेवण्यात आले. हळदीचा हंगाम सुरू झालेला नसल्याने मालाची आवकही कमी होती. गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दोन्ही सौदे बंद ठेवण्यात आले. बेदाणा सौदेही काढण्याचा दिवस होता. व्यापारपेठ बंद राहिल्याने हळद, गुळासह सर्वच धान्याची आवक थांबली.
विद्यार्थ्यांची गैरसोय
शिराळा
शिराळा तालुक्यातील भीम सैनिकांनी मोर्चा काढून शिराळा तहसीलदारांना निवेदन दिले. अत्यावश्यक सेवा वगळता शिराळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी सेवा बंद आल्याने शिराळ्यात शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थांची आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
शिराळा बसस्थानकात शुकशुकाट होता. शहर वगळाता तालुक्यात इतर गावातील व्यवहार सुरळीत होते. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यातील रेड, खेड, तडवळे, उपवळे, औंढी, बिऊर, मांगले, कापरी, इंगरुळ, करमाळे, पुनवत आदी गावांतील लोकं मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात लक्ष्मी चौक येथून झाली. नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील चंद्रकांत निकम, बसवेश्वर शेटे, के. डी. पाटील, वासिम मोमीन, वसंत कांबळे, लालासो तांबीट, मंगेश कांबळे, अशोक दळवी, देवेंद्र पाटील, प्रशांत कांबळे, रमेश कांबळे, विजय दळवी, आनंद कांबळे, फिरोज मुजावर, सचिन बनसोडे, विनोद घाडगे, रोहित मोहिते, युवराज सातपुते, शशिकांत कांबळे, प्रकाश दळवी, विक्रम कांबळे, विनोद आढाव, सुहास कांबळे, प्रदीप शिवमारे, रमेश वाघमारे, संतोष सातपुते, राजेश शिवमारे मोर्चात सहभागी झाले होते.
पुरोगामी संघटनांचे
ठिय्या आंदोलन
इस्लामपूर
इस्लामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वाळवा तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अत्यावश्यक सेवा वगळता इस्लामपूर शहरात बंद पाळण्यात आला. आंबेडकर पुतळा परिसरात पुरोगामी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. दुपारी प्रांताधिकारी राजेंद्र देशमुख यांना निवेदन देऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
भीमा कोरेगाव येथे झालेला हिंसाचार पूर्व नियोजित कट आहे. धर्मांध, सनातनी प्रवृत्तीचे लोक या घटनेला जबाबदार आहेत. भीमा कोरेगाव परिसरात काही नागरिकांनी, गावांनी ठरवून दुकाने बंद ठेवली होती. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांची गैरसोय व्हावी, हाच उद्देश होता. आंबेडकरी जनतेवर भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना गुन्हे दाखल करून जलद गती न्यायालयात केस चालवावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुतळ्यासमोर निषेध सभा झाली. मनुस्मृती जगावणारे हे सरकार आहे. लोकांची डोकी भेडकवण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे. नियोजनबद्ध जातीय दंगली घडवल्या जात आहेत. भीमा कोरेगाव येथील दंगल पेटवणाऱ्या, एक जानेवारीला गाव बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सभेत करण्यात आली.
तालुक्यातील आष्टा, ऐतवडे बुद्रुक, नेर्ले, कामेरी, चिकुर्डे, आदी गावात बंद पाळण्यात आला. तर काही गावात निषेध फेरी काढून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. सकाळपासून एसटी बस सेवा बंद होती. खासगी वाहतूकही बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले. शहरातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली. आष्टा शहरात युवक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मिरज बंदला प्रतिसाद
मिरज : मिरज बंदला गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. भारीप बहुजन महासंघ, भीम आर्मी, एमआयएम, आरपीआय आदी संघटनांच्या वतीने मिरजेत बंदचे आवाहन केले होते. फुले चौकापासून दलित संघटनेचे कार्यकर्ते हातात निळा झेंडा घेवून बंदचे आवाहन करीत फिरत होते. मिरज शहरात व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला. श्रीकांत चौकात आल्यानंतर भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करून यामध्ये जातीयवादी शक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. भाजप सरकारचा निषेध व्यक्त करीत दलित संघटनेचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत फिरत होते. फुले चौक, मिरज मार्केट, शास्त्री चौक तसेच शहरातील विविध ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला.
मंगळवारी मध्यरात्री मिरज आगारात लावलेल्या बसेस फोडण्यात आल्या. खटाव भागात जाणाऱ्या बसच्या काचा फोडण्यात आल्या. मिरजेतही पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. बसस्थानक परिसर, फुले चौक, शास्त्री चौक तसेच गांधी चौक, शिवाजी पुतळा आदी भागात बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट