आठवड्यात पॅचवर्क सुरू करण्याच्या महापौरांसमोर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाला १९ दिवस होऊन गेले. अतिक्रमण काढून घेण्याबाबत प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्याला दहा दिवस होऊन गेले. पण महापालिकेचे प्रशासन अजूनही नियोजनाच्या पातळीवरच गुरफटलेले आहे. खड्डे व अतिक्रमणांमुळे शहरवासियांची वाईट अवस्था झालेली असताना प्रशासनाकडून मात्र त्याबाबत तातडीने कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे.
पावसाळा संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधारण्याचे काम हाती घेण्याची गरज होती. पण त्यासाठी नागरिकांकडून नगरसेवकांकडे तक्रारी झाल्यानंतर महापौरांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली. या बैठकीत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दोन दिवसात डांबरी प्लँट सुरू करून सर्व शहरात पॅचवर्कचे काम केले जाईल, असा शब्द दिला होता. तसेच ज्या कंत्राटदारांनी नुकतेच रस्ते केले होते व ते नादुरुस्त झाले आहेत, त्यांची कंत्राटदारांकडून दुरुस्ती करून घेतली जाईल, असेही सांगितले होते. या बैठकीस तब्बल १९ दिवस होऊन गेले. त्यासाठी शहर अभियंत्यांच्या पातळीवर अजून नियोजन सुरू आहे. डांबरी प्लँटचे काम आता पुर्ण झाले आहे. पण अजून डांबर खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवलेला नाही. यामुळे या आठवड्यात हा प्रस्ताव ठेवून मंजूर झाल्यानंतर डांबर येणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर कंत्राटदारांना बोलवून त्यांना रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. या प्रकारामुळे तेही दोन दिवसात काम सुरू करतील, असे वाटत नाही.
पॅचवर्कबरोबरच अतिक्रमण निर्मूलनाबाबत स्थायी समितीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. प्रशासन काही करत नसल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच दिवशी प्रशासनाकडून येत्या आठ दिवसांत अतिक्रमणे काढून घ्यावीत, त्यानंतर कारवाई केली जाईल. आर्थिक नुकसान झाल्यास जबाबदार राहणार नाही, असे सांगितले होते. ती मुदत उलटून गेली असून प्रशासन अजूनही पोलिसांसोबत चर्चा करत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचे कागदावर नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्ष कारवाई कशी होणार याबाबत मात्र अजूनही संदिग्धता आहे.
डांबरी प्लँटवर कचरा येऊन पडला होता. तो कचरा पेटल्याने प्लँटची वायर जळून गेली होती. ती दोन दिवसापूर्वी पूर्ववत करण्यात आली आहे. प्लँट आता सुरू करण्यात आला असून त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. डांबर खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून कंत्राटदारांनाही त्यांनी केलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट