नवीन वाशी नाका परिसरात अनाधिकृत केबीन हटवण्यावरुन स्थानिक युवक व महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी धुमश्चक्री उडाली. फळविक्रेत्या केबीन मालकाने अर्वाच्य शिवीगाळ केल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला चोप दिला, त्याचवेळी मालकानेही स्थानिक युवकांना सोबत घेऊन कर्मचाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानंतर धुमश्चक्रीचा प्रकार घडला. त्यानंतर कडकोट पोलिस बंदोबस्तात त्या रस्त्यावरील सर्व केबीन्स हटवण्यात आल्या. पुईखडी ते कळंबा साई मंदिरजवळील खाऊ गल्लीपर्यंतच्या ४८ केबीन्स, २१ शेड, ४० फलक हटवण्यात आली. खाऊ गल्लीतील कारवाईवेळीही केबीनधारक व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. मंगळवारी दिवसभर अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यांच्यासह सर्व उपशहर अभियंता दिवसभर तळ ठोकून उभे होते.
महापालिकेने सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम कडक राबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी गांधी मैदान विभागीय कार्यालयामार्फत शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली पुईखडी येथून कारवाईला सुरुवात केली. चहाच्या तसेच वडापावच्या केबीन्स हटवण्यात येत होत्या. पुईखडीपासून नवीन वाशी नाका येथील चौकापर्यंत फुटपाथवर असलेल्या तसेच अनाधिकृत असलेल्या केबीन्स जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आल्या. जुना वाशी नाका येथून कळंब्याकडे जाणाऱ्या रिंगरोडच्या कोपऱ्यावरील चिव्याच्या बाजारासमोर काही केबीन्स होत्या. त्यातील एक केबीन फळविक्रेत्याची होती. दहा बाय वीसची केबीन व त्यापुढे दहा बाय पंधरा फुटाचे शेड मारण्यात आले होते. केबीन अनाधिकृत असल्याने फळ विक्रेत्या मालकाला शेड व केबीन हटवण्यास सांगितले. तरीही तो शेडही हलवण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच जेसीबीने शेड काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अनाधिकृत केबीन असलेल्या त्या मालकाची शिवीगाळ काही काळ ऐकली. तरीही तो थांबत नसल्याचे पाहून सारे कर्मचारी संतापाने एकत्र आले व त्या फळविक्रेत्याला चोप दिला.
त्यावेळी स्थानिक युवक तिथे जमले व त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने जोरदार धुमश्चक्री उडाली. जवळपास दहा मिनिटे हा प्रकार सुरू होता. हे प्रकरण हाताबाहेर जाण्याआधी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला केले व दुसरीकडे उभे केले. त्यानंतर आलेल्या पोलिसांच्या बंदोबस्तात त्या फळविक्रेत्याबरोबरच त्याच्या शेजारीलही साऱ्या केबीन्स हटवण्यात आल्या. काही ठिकाणी महिलांनीही विरोध करण्याचा प्रयत्न केला. दुपारनंतर वाशी नाका ते साईमंदीर चौक या रस्त्यावरील सुर्यकांत मंगल कार्यालयालगतच्या महापालिकेच्या ओपन स्पेसमधील खाऊगल्लीतील १४ केबीन्सचे अतिक्रमण हटवण्यात आली. तसेच राधानगरी रोड व साळोखेनगर रिंगरोडवर शहर विद्रुपीकरण करणारे २३ फलक काढण्यात आले. पुईखडीपासून सुरू केलेल्या कारवाईमध्ये शहराला विद्रूप करणारे होर्डिंग्ज व फलक काढण्यात येत होते. साळोखेनगरजवळ एका शिक्षण संस्थेचा फलक काढण्यात आला नसल्याने नागरिकांनी त्याला आक्षेप घेतला. या कारवाईत कर्मचाऱ्यांबरोबर दोन जेसीबी, एक ट्रॅक्टर ट्रॉली, तीन डंपर, बुम, कटींग वेलडिंग ट्रॉली अशी यंत्रणा कार्यरत होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट