देवदर्शनासाठी गोव्यातून महाराष्ट्रात आलेल्या गोव्यातील चार अपहृत तरुणांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी (ता. १२) पहाटे सुखरुप सुटका केली. तरुणांचे रविवारी (ता. १०) अज्ञातांनी अपहरण केले होते. संशयितांनी अपहृत तरुणांच्या मोबाइलवरूनच त्यांच्या नातेवाईकांकडे २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. दिलीप पुंडलिक धारगळकर (वय ५६, रा. गोवा) यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून तरुणांची सुटका केली, मात्र पोलिसांची चाहूल लागताच अपहरणकर्त्यांनी पलायन केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, गोव्यातील राहुल धारगरळकर (वय २०), सावळो गावकर, ज्ञानेश्वर गोकाककर, मनोज गावकर हे चौघे शुक्रवारी (ता. ८) रात्री नऊच्या सुमारास शिर्डीला देवदर्शनाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. रविवारी (ता. १०) राहुल धारगळकर याच्या मोबाइलवून अज्ञाताने राहुलचे वडील दिलीप धारगळकर यांना फोन केला. तुमच्या मुलासह त्याच्या तीन मित्रांचे आम्ही अपहरण केले आहे. हे चौघे जिवंत हवे अशतील तर २५ लाख रुपये खंडणी द्या, अशी धमकी दिली. वारंवार धमकीचे फोन येऊ लागल्याने धारगळकर यांनी सोमवारी कोल्हापुरात येऊन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन मुलांच्या अपहरणाची तक्रार केली. अधीक्षक मोहिते यांनी याचा तपास स्थानिक गन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. निरीक्षक दिनकर मोहिते यांनी राहुल धारगळकर याच्या मोबाइल लोकेशनवरून संशयितांचा शोध सुरू केला. संशयितांनी दिलीप धारगळकर यांना फोन करून जयसिंगपूर येथे पैसे देण्यासाठी बोलवले होते. यानंतर नृसिंहवाडी येथे बोलवले. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला होता, मात्र अपहरणकर्ते आलेच नाहीच.
दरम्यान पोलिसांना संशयितांची माहिती काढून त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी जवळच्या पोलिस ठाण्यांमध्ये घेऊन गेले. पोलिस नातेवाईकांपर्यंत पोहोचल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी अपहृत तरुणांना सोडून पळ काढला. पोलिसांनी मंगळवारी पहाटे अपहृत तरुणांच्या मोबाइल लोकेशनवरून आजरा परिसरातून तरुणांची सुखरूप सुटका केली. पळालेल्या अपहरणकर्त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली आहे.
अपहरणकर्त्यांकडून दोन कारचा वापर
अपहरणकर्त्यांनी संकेश्वर परिसरात गोव्यातील तरुणांची कार अडवली. त्यांना चाकूचा धाक दाखवत कारची काच फोडली. यानंतर त्यातील राहुल धारगळकर याला इनोव्हा कारमध्ये घेतले. तिघे अपहरणकर्ते मुलांच्या कारमध्ये बसले. यानंतर एक कार जयसिंगपूर परिसरात, तर दुसरी कार आजरा परिसरात गेली. यातील एक कार चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. अपहरणकर्त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट