साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात होण्यापूर्वी पंचगंगा नदी काठावरील कारखान्यातून निघणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था पाहण्यासाठी सोमवारी समितीने दौरा आयोजित केला होता. प्रांताधिकाऱ्यांच्यावतीने तहसीलदार उत्तम दिघे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर, उपप्रादेशिक अधिकारी राज कामत, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, महापालिकेचे पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, पोलिस, जिल्हा परिषद यांच्या प्रतिनिधींनी दोन टीमद्वारे पाहणी केली.
या कारखान्यांबरोबर पंचतारांकित एमआयडीसीमधील सीईटीपीचीही पाहणी केली. कारखान्यांची अचानक तपासणी केली असता अनेक कारखान्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था केली आहे. पण या प्रक्रियेऐवजी बहुतांश सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये सोडण्याची बायपास व्यवस्था केल्याचेही दिसून आले. सांडपाणी सोडण्याचे आउटलेट कुठे आहे, कशा प्रकारे सांडपाणी सोडले जाते याची छायाचित्रे घेण्यात आली. अचानक केलेल्या पाहणीमुळे कारखान्यांच्या यंत्रणेची धावपळ उडाली. गंभीर त्रुटी दिसून आल्यानंतर समितीने तिथेच ही बायपास व्यवस्था काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार आहे. तर कारखान्यांनी ही व्यवस्था काढून घेतली आहे का याची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट