राज्य सरकारने आश्वासने देऊन त्यापासून पळ काढण्याची भूमिका दोन वर्षांत सातत्याने घेतली आहे. सरकारच्या फसवा-फसवीच्या उद्योगामुळे शेतकरी पेटून उटला आहे. असंतोष कमी करण्यासाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे त्याची अधिकच फसवणूक झाल्याने तो अधिकच प्रक्षोभक बनला असून यातून राजकर्ते स्वत:ची फसवणूक करत आहे. पुढील तीन वर्षांत अशीच स्थिती राहिल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
पाटील म्हणाले, ‘निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा राज्य सरकारला विसर पडला आहे, पण सत्तेवर आल्यानंतर दिलेली आश्वासनेही पाळली जात नाहीत. दोन वर्षापुर्वी तुरडाळीचा दर २०० रुपयांवर पोहोचल्यानंतर मागणी व पुरवठ्याचा अभ्यास करुन हमीभाव वाढवला, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. टंचाईच्या काळात डाळ आयात करून निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देशात डाळींचे बंपर पीक आल्यानंतरही निर्यातीच्या धोरणात बदल केलेला नाही.’
‘नैसर्गिक संकटामुळे शेतीमालाच्या किमती विशिष्ट रकमेवर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण या नैसर्गिक संकटाबरोबर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सुलतानी संकट निर्माण झाले आहे. शेतीमालाचे धोरण ठरवताना अनुकूल प्रतिकुल स्थितीचा विचार केला जात नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच तोट्यात निघाला आहे. सर्वच बाबतींमध्ये शेतकऱ्यांविषयक धोरण चुकीचे ठरत असल्याने असंतोष वाढत आहे. यावर उपाय म्हणून कर्जमाफी योजना जाहीर केली, त्यामधूनही शेतकऱ्यांची फसवणूकच झाली असल्याची टीका त्यांनी केली.
‘कोल्हापुरात चंद्रकांतगड’
भगवानगडाप्रमाणे कोल्हापुरात चंद्रकांत गड तयार झाला आहे. गडावर कोणतेही गाराणे मांडण्यास गेल्यास भरपूर आश्वासने मिळतात, पण प्रत्यक्षात कोणत्याही आश्वासनांची पूर्तता होत नाही. कृषी वीज पंपांच्या दरवाढीबाबतही असाच अनुभव आल्याचे सांगत बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी आपल्या खास शैलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट