केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितविरोधी धोरणांचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट जवळ रोखण्यात आल्यानंतर आंदोलकांनी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी केले. विविध क्षेत्रातील मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सोमवारी दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांपासून सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. पोकळ आश्वासने देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केलेली आहे. सर्वच समाज घटकांतील नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. राज्यहिताच्या विषयांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग अशा विषयांची चर्चा सुरू आहे. नागरिकांना जगणे अवघड झालेले आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. फसव्या आणि खोट्या जाहीरांतीवर अनावश्यक खर्च होणारा पैसा रोखावा, राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, शेतकऱ्यांना २४ तास शेतीसाठी वीज उपलब्ध करुन द्यावी, कृषीपंपाचे वीज बील माफ करावे, नागरी परिसराची अस्वच्छता तातडीने दूर करावी, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती सरकारने करावी यासह अन्य मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आलेला आहे. मोर्चात महिलांची संख्या लक्षवेधी होती. या वेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, पद्माकर जगदाळे, योंगेंद्र थोरात, राहुल पवार, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, शेरुभाई सौदागार, अंजना कुंडले, आयेशा शेख, छाया जाधव, राधिका हारगे, स्नेहल रोकडे, वंदना चंदनशिवे, अनिता पांगम , राणी कदम,ममता शेख, साजिद पठाण, समीर कुपवाडे आदी उपस्थित होते.
बारा डिसेंबरला
विधानसभेवर हल्लाबोल
इस्लामपूर
‘शेतकरी व सामान्य माणसाच्या विरोधी राज्य सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार व्यक्त करून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने एक डिसेंबरला यवतमाळ येथून दिंडी आंदोलन छेडणार आहे. बारा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर हल्लाबोल मोर्चाने धडक देणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील हल्लाबोल मोर्चासमोर बोलताना दिली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘पवारसाहेबांनी आम्हाला शिकवू नये’, या विधानाचा खरपूस समाचार घेताना पाटील म्हणाले, ‘मग पवारसाहेबांच्या घरी आपण कशासाठी जाता? आणि तुम्ही भाजपाची साथ सोडल्यावर तेथे कोण बसणार? याची चिंता तुम्ही कशाला करता? असले पाप आम्ही करणार नाही.’
इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयावर वाळवा तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री अण्णसाहेब डांगे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसिलदार नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
‘म्हैसाळ’ची थकबाकी
सातबाऱ्यावरून कमी करा
मिरज
मिरज पूर्व भागाला वरदान ठरलेली म्हैसाळ योजना थकबाकीमुळे बंद आहे. योजनेच्या थकीत पाणीपट्टीचा बोजा शेतकऱ्यांच्या ७/१२ वर चढविलेला आहे. योजनेची देय असलेली सर्व बिले सरकारने भरवित; पाणीपट्टी माफ करून शेतकऱ्यांच्या ७/१२ वरील बोजा तत्काळ कमी करावा यासह विविध मागण्यांसाठी मिरज तालुका राष्ट्रवादीने राज्य सरकारविरुद्ध हल्लाबोल केला. पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार शरद पाटील यांना निवेदन दिले.
वाकुर्डे योजनेचे काम पूर्ण करा
शिराळा
केंद्रातील व राज्यातील सरकारचा अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून हल्लाबोल करीत शिराळा तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेच्या वतीने माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृतवाखाली मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार के. जी. नाईक यांना निवेदन देण्यात आले.
शिराळा तालुक्यात आघाडी सरकारच्या काळात गती घेतलेली वाकुर्डे योजनेची व गिरजवडे एमआय टँकची कामे निधी अभावी बंद पडले आहे. या योजनांची कामे तातडीने करावीत, अशी मागणी करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट